वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय !

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी उचलले पाऊल !

पुणे – गेल्या काही वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे  प्रमाण वाढले आहे. नैराश्यग्रस्त होऊन विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे स्वत:चे जीवन संपवत असल्याचेही समोर आले आहे. याची गंभीर नोंद घेत आता वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व शासकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘छात्रमानस योजना’ राबवण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ वर्षांत १४ वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे  विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये कंत्राटी तत्त्वावर २ मानसोपचार समुपदेशक नियुक्त करण्यात येणार आहेत. याला राज्यशासनाने संमती दिली आहे.

संपादकीय भूमिका :

कितीही उच्च शिक्षण घेतले, तरी मनोबल आणि आत्मबळ नसेल, तर आयुष्यात येणार्‍या नैराश्याला सामोरे जाता येत नाही; परंतु साधनेमुळे नैराश्यावर मात करता येते. जीवनात घडणार्‍या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी केवळ समुपदेशन नाही, तर धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !