परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इतरांशी मनमोकळेपणे बोलण्याने आणि जीवनातील कठीण प्रसंगांविषयी लिहिल्याने साधिकेला झालेले लाभ !

सौ. पार्वती जनार्दन

‘पूर्वी शिवणसेवा करतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेले संभाषण येथे दिले आहे.

१. प.पू. डॉक्टरांनी ‘इतरांना मनातील सांगितल्याने आनंद मिळतो’, असे सांगणे

प.पू. डॉक्टर : बोलल्याने किती आनंद मिळतो ना !

मी : हो. मन पुष्कळ हलके होते.

प.पू. डॉक्टर : तू अन्य साधकांशी बोलतेस ना ?

मी : हो. मी साधकांशी बोलते. त्यामुळे साधक मला चुका सांगतात.

प.पू. डॉक्टर : तुला घरी कोणी चुका सांगत नाही ना ? नवराही काही बोलत नाही ना ? ‘कसे बोलायचे ? बोलण्यातून कसा आनंद मिळतो !’, हे सर्व त्याला शिकव. (माझे यजमान प्रत्यक्षातही अल्प बोलतात.)

मी : हो.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेच्या जीवनातील कठीण प्रसंगांविषयी लिहिण्यास सांगणे आणि त्याप्रमाणे केल्यावर साधिकेला विचारांचा त्रास न होता हलकेपणा जाणवणे

मी एक दिवस परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत सेवेनिमित्त गेल्यावर ते मला माझ्या लहानपणीच्या खडतर जीवनासंदर्भात विचारत होते. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण येथे दिले आहे.

प.पू. डॉक्टर : बास आता. ऐकवत नाही. पुढे काही सांगू नकोस. बाप रे !

मी : आता काही वाटत नाही. मागच्या वेळी तुम्ही ते सर्व प्रसंग लिहून काढायला सांगितले होते. ते लिहिल्यानंतर माझ्या मनातून ते प्रसंग निघून गेले आहेत. आता माझे मन हलके झाले आहे. आता मला त्या विचारांचा त्रास होत नाही.

प.पू. डॉक्टर : बघ. आपल्या जीवनात घडून गेलेल्या कठीण प्रसंगांचा विचार केल्यास आपल्याला त्रास होतो. ते प्रसंग लिहिल्याने किती बरे वाटते ना ! म्हणजे लिखाणाला किती महत्त्व आहे !

मी : हो. मनातील सर्व लिहिल्यावर हलके वाटते.’

– सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.