Andhra Pradesh Train Accident : आंध्रप्रदेशातील रेल्वे अपघातात १४ जणांचा मृत्यू, तर ५० जण घायाळ

रेल्वेचालकाने सिग्नल न पाळल्याने झाला अपघात !

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील विजयनगरम् जिल्ह्यातील अलमांडा-कंटकपल्ली या दरम्यान २९ ऑक्टोबरला झालेल्या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण घायाळ झाले आहेत. येथे विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर  या गाडीला विशाखापट्टणम्-रायगडा पॅसेंजर या गाडीने मागून धडक दिली. याविषयी अधिकारी विश्‍वजीत साहू यांनी सांगितले की, हा अपघात मानवी चुकांमुळे झाला. मागून येणार्‍या विशाखापट्टणम्-रायगडा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या चालकाने लाल सिग्नल ओलांडल्यामुळे ही धडक झाली. यामुळे एका गाडीचे ३ आणि दुसर्‍या गाडीचे २ डबे रुळावरून घसरले.

रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, घायाळांना २ लाख रुपये आणि किरकोळ घायाळ झालेल्यांना ५० सहस्र रुपयांची हानीभरपाई घोषित केली आहे. दुसरीकडे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि राज्यातील घायाळांना प्रत्येकी २ लाख रुपये साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.