श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

प्रभु श्रीरामासारखे आदर्श या भूतलावर एकमेवच ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह श्रीरामाने केलेले कुशल संघटनकार्यही महत्त्वाचे आहे. अकस्मात् उद्भवलेल्या वनवास काळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल विरांचे संघटन करून असुरांचे निर्दालन करून त्या समस्यांचे निराकरण केले. वनवासाला निघतांना श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण असे तिघेच होते; मात्र रावणाचा वध करून अयोध्येला परत येतांना ते लंकाविजयात साहाय्य करणार्‍या सेनेसह आले.

संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती 

प्रभू श्रीराम आपल्या परिवारा समवेत

१. वनवासात मित्र निषाद राजा गुहाचे साहाय्य आणि त्याच्या प्रती कृतज्ञताभाव !

निषाद राजा गुह श्रीरामची पाद्यपूजा करतांना

माता कैकेयीने मागितलेल्या वरदानानुसार श्रीरामाने वनवासात जाण्याची सिद्धता केली. महर्षि वसिष्ठ यांच्या गुरुकुलात असतांना श्रीरामाची श्रृंगवेरपूरचा आदिवासी निषाद राजा गुह याच्याशी अतिशय घनिष्ट मैत्री होती. अयोध्येतून बाहेर पडल्यावर निषाद राजा गुहाला श्रीराम वनवासात निघाले असल्याचे कळल्यावर त्याने प्रभु श्रीरामाला स्वतःचे राज्य देऊन तिथेच रहाण्याची विनंती केली; मात्र श्रीरामाने वनवास पालनाचे कर्तव्य सांगून आता कोणत्याही नगरात प्रवेश करू शकत नसल्याचे सांगितले आणि त्याचे राज्य स्वीकारण्यास नकार दिला. त्याच्या राज्यातील वनात वृक्षाच्या खाली पानांची शेज बनवून श्रीरामाने त्याची वनवासातील पहिली रात्र निवास केला. तसेच याच ठिकाणी प्रभु श्रीरामाने राजवंशातील वस्त्रांचा त्याग करून वनवासाची वस्त्रे परिधान केली. निषाद राजानेच भोई वंशाच्या केवटराजला बोलावून त्याच्या नावेतून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना गंगा नदी पार करवून दिली, तसेच स्वतः त्यांच्या वनवासाची व्यवस्था करण्यासाठी सोबत केली. तेथून प्रयागराज येथील भरद्वाजमुनींच्या आश्रमात जाऊन श्रीरामाने वनवासातील निवासाच्या संदर्भात विचारणा केली. त्यावर भरद्वाजमुनींनी यमुना नदीच्या पलीकडे चित्रकूट पर्वतावर वनवास काळातील निवास करण्यास सांगितले. तेव्हा श्रीरामाने निषाद राजाला यमुना नदी पार करण्यासाठी बांबूची नाव बनवून देण्यास सांगितले आणि स्वतःच्या राज्यात परतण्यास सांगितले. त्यानुसार निषाद राजाने आज्ञापालन केले. निषाद राजाने वनवासात केलेल्या या साहाय्याचा प्रभु श्रीरामाला विसर पडला नाही, तर लंकाविजय मिळवून परत येतांना प्रभु श्रीरामाने पुष्पक विमान थांबवून निषाद राजालाही राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोबत घेतले. त्यानंतरही अश्वमेध यज्ञाच्या वेळी निषाद राजाला आमंत्रित करून मानाचे स्थान दिले होते. यातून आपल्याला साहाय्य करणार्‍याच्या संदर्भात कृतज्ञताभाव कसा असावा, याचा आदर्श प्रभु श्रीरामाने घालून दिला आहे.

२. श्रीरामाचे वनवासातील कार्य

श्री. रमेश शिंदे

वनवासकाळात श्रीरामाने अत्रि, अगस्ति, विश्वामित्र आदी ऋषिमुनींच्या आश्रमांना राक्षसांच्या त्रासापासून कायमचे मुक्त केले. या काळात श्रीराम-लक्ष्मण यांनी अनेक राक्षसांचा वध करून वनातील सामान्य जनांनाही त्यांच्या दहशतीतून मुक्त केले. साधारणपणे १२ वर्षे प्रभु श्रीराम वनवासात हे कार्य करत होते. याच काळात राक्षसांच्या वधानंतर त्यांनी वनवासी समाजाला धनुष्य-बाण चालवण्याचे प्रशिक्षण देऊन शस्त्रविद्या शिकवली. त्यामुळेच आजही अधिकांश वनवासीजन धनुष्य-बाणाचा वापर करतांना दिसतात. त्यांना श्रीरामाने धर्म-परंपरा शिकवली, त्यामुळे आपल्याकडे वनातही आज राजपरंपरा दिसून येते, तसेच त्यांच्या रितीरिवाजांमध्ये साम्य दिसून येते. या कार्यामुळे श्रीरामाला रावणाच्या विरोधात लढण्यासाठी वनातील सैन्याचे सहजपणे साहाय्य मिळाले.

३. सुग्रीवाला साहाय्य

सुग्रीव आणि प्रभू श्रीराम भेट

किष्किंधा नगराचा वाली हा अतिशय पराक्रमी राजा होता आणि त्याला मिळालेल्या एका वरदानामुळे त्याच्याशी लढणार्‍या शत्रूचे अर्धे बळ त्याला मिळत असे. त्यामुळे त्याचा युद्धात सहजपणे विजय होत असे. त्याने देवतांनाही पराजित केलेल्या महापराक्रमी रावणाची मान काखेत दाबून संपूर्ण विश्वाची परिक्रमा केली होती. त्यामुळे रावणाने त्याच्यासमोर पराजय मान्य केला होता. या वालीने एका प्रसंगात झालेल्या गैरसमजामुळे स्वतःच्या भावाला, म्हणजे सुग्रीवाला राज्यातून बाहेर हाकलून दिले होते आणि त्याच्या पत्नीला अर्थात् रूमाला बळजोरीने स्वतःकडे ठेवले होते. त्यामुळे सुग्रीवाने ऋष्यमुख पर्वताच्या ठिकाणी आश्रय घेतला होता.या ठिकाणी युद्धनीतीचा विचार केला, तर लक्षात येते की, ज्या रावणाने सीताहरण केले होते; त्याच रावणाला वालीने सहजपणे पराजित केले होते. त्यामुळे श्रीरामाने जर वालीचे साहाय्य मागितले असते, तर रावणाने घाबरून सीतेला सहज परत केले असते. अशा स्थितीतही प्रभु श्रीरामाने अन्यायी वालीचे साहाय्य घेतले नाही, तर सुग्रीवाच्या पत्नीला बळजोरीने स्वतःकडे ठेवून घेणार्‍या वालीच्या विरोधात जाऊन अन्यायाने पीडित सुग्रीवाला साहाय्य करण्याचे ठरवले. यातून लक्षात येते की, श्रीरामाने बलवानाकडून साहाय्य न घेता, अन्याय झालेल्या सुग्रीवाच्या साहाय्यासाठी ते उभे राहिले. प्रभु श्रीरामाने अन्यायी वालीचा वध करून सुग्रीवाचा राज्याभिषेक केला आणि त्याला त्याची पत्नी पुन्हा मिळवून दिली; मात्र किष्किंधेचा राजकुमार म्हणून पराक्रमी वालीपुत्र अंगदची नेमणूक करून त्यालाही सोबत जोडून घेतले.

४. अंगदच्या बुद्धीकौशल्याचा उपयोग

राजकुमार अंगदने सीतेच्या शोधात वानरसेनेचे नेतृत्व केले. जटायूचा भाऊ संपातीकडून सीता लंकेत असल्याचे ऐकून अंगद समुद्र पार करण्यास सिद्ध झाला; परंतु तेव्हा तो समूहाचा नेता असल्याने जांबवंताने त्याला जाऊ दिले नाही आणि हनुमान लंकेला गेले. हनुमानाला त्या वेळी लंकेत पाठवण्याचे कारण, म्हणजे हनुमानने लंकेतील असुरांचाही नाश केला, सीतामातेला संदेश पोचवण्याचे कार्य केले. याच समवेत लंकादहन करून असुर सैन्याच्या मनात दहशत निर्माण केली. त्यामुळे अनेक लाभ झाले.भगवान श्रीरामाला अंगदचे शौर्य आणि बुद्धीमत्ता यांवर पूर्ण विश्वास होता; म्हणूनच त्यांनी राजकुमार अंगदला ‘स्वतःचा दूत’ म्हणून रावणाच्या भेटीला पाठवले अन् त्याला सांगितले, ‘रावणाने सीतेला सन्मानाने परत केले, तर ते रावणाशी युद्ध करणार नाहीत.’ अंगद तिथे गेल्यावर रावणाने भेदभावाचा वापर करत त्याला सांगितले, ‘वाली माझा मित्र होता. याच राम-लक्ष्मणाने वालीला मारले आहे आणि ज्यांनी तुझ्या वडिलांना मारले, त्यांचा तू संदेशवाहक म्हणून वागत आहेस, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे.’ त्या वेळी राजपुत्र अंगदने रावणाला फटकारले आणि सांगितले, ‘मूर्ख रावणा, तुझ्या या शब्दांमुळे श्रीरामावर भक्ती नसलेल्यांच्या मनातच विसंवाद निर्माण होऊ शकतो.  वालीने जो अन्याय केला, त्याचे त्याला फळ मिळाले. तूही काही दिवसांनी तेथे जाऊन यमलोकातील तुमच्या मित्राची विचारपूस कर.’श्रीरामाच्या दूताच्या रूपात असलेल्या महाबली अंगदने रावणाची समजूत काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही. त्याने रावणाचा अहंकार दूर करण्यासाठी त्याला आठवण करून दिली, ‘पाताळात बळीराजावर विजय मिळवण्यासाठी गेल्यावर तेथे रावणाला बंदी बनवले होते, सहस्रबाहू राजानेही रावणाला बंदी बनवले होते, तसेच वालीनेही रावणाला काखेत दाबून ठेवले होते. त्यामुळे रावणाला पराभूत केले जाऊ शकते. आता तर साक्षात् विष्णूचा अवतार स्वतः रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्रतीरावर सज्ज आहे. त्यामुळे रावणाच्या अहंकाराने रावणाचा तर नाश होईलच; परंतु राजसभेत बसलेल्या सर्वांचा नाश होऊन त्यांची पत्नी-मुले अनाथ होतील. तेव्हा आताच रावणाने श्रीरामाला शरण यावे.’ हे ऐकून संतापलेल्या रावणाने अंगदाचे मस्तक छाटण्याचा आदेश दिला. त्या वेळी अंगदने प्राणविद्येचा वापर करून स्वतःचा पाय दरबारात भूमीवर ठेवला आणि रावणाला आव्हान दिले, ‘जर त्याच्या दरबारातील कोणत्याही शूर आणि बलवान योद्ध्याने माझा पाय भूमीवरून हलवला, तर आपण पराभव स्वीकारू आणि श्रीराम युद्ध न करताच तेथून परत जातील.’ मेघनाद आणि कुंभकर्णासह रावणाच्या अनेक योद्ध्यांनी प्रयत्न केले; परंतु कुणीही अंगदचा पाय भूमीवरून हालवू शकले नाहीत. शेवटी रावण स्वतःच अंगदचा पाय हालवायला आला आणि त्याचा पाय धरला; पण अंगदने त्याचा पाय सोडवला आणि रावणाला तो म्हणाला, ‘रावणा, तू जसे माझे पाय धरले आहेस, तसेच श्रीरामाचे पाय धरले असतेस, तर चांगले झाले असते.’ यातून अंगदची विद्वत्ता, शत्रूच्या राजसभेत जाऊन त्याला हतोत्साहित करण्याचे कौशल्य, तसेच त्याच्या मनातील श्रीरामाच्या प्रतीचा भाव लक्षात येतो आणि त्यातून श्रीरामाने त्याची दूत म्हणून केलेली निवडही समजते.श्रीरामाने अशा प्रकारे हनुमान, जांबवंत, नल-नील यांचेही सीतेच्या शोधार्थ साहाय्य घेतले आणि त्यांच्या गुणांचा योग्य उपयोग करून घेतला. विश्वकर्माचे पुत्र असणार्‍या नल-नील यांनी त्यांना मिळालेल्या वरदानाचा उपयोग करून लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बनवण्यासाठी साहाय्य केले.

५. रावणाचा बंधू बिभीषणाला आश्रय आणि युद्धात त्याचे साहाय्य

बिभीषण हा रावणाचा सर्वांत लहान भाऊ होता. तो राक्षसकुळात जन्मलेला असला, तरी श्रीविष्णूचा भक्त होता. त्याने रावणाला राजदरबारातील चर्चेत सांगितले की, श्रीरामाला शरण जाऊन सीतामातेला रामाकडे सोपवण्यातच त्याचे हित आहे. त्यामुळे रागावून रावणाने बिभीषणाला राज्यातून बाहेर काढले. तेव्हा बिभीषण आश्रय मागण्यासाठी श्रीरामाकडे आला. शत्रूचा भाऊ आश्रय मागण्यासाठी आल्यावर त्याच्या हेतूची खात्री करणे आवश्यक होते. त्यामुळे श्रीरामाने सर्वप्रथम हनुमानाचे मत विचारले. तेव्हा हनुमानाने लंकेत बिभीषणाची झालेली भेट आणि त्याची भगवद्भक्तीची माहिती देऊन बिभीषणाला आश्रय देण्यास सांगितले; मात्र जांबवंत, नल-नील इत्यादी मंत्र्यांच्या मनात संशय तसाच राहिल्याने रामाने त्यांचा संशय दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी श्रीरामाने त्यांना इतिहासातील उदाहरणे सांगून आश्रय मागायला आलेल्याला साहाय्य करण्याचे कर्तव्य समजावून सांगितले.श्रीरामाच्या या निर्णयामुळे बिभीषण हा शत्रूपक्षातील सर्व प्रदेश, शस्त्रे आणि असुरांचे सैन्य अन् शक्ती यांची रहस्ये ठाऊक असणारा सहकारी बनला. त्यामुळे युद्धात त्याने प्रभु श्रीरामाला प्रत्येक वेळी योग्य ते साहाय्य करून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. रावणाच्या वधानंतर लंका राजाहीन झाली, तर तिथे योग्य राजा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन प्रभु श्रीरामाने लंकेचा पुढचा राजा म्हणून बिभीषणाची निवड केली. इतकेच नव्हे, तर ‘मरणान्ती वैराणी’ म्हणून स्वतः रावणाचा अंतिम संस्कार केला. त्यामुळे लंकेतील सर्वांचे मनही त्यांनी जिंकले. भगवान श्रीरामाचे ध्येय लंकेची सत्ता कह्यात घेणे, हे नव्हतेच. त्यामुळे लक्ष्मणाला सोन्याच्या लंकेची भुरळ पडल्यावर श्रीरामाने त्याला ‘जननी जन्मभूमीश्च, स्वर्गादपी गरियसी’ (अर्थ : स्वर्गापेक्षाही जन्मभूमी श्रेष्ठ असणे), हे मार्गदर्शन करून मातृभूमीचे महत्त्व सांगितले. यातूनही श्रीरामाचे अद्भुत संघटनकौशल्य लक्षात येते.

 ६. पित्याची वनवासाची आज्ञा पाळत श्रीरामाचे लंकाविजयासाठी संघटन !

खरे तर रावणाने सीताहरण केल्यानंतर श्रीरामाने जर अयोध्येतील सेना आणि उर्वरित भावंडांना साहाय्य मागितले असते, तर त्यांनी सहजपणे साहाय्य केले असते; मात्र वनवासात धनसंचय करायचा नसल्याने सैन्याचे वेतन, त्यांच्या युद्धसामुग्रीचा खर्च आणि त्यांना लागणारे अन्नधान्य हे पुरवता आले नसते. तसेच असे जर केले असते, तर पित्याला दिलेल्या वनवासाच्या वचनाचा भंग झाला असता. त्यामुळे प्रभु श्रीरामांनी वनातील वनवासी, वानर आदींशी जवळीक करून त्यांचे साहाय्य घेतले आणि त्यांचीच सेना उभारली. त्यामुळे या सेनेला भूक लागली की, वनातील फळांचा आहार करण्याची सवय असल्याने आणि त्यांनी तेथील वृक्ष, दगड आदींचा सहजपणे शस्त्र म्हणून वापर केल्याने रावणाच्या सैन्याशी युद्ध करणेही शक्य झाले. यातून श्रीरामाने सीतामातेची सुटका करण्याच्या आदर्श पतीधर्माचे पालन तर केलेच, त्यासह पित्याच्या वनवासाच्या वचनाचा भंग होऊ न देता आदर्श पुत्रधर्माचेही पालन केले. याद्वारे प्रभु श्रीरामाने वनवासातच कुशल संघटनाचा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे आपण हिंदूंनीही अशा प्रकारे संघटन केल्यास आणि त्यातील प्रत्येकाच्या कौशल्याचा उपयोग करून घेतल्यास हिंदु राष्ट्ररूपी ‘रामराज्य’ पुन्हा साकारणे कठीण नाही.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (१५.१.२०२४)