माझ्यावर आरोप करण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

अनिल देशमुख यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा परमबीर सिंह यांचा आरोप

अनिल देशमुख, परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई – माझ्यावर आरोप करण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी झाली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

मी गृहमंत्री असतांना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बाँब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे ‘मास्टरमाईंड’ होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे त्यांना अटक झाली. त्या वेळी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी झाल्या, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

यावर परमबीर सिंह म्हणाले, ‘‘या प्रकरणावर मी आजपर्यंत कधीही सार्वजनिकरित्या बोललो नाही. मला जे सांगायचे होते, ते मी न्यायालयात सांगितले आहे; मात्र अनिल देशमुख यांनी माझ्यावर जे गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे मला बोलणे भाग आहे. मुळात अनिल देशमुख ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून लक्षात येते की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.’’