त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

काही वर्षांपूर्वी ‘आपत्काळात घराबाहेर पडणे अशक्य होईल’, असे सांगितलेले असणे

१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार लवकरच आपत्काळ येईल. सेवा आणि साधना करण्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण होईल. पुढे पुढे आपत्काळाची तीव्रता इतकी वाढत जाईल की, साधकांना अध्यात्मप्रसारासाठी घराबाहेर पडणेही कठीण होईल.’ कोरोनामुळे गेले वर्षभर साधक प्रत्यक्ष प्रसार करू शकलेले नाहीत, यातून त्यांच्या या वचनाचा प्रत्यय येतो.

​‘कोरोना’सारखा संसर्गजन्य रोग झपाट्याने पसरून त्यामुळे अनेक जण मृत्यूमुखी पडणे, हे आपत्काळाची भीषणता दर्शवते. सध्याची ही स्थिती म्हणजे भीषण आपत्काळाचे अगदी लघु रूप आहे. यापेक्षा कैक पटींनी मोठा आपत्काळ समीप येऊन ठेपला आहे. गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वीच या संदर्भात सूचित करून आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधना करून आत्मबळ वाढवण्यास सांगितले. यावरून त्यांचा द्रष्टेपणा आणि सर्वज्ञता प्रत्ययास येते.

विश्‍वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या गुरुदेवांची सर्वज्ञता !

​भावी आपत्काळ आणि त्या वेळी उद्भवू शकणारी भयावह स्थिती यांविषयी द्रष्टे संतच समाजाला मार्गदर्शन करू शकतात. काही वर्षांपूर्वीच आपत्काळाची जाणीव करून देऊन त्यावरील परिणामकारक उपाय सांगणार्‍या परात्पर गुरुदेवांचा द्रष्टेपणा आणि सर्वज्ञता यांचा प्रत्यय सध्याच्या आपत्कालीन स्थितीमुळे सर्व साधकांना आला. ‘त्यांनी सांगितलेली सूत्रे कृतीत आणणे का अनिवार्य आहे ?’, याची सर्वांना प्रकर्षाने जाणीव झाली. अशा महान आणि त्रिकालज्ञानी गुरुदेवांचे मार्गदर्शन लाभणे, हे सनातनच्या साधकांचे महत् भाग्यच आहे. साधकांनी परात्पर गुरुदेवांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच ठरेल !

​अखिल मानवजातीला आपत्काळाविषयी सर्वांगीण मार्गदर्शन करून जगत् कल्याणार्थ झटणार्‍या परात्पर गुरुदेवांचे हे कार्य अद्वितीय आहे. ‘साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येऊन समस्त मानवजातीला साधना करण्याची बुद्धी होवो’, अशी जगन्नियंत्या श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.