All India Protest : बांगलादेशमधील दीपू चंद्र दास यांच्या हत्येच्या प्रकरणी देशभरात हिंदूंकडून निदर्शने !

नवी देहली : दीपू चंद्रा यांच्या हत्येच्या प्रकरणी आता भारतातही रस्त्यावर उतरून निषेध होऊ लागला आहे. २३ डिसेंबरला सकाळपासून राजधानी देहलीसह जम्मू, पाटलीपुत्र कोलकाता, भोपाळ, सूरत, भाग्यनगर आदी अनेक शहरांमध्ये बांगलादेशाचा दूतावास आणि उच्चायुक्तालय यांच्याबाहेर निदर्शने करण्यात आली. तसेच या वेळी महंमद युनूस यांचा पुतळा जाळण्यात आला. काही ठिकाणी उच्चायुक्तालयाला निवेदन देण्यात आले. सहस्रोच्या संख्येने हिंदू या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवसेना, हिंदुवाहिनी आदी संघटनाही सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाद्वारे पीडित दीपू चंद्र दास यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोलकाता येथे निदर्शन करणार्‍या साधू-संत आणि कायकर्ते यांच्यावर लाठीमार

कोलकाता येथे दीपू चंद्र दास यांच्या हत्येच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून आंदोलन करण्यात येत होते. यात साधू-संत आणि हिंदु कार्यकर्ते सहभागी झाले होते. ते शांततेच निदर्शने करत असतांना पोलिसांनी त्यांच्यावर निर्दयपणे लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले. यात साधू-संतांनाही मार खावा लागला. यात काही जण घायाळ झाले. (ममता बॅनर्जी यांच्या हिंदुद्वेषी राजवटीत यापेक्षा वेगळे काय घडणार ? असे सरकार विसर्जित करण्यातच देशहित आहे ! – संपादक)

बांगलादेशात शिक्षण घेत असलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांचे रक्षण करा ! – ‘ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन’ची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

बांगलादेशात शिक्षण घेत असलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी ‘ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

बांगलादेशमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर असून विद्यार्थी भीती आणि असुरक्षितता यांच्या वातावरणात रहात असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या संघटनेने केंद्र सरकारकडे राजनैतिक पुढाकार, दूतावासांची सक्रीय भूमिका, तसेच विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी पारदर्शक संवाद ठेवण्याची मागणी केली आहे.

जम्मू उच्च न्यायालय बार असोसिएशनचे आंदोलन

बांगलादेशातील हिंदु समाजावर होत असलेल्या आक्रमणांच्या निषेधार्थ जम्मू उच्च न्यायालय बार असोसिएशनने जोरदार आंदोलन केले. या वेळी अधिवक्त्यांनी बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता निर्मल कोतवाल म्हणाले की, जम्मूतील नागरिक बांगलादेशामध्ये रहाणार्‍या हिंदु समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारविरोधात कठोर भूमिका घ्यावी आणि तेथील हिंदूंची सुरक्षा भक्कम करावी. अधिवक्ता निर्मल कोतवाल यांनी जम्मूमध्ये रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांची आणि रोहिंग्या व्यक्तींची सखोल तपासणी करण्याचीही मागणी केली, जेणेकरून कोणतीही सुरक्षा त्रुटी उद्भवू नये. बार असोसिएशनने हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरही गंभीरपणे मांडण्याची आवश्यकता असल्यावर भर दिला.

बांगलादेशाकडून व्हिसा सेवा तात्पुरत्या स्थगित

भारताशी वाढत असलेला तणाव आणि चालू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशाने नवी देहलीतील त्याच्या उच्चायोग कार्यालयात, तसेच त्रिपुरातील साहाय्यक कार्यालयांमध्ये व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. अपरिहार्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. बंगालमधील सिलिगुडी येथे व्हिसा अर्ज प्रक्रिया हाताळणार्‍या खासगी संस्थेनेही तिची सेवा थांबवली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी देशभरात निदर्शने केली, हे अभिनंदनीय आहे; मात्र ती एका दिवसाची किंवा काही घंट्यांचीच राहू नये, तर ही आग आणि हा संताप बांगलादेशातच नव्हे, तर संपूर्ण जगात जोपर्यंत हिंदू सुरक्षित होत नाहीत, तोपर्यंत व्यक्त होत रहाणे आवश्यक आहे !