…तर हिंदू युवती गाय कापणार्‍यांसमवेत पळून गेल्या नसत्या ! – श्रीमती मीनाक्षी शरण, संस्थापक, अयोध्या फाऊंडेशन, मुंबई.

श्रीमती मीनाक्षी शरण , संस्थापक अयोध्या फाऊंडेशन मुंबई

रामनाथी, २१ जून (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंनी या भारतभूमीच्या रक्षणासाठी प्राण दिले आहेत. असे असतांना या भूमीचे तुकडे अन्य धर्मियांसाठी कसे काय देऊ शकतो ? भारतीय परंपरा, संस्कृती आपल्या थोर ऋषिमुनींनी मानवाच्या हितासाठी निर्माण केल्या आहेत. सकाळी उठल्यानंतर प्रथम भूमीला वंदन करणे, सूर्यनारायणाला वंदन करणे, ही हिंदूंची संस्कृती आहे. भगवंताला अर्पण करण्यासाठी फूल तोडण्यापूर्वी त्या झाडाची अनुमती घेण्याची हिंदु धर्माची शिकवण आहे. अशा संस्कृतीमध्ये पर्यावरणाचा र्‍हास कसा होऊ शकेल ? भारतीय संस्कृती मुळातच पर्यावरणाचे संवर्धन शिकवते.

( संग्रहीत छायाचित्र )

वर्ष २०२१-२२ मध्ये भारतातून ११ लाख ७५ सहस्र मेट्रीक टन ‘बीफ’ (गोमांस) निर्यात झाले. हे आपला धर्म आणि शास्त्र यांच्या विरोधात आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला चारा घालण्यास सांगितले जाते. आपल्या पाल्यांना गायीला चारा घालण्यास शिकवले असते, तर जे गायीला कापतात, त्यांच्यासमवेत हिंदूंच्या युवती पळून गेल्या नसत्या. स्वत:च्या पाल्यांना हिंदूंनी आपली संस्कृती शिकवली असती, तर लव्ह जिहादच्या घटना घडल्या नसत्या. हिंदूंनी आपली भारतीय संस्कृती स्वत:च्या पाल्यांना शिकवायला हवी. हिंदूंनी धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार आचरण करावे, असे परखड उद्गार मुंबईतील ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या संस्थापक श्रीमती मीनाक्षी शरण यांनी काढले. त्या येथे होत असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होत्या.