परात्पर गुरु डॉक्टरांनी एका संप्रदायातील भक्ताला त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनातील चुका त्याच कार्यक्रमात सर्वांसमोर सांगणे आणि त्या भक्ताने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे

विविध प्रसंगांतून ‘कृतज्ञता कशी असायला हवी ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एका संप्रदायातील एका भक्ताने त्याच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात प.पू. डॉक्टरांना ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून बोलावले होते. त्या ठिकाणी गेल्यावर प.पू. डॉक्टरांच्या लक्षात आले, ‘येथे वाढदिवस केवळ मौजमजा म्हणून साजरा केला जात आहे. वाढदिवसाचे नियोजन व्यवस्थित केलेले नाही. संतांची व्यवस्था चांगली केली नाही. व्यासपिठावर सर्व जण चप्पल घालून आले आहेत.’ वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी स्तुतीसुमने उधळली.

त्यानंतर प.पू. डॉक्टर प्रमुख पाहुणे म्हणून बोलले. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या भाषणात त्या भक्तावर असलेल्या प्रेमापोटी ‘वाढदिवस कसा साजरा करावा ? संतांची कृपा कशी संपादन करावी ?’, हे सांगितले. ते सांगतांना त्यांनी कार्यक्रमातील पुष्कळ चुकाही सांगितल्या. हे त्या भक्ताशी जवळीक असलेल्यांना मुळीच आवडले नाही. शेवटी अनेकांनी ‘प.पू. डॉक्टर संत आहेत का ? संतांनी असे बोलायचे असते का ? यांनी वाढदिवसानिमित्त आशीर्वाद न देता चुकाच सांगितल्या’, असे बोलून दाखवले. या वेळी त्या भक्ताला मात्र आनंद झाला होता. २ दिवसांनी ते भक्त प.पू. डॉक्टरांकडे येऊन कृतज्ञताभावाने म्हणाले, ‘‘तुमच्या मार्गदर्शनामुळे मला एक नवी दिशा मिळाली. ‘संतांची कृपा कशी संपादन करायची ?’, हे समजले. तुमच्यामुळे माझे भाग्य उजळले.’’

– श्री. पाटील (२३.३.२००४)