कोरोना विषाणूमुळे आलेला आपत्काळ म्हणजे ईश्‍वराने मनुष्याला भक्ती करण्यासाठी दिलेली अखेरची संधी असून आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही !

‘२१.३.२०२० या दिवशी कोल्हापूर येथील सेवाकेंद्रात रात्री ९.३० ते १०.०० या वेळेत ध्यानाला बसल्यावर मला ‘कोरोना’ विषाणूविषयी पुढील ज्ञान मिळाले.

१. पृथ्वीवर माजलेला अधर्म संपवण्यासाठी भगवंताने रचलेली लीला म्हणजेच कोरोना विषाणूचा उद्भव !

‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. धर्माचा कधीही लोप होत नाही. ज्या वेळी धर्मावर संकट येते, त्या वेळी भगवंत अवतार धारण करतो. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे. केवळ भगवंतच हा नरसंहार थांबवू शकतो. त्यानेच ही लीला रचली आहे.

२. भारत ऋषिमुनी आणि संत यांची पवित्र भूमी असणे; मात्र या भूमीवर अपप्रवृत्ती अन् अयोग्य कृती मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचे फलस्वरूप म्हणून ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असणे

भारत ही ऋषिमुनी, संत आणि गुरु यांची पवित्र भूमी आहे; पण या भूमीवर पाप, अधर्म, बलात्कार, स्त्री जातीची अवहेलना, भ्रष्टाचार, लूटमार आदी अनेक अपप्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मनुष्य प्राण्यापेक्षाही हीन पातळीला जाऊन वागत आहे. मानवाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. या सर्व अयोग्य कृतींचे फलस्वरूप म्हणून ‘कोरोना’ विषाणूचा उद्भव झालेला आहे.

श्री. जगदीश पाटील

३. ‘वर्ष २०१९ ते वर्ष २०२२ हा अत्यंत भीषण आपत्काळ असणार’, असे सांगून सनातन संस्था सर्वांना जागृत करत असणे

सनातन संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून ‘वर्ष २०१९ ते वर्ष २०२२ हा काळ अत्यंत भीषण आपत्काळ असणार आहे. यातून ‘स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरी साधना करा, भगवंताची भक्ती करा, नामजप, सत्संग, सेवा, त्याग करा आणि परमार्थ करून आपला उद्धार करून घ्या’, असे सांगत आहे; पण याकडे मनुष्याने दुर्लक्ष केले. आता तरी भगवंताची भक्ती, नामजप, यज्ञयाग, मंत्रजप, होमहवन आरंभ करा, तरच आपण आपत्काळात तरून जाऊ, अन्यथा आपल्याला भयंकर यातनांसह मृत्यूला सामोरे जावेच लागेल.

४. भगवंताने मनुष्याला देवाची भक्ती करण्यासाठी दिलेली ही शेवटची संधी असून मानवाने आता तरी जागे होऊन साधना आणि समाजात धर्माचा प्रचार करायला हवा !

वर्ष २०१९ मध्ये भगवंताने अतीवृष्टी आणि महापूर यांच्या माध्यमातून आपल्याला ईश्‍वराची भक्ती करणे, तसेच त्याला शरण जाणे, यांसाठी एक संधी दिली होती. आता ‘कोरोना’च्या माध्यमातून त्याने आपल्याला दुसरी संधी दिली आहे, तरीही मानव आपला अहंकार सोडत नाही. आता भगवंत पुन्हा संधी देणार नाही. यानंतर तो संहाराला आरंभ करेल ! ही शेवटची संधी आहे; म्हणून आताच जागे व्हा. अधर्माची साथ सोडा. साधना करा आणि समाजात धर्माचा प्रचार करा ! या मनुष्यजन्माचे सार्थक करून भगवंताच्या कृपेला पात्र व्हा ! नंतर पश्‍चात्तापाविना आपल्या हाती काहीच उरणार नाही. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि त्या वेळी आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. मानवा जागा हो ! जागा हो !’

– श्री. जगदीश पाटील, कोल्हापूर सेवाकेंद्र

श्री. जगदीश पाटील यांना आपत्काळाविषयी मिळालेले ज्ञान

जानेवारी मासात रात्री ध्यानाला बसल्यावर ‘मुंबईत नैसर्गिक आपत्तीमुळे सगळीकडे प्रेतांचा खच पडला असून मुंबईतील सेवाकेंद्रे, तेथील साहित्य आणि साधक यांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे’, असे दृश्य सलग काही दिवस दिसणे : ‘जानेवारी मासात रात्री ९.३० ते १०.०० या वेळेत ध्यानाला बसल्यावर सलग काही दिवस ध्यानात मला पुढील दृश्य दिसत होते, ‘मुंबईत सगळीकडे हाहाःकार माजला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे सगळीकडे मृतदेहांंचा खच पडला आहे. त्याच्या आदल्याच दिवशी मुंबईतील सर्व साहित्य साधकांनी शक्तीरथात भरले आहे. त्या वेळी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर या स्वतः तेथे उपस्थित आहेत. ‘सर्व साधकांचे स्थलांतर करणे आणि तेथील सर्व साहित्य हालवणे’, अशी सेवा चालू होती. दुसर्‍या दिवशी मुंबईत नैसर्गिक आपत्ती येऊन मुंबई बुडणार होती. ‘आदल्याच दिवशी देवाने मुंबईतील सर्व साधकांचे आणि सर्व साहित्यांचे स्थलांतर करून घेतले’, हे पाहून मला फार कृतज्ञता वाटली. देव भक्तांची काळजी घेतोच.’

– श्री. जगदीश पाटील, कोल्हापूर सेवाकेंद्र (२१.३.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक