परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सजिवांप्रमाणे निर्जीव वस्तूंचेही परीक्षण करण्यास शिकवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत.

६ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया. (भाग १७)

भाग १६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/770920.html

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ‘वस्तू कोण वापरते ?’, यावर तिच्यातील स्पंदने अवलंबून असणे

‘गुरुदेवांनी आम्हाला सांगितले, ‘‘जसे आपण जिवंत गोष्टींचे, म्हणजेच सजिवांचे परीक्षण करतो, तसे आपल्याला निर्जीव गोष्टींचेही परीक्षण करता आले पाहिजे. ‘कपडे, भांडी, भिंती यांमध्ये कशा प्रकारची स्पंदने आहेत ?’, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. प्रत्येक वस्तू ही सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेली असते. ‘ती वस्तू कोण उपयोगात आणते ?’, यावर तिच्यात असलेली स्पंदने कोणत्या प्रकारचा गुण दाखवतात ?’, हे अवलंबून असते.’’

२. वास्तूतील स्पंदनांविषयी गुरुदेवांनी सांगितलेली सूत्रे

एकदा मी एका वास्तूचे परीक्षण करण्यास गेले होते. तेव्हा मला ती वास्तू दूषित, म्हणजेच तामसिक वाटली; परंतु त्यात रहाणारी माणसे मात्र सात्त्विक होती. ‘असे कसे ?’, असे मी गुरुदेवांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘वास्तू बांधत असतांना तेथे अनेक कामगार काम करत असतात. त्यांची स्पंदने आणि मनातील विचार वास्तूत फिरत असतात, तसेच ‘आपण वास्तू बांधतांना वापरलेले साहित्य कोणत्या दुकानातून आणले आहे ?’, यावरही हे ठरते. दुकानाचा मालक असात्त्विक असेल, तर त्याच्या दुकानातील मालावर त्या मालकाच्या असात्त्विक स्पंदनांचा परिणाम झालेला असतो. ‘वास्तू बांधणारा कंत्राटदार कसा आहे ? त्याच्या हाताखालची माणसे कशी आहेत ?’, याचाही चांगला-वाईट परिणाम वास्तूवर होत असतो; म्हणून वास्तू बांधून झाल्यानंतर आपण वास्तूशांती करतो. या विधीमुळे देवतांची स्पंदने वास्तूत कार्यरत झाल्याने वास्तूतील दूषितपणा नष्ट होऊन वास्तू पवित्र बनते; परंतु ‘वास्तूतील पावित्र्य टिकवणे’, हे तेथे रहाणार्‍या माणसांवर अवलंबून असते. तेथे रहाणारी माणसे साधना करणारी असली, तर वास्तू अधिकाधिक सात्त्विक होत जाते आणि शेवटी ती मंदिर बनते. हिंदु राष्ट्रात सर्व माणसे साधना करणारी असल्याने सर्व वास्तू आणि प्रदेश सात्त्विक असतील; परंतु त्यासाठी आपण समाजात अध्यात्माचा प्रसार अधिकाधिक करायला हवा. शेवटी समष्टी साधनाच महत्त्वाची ! हो ना ?’’

३. सर्वज्ञतेची शिकवण देणारे महान देहधारी गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) लाभल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !

गुरुदेवांनी अमूल्य मार्गदर्शन करून आम्हाला साधनेचे महत्त्व पटवून दिले. अशा सर्वांगीण विषयांचा अभ्यास करायला शिकवून साधनेची नवी दिशा देणारे गुरु विरळाच, नाही का ? आम्ही या संदर्भात भाग्यवान आहोत; कारण आम्हाला सर्वज्ञतेची शिकवण देणारे देहधारी गुरु भेटले आहेत. कलियुगात हे अत्यंत दुर्लभ आहे. आम्ही अशा गुरुदेवांच्या छायेत असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ‘आमच्यासारखे आम्हीच !’, असेच आम्हाला वाटते. ‘आमचा हा अभिमान सार्थ आहे’, यात शंका नाही.’ (क्रमशः)

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग १८ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/772205.html