बंंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांंच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत गाड्यांची मोठी हानी

आतातरी केंद्र सरकारने बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी कृती करावी, असे जनतेला वाटते !

कोलकाता (बंगाल) – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहन  ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या वाहनताफ्यावर मोठमोठे दगड, सिमेंटच्या विटा फेकण्यात आल्या. त्यामुळे या वाहनांच्या काचा फुटल्या. राज्याचे भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नड्डा बंगालच्या दौर्‍यावर आहेत. ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते तेव्हा ही दगडफेक झाली.

 (सौजन्य : IndiaTV News)

१. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आरोप केला की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी तृणमल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले. सुरक्षादलाने नड्डा यांच्या वाहनाला यातून सुरक्षित बाहेर काढले.

२. या आधी भाजपने दावा केला होता की, नड्डा यांच्या दौर्‍याच्या आधी काही घंट्यांपूर्वी भाजपचे नगर अध्यक्ष सुरजित हलधर यांच्यावर आक्रमण झाले आहे. नड्डा यांच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते झेंडे, भित्तीपत्रके लावत होते. त्या वेळी तणमूलच्या  कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. हलधर यांनी सांगितले, ‘आम्हाला मारहाण करण्यात आली. मला ठार मारण्याची धमकीही दिली. यामध्ये आमचे १०-१२ कार्यकर्ते घायाळ झाले.’

३. तृणमूल काँग्रेसने सांगितले की, हे आरोप खोटे आहेत. आम्ही कधीही असे काम करत नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच अभिषेक बॅनर्जी यांचे भित्तीपत्रक फाडले आहे. घोष आणि विजयवर्गीय नेहमी चुकीचे वक्तव्य करत असतात. भाजप केवळ खोटे बोलते.