‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या नावाखाली प्रशासनाने चालवलेली देवतांची विटंबना आणि देशाच्या संपत्तीचा अपवापर !

१. सरकारने सर्व नगरांना (शहरांना) ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याची योजना आखणे

श्री. सत्यकाम कणगलेकर

‘सरकारने सर्व नगरांना (शहरांना) ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याची योजना आखली. त्यानुसार देशात कित्येक नगरांना ‘स्मार्ट’ करण्याचे काम चालू झाले आहे. सरकारचा ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यामागचा मूळ उद्देश, म्हणजे ‘नगरांतील सर्व ठिकाणचे रस्ते रुंद करणे, त्या नगरांतून जाणारे महामार्ग चांगले करणे आणि नगरांतील सर्व रस्त्यांवर दिवे लावणे’, हा आहे.

२. रस्ता रुंदीकरणासाठी कित्येक वर्ष जुने वृक्ष तोडले गेल्याने उष्णतेचे प्रमाण वाढणे

प्रशासनाला ‘स्मार्ट सिटी’ करतांना प्राधान्याने भूमीची आवश्यकता होती. प्रशासनाने ती भूमी मिळवण्यासाठी कित्येक वर्ष जुने वृक्ष तोडले. त्यामुळे पूर्वी भर उन्हाळ्यातही रस्त्यांवर न जाणवणारी उष्णता आता थंडीच्या दिवसांतही जाणवते.

३. सौंदर्यीकरणासाठी देवतांच्या मूर्ती रस्त्यांवर लावण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

३ अ. प्रशासनाने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक नगरांत देवतांच्या मूर्ती, तसेच हॉलिवूडच्या चित्रपटांतील पात्रांच्या प्रतिमा उभारणे : प्रशासनाने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक नगरांत देवतांच्या मोठमोठ्या मूर्ती नगराच्या मध्यभागी, तसेच प्रमुख मार्गांवर लावलेल्या आढळतात, तर काही नगरांत ‘हॉलिवूड’च्या (पाश्‍चात्त्य चित्रपट नगरी) चित्रपटांतील पात्रांच्या प्रतिमा लावल्या आहेत.

३ आ. देहलीच्या प्रमुख मार्गावर उभारलेल्या राधा-कृष्णाच्या मूर्तीजवळच कचर्‍याचे ढिगारे पडलेले असणे : देहलीच्या एका भागात राधा-कृष्णाची मोठी मूर्ती उभारली आहे आणि तिच्या जवळच कचर्‍याचे ढिगारे पडलेले आहेत. एके ठिकाणी मोठ्या आकाराची उभ्या मारुतीची मूर्ती उभारली आहे. ‘देवतांच्या मूर्ती या सौंदर्यीकरणाच्या वस्तू नाहीत’, हेही प्रशासनाला कळत नाही.

३ इ. नगरांत लावलेल्या देवतांच्या मूर्तींची विटंबना होणे, तसेच तेथे अनेक अपप्रकार चालणे; परंतु तेथून ये-जा करणारे नागरिक, तसेच प्रशासन यांच्या ते लक्षातही न येणे ! : नगरात लावलेल्या मूर्तींवर बसून पक्षी विष्ठा करतात, तसेच मूर्तींच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. काही ठिकाणी मूर्तींच्या जवळच अपप्रकार चालू असतात. काही वेळा त्या मूर्तींचा रंग उडाल्यामुळे त्या विकृत दिसतात. त्यामुळे त्यांचा देवता म्हणून आदर राखला न जाता त्यांची विटंबना होते. ‘या मूर्तींच्या संदर्भात अनेक चुकीच्या गोष्टी घडतांना तेथून ये-जा करणारे प्रतिदिन पहात असतात; मात्र त्यांच्या, तसेच प्रशासनाच्याही ते लक्षात येत नाही’, ही शोकांतिका आहे.

४. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली केली जाणारी वृक्षतोड आणि भूमीचा केला जाणारा अपवापर, हे सर्व प्रकार देशाच्या दृष्टीने निरर्थक आणि बोधहीन असणे

हे सर्व प्रकार निरर्थक आणि बोधहीन आहेत. प्रशासनाने अशा अनावश्यक मोठ्या प्रतिमा लावून देशाचा मोठा भूभाग स्वतःच्या कह्यात घेतला आहे. या सर्व प्रकारांमुळे ‘प्रशासनाने ही सर्व भूमी वाया घालवली आहे’, असे वाटते. देशाची भूमी वाया घालवून प्रशासन काय साध्य करणार आहे ? एकीकडे देशातील अनेक भागांत जनतेला रहाण्यायोग्य घरे नसतांना प्रशासन देशाच्या भूमीचा असा दुरुपयोग करत आहे आणि स्वतःचे पाप वाढवून घेत आहे. भारतातील स्मार्ट आणि मेट्रो म्हणवणार्‍या नगरांची अशी स्थिती असणे, हे दुर्दैव आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला काम मिळणे, त्याचा योग्य मोबदला मिळणे; पोटभर अन्न, वस्त्र आणि निवार्‍यासाठी वाजवी घर/जागा मिळणे आवश्यक आहे.

अशी स्थिती हिंदु राष्ट्रात नसेल. त्यामुळे सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेऊन ते स्थापन होईपर्यंत कार्यरत रहाणे आवश्यक आहे.’

श्री. सत्यकाम कणगलेकर, कोणार्क, ओडिशा (२८.७.२०१८)