हिंदुत्व, संस्कृती आणि स्वभाषा यांच्या रक्षणासाठी सदैव लढवय्याची भूमिका यशस्वीरित्या पार पाडणारे गोव्यातील प्रा. सुभाष वेलिंगकर !

ध्येयवादी आणि निर्भेळ संघ संस्कारांनी संस्कारित झालेले, तसेच हिंदु धर्म, स्वभाषाभिमान, हिंदु संस्कृती, मराठी भाषा आदींच्या रक्षणासाठी सर्वस्व समर्पित केलेले प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांना न ओळखणारा गोव्यात सापडू शकणार नाही. प्रा. सुभाष वेलिंगकर हे एक शिक्षणतज्ञ आहेत. त्यांनी गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यविस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेृतत्वाखाली ‘गोव्यात प्राथमिक शिक्षणात मराठी आणि कोकणी या मातृभाषेतील शाळांनाच शासकीय अनुदान देणे अन् इंग्रजी माध्यमातील शाळांचे अनुदान रहित करणे’, या मागणीसाठी ‘भारतीय भाषा संरक्षण मंच’ स्थापन करून सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले. या काळात त्यांना स्वकियांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला, तरीही न डगमगता हे आंदोलन त्यांनी तितक्याच नेटाने पुढे नेले. यानंतर त्यांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या समर्थनासाठी ‘गोवा सुरक्षा मंच’ हा राजकीय पक्ष स्थापन करून याविषयावर जागृती केली.

गोव्यात हिंदु धर्म, संस्कृती, स्वभाषा यांचे जतन करण्यासाठी आणि गोव्यातील विविध हिंदु संघटनांना संघटित करण्यासाठी ते आता कृतीशील आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर याच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची राज्यघटनात्मक मागणी केल्यावर त्यांच्या विरोधात गोव्यातील ख्रिस्त्यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडले. या वेळीही ते निर्भीडपणे या विरोधाला सामोरे गेले. गोव्याची कोकणी ही राजभाषा आहे, तर मराठीला सहभाषेचा दर्जा आहे. हा मराठी भाषेवर अन्याय असल्याने अभिजात (समृद्ध) मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ची नुकतीच स्थापना झाली आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीचे कार्य करतांना अनेक आव्हानांना प्रा. सुभाष वेलिंगकर कसे सामोरे जातात ? यासाठी कोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे ?, याविषयी त्यांच्या शब्दांत माहिती जाणून घेऊया.

प्रा. सुभाष वेलिंगकर

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. फ्रान्सिस झेवियरच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याच्या मागणीवर ख्रिस्ती, पोलीस यांच्याकडून आलेला वाईट अनुभव

‘जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर याच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करून सत्य बाहेर यावे’, अशी श्रीलंका येथे यापूर्वी झालेली मागणी मी नोव्हेंबर २०२४ मध्ये गोव्यात केली होती. ही मागणी करण्याचा मला घटनात्मक अधिकार आहे. वास्तविक फ्रान्सिस झेवियर याला गोव्यात पोर्तुगीज साम्राज्य बळकट करणे आणि गोव्यातील हिंदूंच्या येनकेनप्रकारेण धर्मांतराला गती देणे यांसाठी पाठवले होते अन् पोर्तुगिजांचा कटीबद्ध हस्तक होता. जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर याचे शव हे मुळात झेवियरचे नव्हे, तर हे शव ३ वेळा पालटले गेले असल्याचे उल्लेख वा संदर्भ लिखाणात आढळतात. गोवा सरकार फ्रान्सिस झेवियर याच्या शवप्रदर्शन सोहळ्यावर प्रतिवर्षी पैशांची उधळपट्टी करते. ‘एका शत्रूचे सरकारने जनतेच्या पैशांतून उधळपट्टी करत चालवलेले हे उदात्तीकरण म्हणजे गोवेकरांना अराष्ट्रीयतेच्या गर्तेत ढकलणे होय ! जोपर्यंत हे शव रोम किंवा पोर्तुगाल येथे पाठवत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालूच राहील’, अशी एक चळवळ मंगळुरूमध्येही रॉबर्ट रुजारियो या व्यक्तीने चालू केली आहे. मी ‘डी.एन्.ए.’ चाचणीची मागणी केल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी मडगाव येथे हिंसक आंदोलन छेडले आणि कायदा हातात घेतला. मला कह्यात घेण्याची मागणी करणार्‍या तक्रारी ख्रिस्त्यांनी गोव्यात ठिकठिकाणी नोंदवल्या. त्यांच्या दबावामुळे माझ्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. या वेळी मला अटक करण्यासाठी पोलीस अन्वेषण करत होते. माझ्या घरावर पहारा बसवला होता. माझे मित्र आणि मुले यांना त्रास देण्यात आला. पोलिसांची २ विशेष शोधपथके महाराष्ट्रात माझा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली. सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले.

श्रीक्षेत्र तपोभूमी येथील पिठाधीश पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना प्रा. सुभाष वेलिंगकर (डावीकडे)

मी कनिष्ठ न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात धाव घेतली. मी चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे नाकारलेले नसल्याने मला कह्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचे आणि जामीन देण्याचाही प्रश्न येत नसल्याचा निवाडा गोवा खंडपिठाने दिला. न्यायालयाने हा निवाडा दिल्यानंतर मी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहिलो. माझा प्रशासन आणि पोलीस यांच्यावर विश्वास अल्प असल्याने उच्च न्यायालयाचा निकाल होईपर्यंत मी ६ दिवस अत्यंत समर्थपणे भूमीगत राहिलो. याच कालावधीत गोवा पोलिसांनी दोडामार्ग येथील एका सज्जन कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री ४० पोलिसांच्या फौजफाट्यासह पोर्तुगिजांनाही लाजवणारी धाड ‘सर्च वॉरंट’विना (झडतीच्या आदेशाविना) घातली. मी कुणी एक मोठा आतंकवादी असल्याप्रमाणे हे शक्तीप्रदर्शन ख्रिस्ती दबावाखाली असलेल्या पोलीस प्रशासनाने करवून घेतले. या काळात माझ्या विरोधात आणि माझ्यासह माझ्या कुटुंबियांना शिव्या देणारे शेकडो व्हिडिओ काही ख्रिस्ती राजकीय नेत्यांनी प्रसारित केले. यामध्ये काही ‘सर्वधर्मसमभाववाले’ आणि ‘हिंदुत्वविरोधी’ हिंदूही नेहमीप्रमाणे सहभागी होतेच.

“झेवियर : संत की सैतान” पुस्तिका पूज्य नाणीज पीठाधीश श्रीनरेंद्रमहाराज चरणी समर्पण

२. मराठी राजभाषा करण्यासाठी मराठीप्रेमींचे ‘मराठी मतपेढी’त रूपांतर होणे अत्यावश्यक !

सध्या गोव्यात मराठी भाषेला ‘राजभाषेचा दर्जा’ देण्यासाठी ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ स्थापन झालेली आहे. वास्तविक मराठी ही केवळ भाषा नसून ती गोव्याची भारतीय अस्मिता आणि हिंदु संस्कृती आहे. मराठीप्रेमींनी नुसती ‘मराठीप्रेमी’ ही बिरुदावली लावून चालणार नाही. मराठी राजभाषा करायची असेल, तर मराठीप्रेमींचे रूपांतर ‘मराठी मतपेढी’त (मराठी व्होट बँकेत) होणे अत्यावश्यक आहे. यासाठी विस्कळीत असलेल्या, व्यक्तीगत स्वार्थ आणि मानापमान यांमध्ये अडकलेल्या सर्व फुटकळ गटांना एकत्र आणायचे आहे.

ग्रामपंचायत पातळीपर्यंत संघटित कार्यकर्त्यांची फळी आपल्याला उभारायची आहे. गोव्यात मराठी टिकली, तरच हिंदु संस्कृती आणि राष्ट्रीयता टिकेल, तसेच ही आपली निर्णायक अन् आरपार लढ्याची शेवटची लढाई आहे, हे विसरून चालणार नाही. आज ‘सुप्त’ मराठीप्रेमींना संघटित करून मराठीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आणावे लागेल. आतापर्यंत दुर्लक्षित अन् उपेक्षित मराठी चळवळीशी तरुण पिढीला, तसेच मोठ्या प्रमाणावर मातृशक्तीला जोडण्याचे काम करायचे आहे.

अयोध्येत १९९० व १९९२ मध्ये गोव्यातून कारसेवेला गेलेल्या ७०० कारसेवकांचा सत्कार करण्यासाठी आलेले अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश जगद्गुरु श्रीपरमहंस आचार्य महाराज यांचे विमानतळावर स्वागत करतांना श्री. वेलिंगकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व गोवा बजरंग दल प्रमुख नितीन फळदेसाई.

३. गोव्यात फोफावत चाललेला द्विराष्ट्रवाद आणि अराष्ट्रीयीकरण यांची प्रक्रिया फुटीरतेकडे नेणारी

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (‘पी.एफ्.आय.’चे) सरकारला ज्ञात असलेले आणि केंद्र सरकारच्या निर्देशानंतरच पोलीस ठाण्यावर तोंडदेखले बोलावून सोडलेले क्रियाशील कार्यकर्ते गोव्यात पसरलेले आहेत. काही जणांनी विदेशात आतंकवादी झाकीर नाईक याची भेट घेऊन गुप्त खलबते केल्याचे व्हिडिओ बहुप्रसारित झाले आहेत. या सगळ्यांना असलेले राजकीय अभय गोव्यातील हिंदूंसाठी घातक आहे. सांखवाळ येथील प्राचीन आणि उद्ध्वस्त झालेले श्री विजयादुर्गा मंदिर ‘वारसास्थळ’ म्हणून संरक्षित करण्यात आले आहे. या वारसास्थळाला ‘फ्रंटिसपीस’ असे म्हटले जाते. या भूमीमध्ये चर्चने चालवलेल्या बेकायदेशीर घुसखोरीला मिळणारे शासकीय संरक्षण, गोव्यातील वारसास्थळांचे धोक्याचे भवितव्य निर्देशित करते. हे संस्कृती भक्षणाचेच काम आहे. गेल्या १२ वर्षांत वेगाने बंद पडत चाललेल्या मराठी सरकारी प्राथमिक शाळा आणि याकडे सरकारची होत असलेली अक्षम्य डोळेझाक अस्वस्थ करणारी आहे. या शाळा संस्कृती जतन आणि पोषण करणारी केंद्रे होत. राजकीय सवलती आणि आमिषे यांद्वारे संपूर्ण समाजाचे झपाट्याने चाललेले राजकीय लाचारीकरण हे समाजाचे मानसिक स्वास्थ्य प्रदूषित झाल्याचे निर्देशक आहे. शिक्षणाचे इंग्रजीकरण आणि याविषयी सरकारचे विसंगत धोरण यांचा परिणाम गोव्याच्या सांस्कृतिक भवितव्यावर होणार आहे, हे निश्चित !

पूज्य स्वामी रामदेव बाबांशी स्नेहार्द्र भेट

४. देवभूमी गोव्याची प्रतिमा डागाळण्याच्या प्रयत्नांचा दुष्परिणाम

गोव्याची प्राचीन काळापासून चालत आलेली सोज्वळ, शालीन, सात्त्विक देवभूमी आणि पुण्यभूमी ही प्रतिमा पद्धतशीरपणे पूर्णतः डागाळून गोव्याला कॅसिनो, जुगार, वेश्या व्यवसाय आणि अमली पदार्थ यांचे केंद्र बनवले गेले आहे. याचे भयानक अनिष्ट परिणाम पुढे वाढत जाणार आहेत. ही परिस्थितीची आव्हाने पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहेत. सामाजिक प्रबोधन, सामाजिक स्वास्थ्य सुधारणे आणि पुढच्या पिढ्यांसमोर योग्य आदर्श निर्माण करणे यांसाठी समाजमाध्यमांचा चांगला वापर परिणामकारक ठरेल.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याशी चर्चा करतांना प्रा. सुभाष वेलिंगकर (उजवीकडे)

५. गोव्यात वारंवार उद्भवणार्‍या अराष्ट्रीयीकरणाच्या घडामोडींना सदैव संघटितपणे केलेल्या विरोधाच्या घटना

अ. पोर्तुगीज महाकवी लुईश द कार्माेईश याचा पुतळा उभारण्यास विरोध करणे : भारतियांचा ‘जनावरे’ असा उल्लेख करणारा पोर्तुगीज महाकवी लुईश द कार्माेईश याच्या मृत्यूची त्रिशताब्दी वर्ष १९८० मध्ये गोव्यात साजरी करण्याची योजना काही लोकांनी आखली होती. या योजनेला स्वातंत्र्यसैनिकांनी विरोध केला. याला जोडून आम्ही संघ कार्यकर्ते उतरवले. ओल्ड गोव्याच्या चर्चच्या विस्तीर्ण पटांगणात प्रमुख दर्शनी भागात पोर्तुगीज काळात उभारलेला या लुईश द कार्माेईश याचा पुतळा मध्यरात्री जिलेटिन लावून उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न अज्ञाताकडून करण्यात आला. या विरोधाला घाबरून हा पुतळा ओल्ड गोव्याहून म्युझियमच्या गोदामात स्थलांतरित करणे सरकारला भाग पडले. या शताब्दीविरोधात सरकारी समितीचे अध्यक्ष सभापती फ्रॉयलान माशादु यांच्या वास्को येथील निवासस्थानावर काढलेल्या निषेधमोर्चाचे नेतृत्व माझ्याकडे होते. गाजावाजा न करता तत्कालीन काँग्रेस सरकारला गुपचूप हे ‘दुष्कर्म’ करणे भाग पडले.

श्रीरामसेनाप्रमुख आदरणीय प्रमोदजी मुतालिक यांची भेट व वार्तालाप.

आ. वास्को द गामा याला भारतात येण्याला ५०० वर्षे पूर्ण होण्याचा कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडणे : वर्ष १९९७ मध्ये समुद्री दरोडेखोर वास्को द गामा याच्या भारतप्रवेशाची पंचशताब्दी मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्याचा गोव्यातील काँग्रेस सरकार आणि केंद्रातील तत्कालीन इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्णय घेतला होता. अधिवक्ता जोकिम डायस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या ‘देशप्रेमी नागरिक समिती’च्या व्यासपिठावरून छेडलेल्या यशस्वी आंदोलनात माझ्याकडे ‘कृती आणि जागृती विभागा’चा प्रमुख म्हणून दायित्व देण्यात आले होते. परिणामतः दोन्ही सरकारांना त्यांचा निर्णय गुंडाळणे भाग पडले. या आंदोलनात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी प्रभाकर सिनारी, अधिवक्ता विश्वनाथ लवांदे, नागेश करमली, अधिवक्ता नारायण नाईक, फ्लाव्हियान डायस, जयसिंगराव राणे, चंद्रकांत केंद्रे, रविंद्र शिरसाट आणि अधिवक्ता गोपाळ तांबा आदींचा सहभाग होता. माझ्या कामगिरीसाठी १९९७-९८ मध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या नवजीवन सोसायटीच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘स्वातंत्र्यसेनानी आत्माराम मयेकर पुरस्कार’ मला देण्यात आला.

भारतमाता की जय संघाच्या प्रत्यक्ष शिशु व तरुणांच्या संघटनकार्यात

इ. ‘वास्को द गामा’ शहराचे नाव पालटणे : पोर्तुगीज समुद्री दरोडेखोर वास्को द गामा याच्या नावाने गोव्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आणि प्रसिद्ध बंदर आहे. या शहराला दिलेले नाव पालटण्यासाठी वर्ष १९९८ मध्ये ‘देशप्रेमी नागरिक समिती’च्या वतीने चालू झालेल्या आंदोलनात ‘राज्य संयोजक’ म्हणून अग्रेसर राहिलो.

ई. देशभक्त आणि हिंदु वारसाभिमानी ख्रिस्ती बांधवांसह कुंकळ्ळीत कार्यरत ! : कुंकळ्ळी-सासष्टी येथे पोर्तुगीज शासनाविरोधात तेथील जनतेने छेडलेल्या स्वातंत्र्ययुद्धात बलीदान दिलेल्या १६ हिंदु पूर्वज महानायकांचे स्मारक बांधण्यात आले आहे. हे स्मारक बांधण्यात पुढाकार घेतलेले देशभक्त डॉ. प्रा. व्हेरिस्सीमो कुतिन्हो यांच्याशी मी वर्ष १९९९ पासून संपर्कात राहिलो. हिंदु-ख्रिस्ती यांना ‘समान पूर्वज’, ‘समान इतिहास’ आणि ‘समान राष्ट्रीयता’ या आधारावर एकत्र आणणार्‍या सूत्रावर कुंकळ्ळी येथे स्मारक समिती अध्यक्ष ऑस्कर मार्टिन, अधिवक्ता लेविन्सन मार्टिन्स यांच्यासह काम केले. रा.स्व. संघाच्या वतीने मी प.पू. सरसंघचालक सुदर्शनजी यांची तेथील सुमारे ५० प्रतिष्ठित देशभक्त ख्रिस्ती नागरिकांसह बैठकही आयोजित केली. यानंतर मला ‘कुंकळ्ळी-मित्र’ हा पुरस्कार कुंकळ्ळीच्या मित्रांनी दिला.

हिंदुत्व, संस्कृती आणि स्वभाषा यांची पताका सदैव तेवत ठेवण्यासाठीची उर्जा संघ संस्कारांतूनच मिळाली !

भारतमाता की जय संघाच्या प्रत्यक्ष शिशु व तरुणांच्या संघटनकार्यात

माझा पिंड ध्येयवादी संघ संस्कारांनी संस्कारित झाला आहे. ‘ध्येयवादाच्या आधारावर आपण जे करतो, ते अजिबात चुकीचे नाही’, याचा मनोमन आत्मविश्वास माझ्या मनात निर्भेळ संघ संस्कारांतूनच चिरंतन रुजलेला आहे. गोवा मुक्तीसाठी प्राणार्पण करण्याची मानसिक सिद्धता असलेले, पोर्तुगीज तुरुंगवास, पुष्कळ मारहाणीसह भोगलेले आणि भूमीगत लढ्यात भाग घेण्यासाठी कुटुंबापासून १४ वर्षे दूर रहाणे भाग पडलेले माझे स्वातंत्र्यसैनिक वडील भास्कर वेलिंगकर यांचा तेजस्वी धगधगता वारसा मला सुदैवाने लाभला आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७५ मध्ये देशावर लादलेल्या जुलमी आणीबाणीच्या विरोधात संघाने देशव्यापी सत्याग्रह आंदोलन छेडले होते. गोव्यातील सत्याग्रहाचे नेतृत्व करून मी १० मास कारावास भोगला आहे. अयोध्येत बाबरी ढाचा पाडला गेल्याच्या पार्श्वभूमीवर आणि कारसेवेत सहभागी गोव्यातील नेत्यांना होऊ घातलेल्या संभाव्य अटकेच्या शक्यतेमुळेही मी काही कालावधी भूमीगत राहिलो होतो. अशा स्थितीत लागणार्‍या खंबीर मनःस्थितीची धारणा करण्याचे योग संघकार्यात मला लाभलेले आहेत. ध्येयपूर्तीसाठी कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिक सिद्धता अशाच कठीण प्रसंगातून होत गेली. डगमगणे सोडाच, किंबहुना आवश्यकता भासल्यास पुन्हा नवी आव्हाने स्वीकारण्याची उर्मी या संकटांतूनही कायम टिकली. या सगळ्या व्यापात माझी पत्नी आणि मुले यांचे नैतिक पाठबळ मला लाभले. माझे दोन्ही पुत्र राजेंद्र आणि शैलेंद्र हे दोघेही संघ अन् समाज कार्यात सक्रीय आहेत, हे माझे सौभाग्य आहे.