जयसिंगपूर येथील चिपरी फाटा ते अंकली नदी पुलापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात मनसेच्या वतीने निवेदन !

१. अभियंता पाटोळे यांना निवेदन देतांना २. भगवंत जांभळे, तसेच अन्य

जयसिंगपूर (कोल्हापूर) – चिपरी फाटा ते अंकली नदीच्या पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता एम्.व्ही. पाटोळे यांना निवेदन देण्यात आले. ‘मुरुम टाकून बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांमधील मुरुम काही घंट्यातच निघून जात आहे’, ही स्थिती या निवेदनाच्या माध्यमातून पाटोळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या वेळी अभियंता पाटोळे यांनी तात्काळ संबंधित ठेकेदारास बोलावून योग्य प्रकारे काम करण्याची सूचना केली. पावसाळ्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन अभियंता पाटोळे यांनी या प्रसंगी दिले.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष आणि कामगार सेनेचे कार्यकारणी सदस्य श्री. भगवंत जांभळे, शहराध्यक्ष श्री. लखन भिसे, उपाध्यक्ष श्री. महेश पोरे, स्वयंरोजगार विभागाचे शहर संघटक श्री. योगेश चव्हाण, अधिवक्ता नीलेश गांधी उपस्थित होते.