जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत ‘गर्वसे कहो हम हिंदू है’, असे म्हणा ! – प्रभाकर सूर्यवंशी , ‘आकार डिजी ९’

कोल्हापूर येथे ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी डावीकडून श्री. विक्रम भावे, श्री प्रभाकर सूर्यवंशी, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री रावसाहेब देसाई आणि श्री सुनील घनवट

कोल्हापूर, २१ एप्रिल (वार्ता.) : आपण हिंदु म्हणून एकत्र येत नाही, तर जातीपातीत अडकलो आहोत. आपण जेव्हा हिंदू आहे, असे अभिमानाने सांगायला शिकू, तेव्हाच खर्‍या अर्थाने हिंदुत्वाला झळाली येईल. आपणही घराबाहेर जातांना भगवी टोपी, गंध लावून का बाहेर पडत नाही ? याउलट अन्य धर्मीय हे त्यांच्या धर्माची ओळख सांगणारे पोषाख घालतात. आज हिंदुत्वासाठी लढण्यासाठी काही लोकांना उभे रहावे लागते, याचे कारण हिंदूंची उदासीनता हेच आहे ! राजकारण आणि हिंदुत्व यांची सांगड घालणे योग्य नाही. छत्रपती शाहू महाराजांनी हातावर शिवलिंग कोरून घेतले होते. ते विचारांनी पुरोगामी आणि धर्माने हिंदु होते. त्यामुळे त्यांना पुरोगामी म्हणू नका. आमचा धर्म हिसकावू पहात असाल, तर ते शक्य नाही. आम्ही षड्यंत्रांना बळी पडतो. श्री. विक्रम भावे त्याचे उदाहरण आहे. त्यांनी केवळ हिंदुत्वाची कास धरली म्हणून त्यांना अटक केली. हे पुस्तक वाचल्यानंतर डॉ. दाभोलकर खटल्याला काही अर्थ नाही, वेगवेगळे आरोपी उभे करून खोटे कथानक उभे केल्याचे यातून लक्षात येते, असे परखड मत ‘आकार डिजी ९’ यू ट्यूबचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे २१ एप्रिल या दिवशी पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

श्री प्रभाकर सूर्यवंशी

या वेळी व्यासपिठावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, नागरिक उपस्थित होते.

हा पुस्तक प्रकाशन सोहळा पहा –

(सौजन्य : aakar DIGI9)

हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कुणावरही विसंबून राहून चालणार नाही ! – विक्रम भावे

श्री विक्रम भावे

माझ्या अटकेपासून ते सुटकेपर्यंत मी अनेक अनुभव घेतले आहेत. या अनुभवाचे हे पुस्तक आहे. माझी वाचकांना विनंती आहे की, या पुस्तकाकडे ‘विक्रम भावे’, असे व्यक्तीगत अनुभव म्हणून पाहू नका, तर एका हिंदुत्वनिष्ठाचे प्रातिनिधिक अनुभव म्हणून पहा, कारण आम्ही ‘जात्यात’ होतो; पण अजून कुणीतरी ‘सुपात’ असणारे आहेत. ते सुपातील जात्यात येतील, तेव्हा सुपात एक दिवस काहीच शिल्लक रहाणार नाही. या देशात हिंदुत्वनिष्ठ असणे म्हणजे अपराध आहे कि काय असे वाटण्यासारखे माझे हे अनुभव आहेत. माझी वाचकांना विनंती आहे की, हे पुस्तक वाचून अवश्य जागृती करावी. हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कुणावरही विसंबून राहून चालणार नाही, तर आपल्यालाच कष्ट घ्यावे लागणार आहेत.

मला अटक केल्यावर सीबाआयचे तत्कालीन अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंह हे अधिवक्ता पुनाळेकर यांना आयुष्यभर कारागृहात सडवण्याची धमकी देतात, तसेच मला ज्या शरद कळसकर याच्या कबुलीजबाबाच्या आधारे अटक केली, तो कबुलीजबाब कर्नाटक राज्यातील दुसर्‍या खटल्यातील आहे. वास्तविक हा पुरावा होऊ शकत नाही, असा कायदा सांगतो, असे असतांना आम्हाला अटक करण्यात आली. त्यामुळे मला आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना झालेली अटक ही खोटी असतांना सुभाष रामरूप सिंह यांना आजपर्यंत कोणत्याच न्यायालयाने अथवा अन्य कुणीही त्याविषयी विचारणा केलेली नाही, हे खेदजनक आहे.

हिंदु धर्मासाठी लढणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अन्वेषण करणार्‍या यंत्रणांकडून हिंदु विधीज्ञ परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीसह इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आतंकवादी संघटना म्हणण्याची समाजात प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. आझाद मैदानावरील दंगलीची हानीभरपाई, तसेच अनेक शेतकरी, प्लॉटधारक यांच्या लुबाडून घेतलेल्या भूमी हिंदु विधीज्ञ परिषदेने त्यांना परत मिळवून दिल्या आहेत. यासाठी आम्ही त्यांच्याकडून कोणतेही पैसे आकारले नाही. जो हिंदु धर्मासाठी लढतो, त्याच्यासाठी आम्ही सतत लढत रहाणार आहोत.  हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू, कारण तो हिंदुत्वासाठी कार्य करतो; म्हणून आमची ही भूमिका आहे. हिंदु धर्मावर टीका करणार्‍याला सर्वकाही सुविधा  देऊन हिंदु आणि भाविक यांना चेपवण्याचे काम राज्यकर्त्यांकडून केले जात आहे. महाराष्ट्रात ब्राह्मणांना शिव्या देण्यासाठी पुरोगामी ब्राह्मणांची नियुक्ती केली जाते, हे दिसून येते. या गोष्टींच्या विरोधातही हिंदूंना लढा द्यावा लागेल.

जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा ! – रावसाहेब देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्री रावसाहेब देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदुत्वाच्या कार्यासाठी ज्यांनी कारागृहवास पत्करून डगमगून न जाता त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारे पुस्तक केले हे विशेष आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. आपण सर्वांनी हिंदुत्वाच्या कार्यात सतत कार्यरत राहिले पाहिजे. जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. हिंदुत्वाचे कार्य करतांना पोलीस प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत नाही, हे दुर्दैवी आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही देव, देश आणि धर्म यांचे कार्य करत आहोत.

मान्यवरांचा सत्कार…

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सत्कार श्री. आनंदराव पोवार यांनी केला. श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांचा सत्कार अधिवक्ता योगेश जोशी यांनी केला, तर श्री. सुनील घनवट यांचा सत्कार अधिवक्ता संग्राम पाटील यांनी, तसेच श्री. विक्रम भावे यांचा सत्कार ‘सकल हिंदु समाजा’चे श्री. गजानन तोडकर यांनी केला.


विक्रम यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या अधिकार्‍यांना शिक्षा कधी ? – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यावर देश-विदेशात ही हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पसरवले गेले आणि यासाठी पोलीस यंत्रणा, राजकारणी आणि माध्यमातील काही लोक प्रयत्न करत होते. या स्वतंत्र भारतात एक ‘नॅरेटिव्ह सेट’ केले जाते आणि त्यासाठी एका तरुण हिंदु युवकाचा कशा प्रकारे बळी दिला जातो याचे ज्वलंत उदाहरण आहे. विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे ‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या एका बागुलबुवाला फसलेल्या निरपराध तरुणाचे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे. दाभोलकर प्रकरणात न्यायालयाने विक्रम भावे यांची निर्दाेष मुक्तता केली; मात्र ज्या अधिकार्‍याने विक्रम भावे यांचे जीवन उद्ध्वस्त केले त्यांना कोणती शिक्षा झाली ? हे अधिकारी आज प्रतिमहिना दीड लाख रुपये निवृत्तीवेतन घेऊन आरामात जगत आहेत. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात भारतभरात अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या सनातन संस्थेला ओढून ‘हिंदु दहशतवादी संस्था’ म्हणून कलुषित करण्याचा प्रयत्न झाला. ज्या देशात बहुसंख्यांक हिंदू रहातात त्या देशात हे घडते, हे दुर्दैवी आहे. त्यातून आपण सर्व हिंदूंनी बोध घ्यावा आणि एक हिंदू म्हणून आवाज उठवावा !

या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यावर त्याचे काही अन्वेषण होण्याच्या अगोदरच काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे घोषित केले. तर दुसरीकडे मुंबई आतंकवादी आक्रमणातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणल्यावर ‘या प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी झाली पाहिजे. कसाबप्रमाणे त्यालाही न्यायालयीन प्रक्रियेतील संबंधित सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत’, अशी मागणी केली आहे. म्हणजे हिंदुत्वनिष्ठांची चौकशी न करता ते दोषी आणि आतंकवादाचे आरोप सिद्ध झाल्यानंतरही आतंकवाद्यांना सहानुभूती अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण घेत आहेत.