गोवा असुरक्षिततेच्‍या दिशेने !

पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

गोवा म्‍हटल्‍यावर निसर्गसंपन्‍न, निळाशार समुद्र, शांत आणि मंदिरांचे राज्‍य अशा प्रकारची ओळख आपल्‍या डोळ्‍यांसमोर येते. त्‍याच वेळी गोव्‍यावर ४५० वर्षे पोर्तुगिजांनी राज्‍य केल्‍याने ‘गोवा म्‍हणजे ख्रिस्‍ती राज्‍य, मद्य पिणार्‍यांचे राज्‍य’, असे एक चुकीचे चित्रही देशभरातील लोकांच्‍या समोर येते. ‘गोव्‍यातील लोक दिवसभर मद्यप्राशन करतात आणि मासे खात रहातात’, असेही म्‍हटले जात आहे. जेव्‍हा पर्यटक गोव्‍यात येतात, तेव्‍हा ते कसे चुकीचे आहे ? हे त्‍यांच्‍या लक्षात येते. गोव्‍यात शांतता असते. येथे आक्रमण, आघात, असंतोष नसतो, असे दिसून येत असते; मात्र गोव्‍याच्‍या या स्‍थितीला नख लावण्‍याचा प्रयत्न यापूर्वीही आणि आताही करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. जे संपूर्ण देशात गेल्‍या ७५ वर्षांपासून होत आले आहे, ते गोव्‍यातही करण्‍याचा प्रयत्न जिहाद्यांकडून केला जात आहे. गोव्‍यातील मुसलमानबहुल रूमडामळ या भागात धर्मांध मुसलमानाने पंचसदस्‍य विनायक वळवईकर यांच्‍यावर प्राणघातक आक्रमण करण्‍याचा प्रयत्न केला. हे आक्रमण येथील अनधिकृत मदरशाला केलेल्‍या विरोधातून करण्‍यात आले. आज उत्तरप्रदेश, आसाम येथे अशाच अनधिकृत मदरशांवर कारवाई करून त्‍यांना पाडले जात आहे, बंद केले जात आहे. त्‍याच वेळी भाजपचेच सरकार असणार्‍या गोव्‍यामध्‍ये अनधिकृत मदरसा चालू असणे अपेक्षित नाही. गोव्‍यात अशा मदरशाला कुणी विरोध करत आहे, त्‍या हिंदु पंचसदस्‍यावरच आक्रमण करण्‍याचे धाडस केले जात आहे, हे हिंदूंना अपेक्षित नाही. बंगाल, आसाम, काश्‍मीर येथे हिंदूंवर आक्रमणे होतात, हे एकवेळ समजण्‍यासारखे आहे; मात्र ज्‍या ठिकाणी मुसलमान अत्‍यंत अल्‍पसंख्‍यांक आहेत, तेथे ते हिंदूंवर आक्रमण करण्‍याचा प्रयत्न करतात, तेव्‍हा याकडे तितक्‍याच गांभीर्याने पहाण्‍याची आवश्‍यकता आहे. ही स्‍थिती का आली ? असा विचार केला, तर पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्य या भागात वाढत आहे, त्‍याचा हा परिणाम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बाबरी मशिदीचा स्‍मृतीदिन साजरा करण्‍याची भित्तीपत्रके याच संघटनेकडून गोव्‍यात यापूर्वी अनेकदा लावण्‍याच्‍या घटना घडलेल्‍या आहेत. या संघटनेवर देशभरात बंदी घातली असली, तरी त्‍या संघटनेचे कार्य गुप्‍तरूपाने चालू आहे, हे समजते. येथील मुसलमानांमध्‍ये जिहादी विचारांची पेरणी करण्‍यात आली आहे, हे आक्रमण त्‍याचेच दर्शक आहे. हे वैचारिक बीज आणि त्‍यातून उगवलेले आक्रमणाचे फळ हे दोन्‍ही नष्‍ट करण्‍यासाठी राज्‍य सरकारने कठोर पावले उचलण्‍याची आवश्‍यकता आहे, अन्‍यथा अन्‍य राज्‍यांत हिंदूंच्‍या संदर्भात ज्‍या काही जिहादी कारवाया केल्‍या जातात, त्‍या गोव्‍यातही चालू होतील, हे लक्षात घ्‍यायला हवे. या घटनेत एक चांगली घटना म्‍हणजे या आक्रमणाला हिंदूंनी तितक्‍याच प्रखरपणे उत्तर दिले आहे. हिंदूंनी संघटित होऊन रस्‍त्‍यावर उतरून त्‍यांची शक्‍ती जिहाद्यांना दाखवून दिली आहे. पोलिसांनी आक्रमण करणारा आयुब खान आणि त्‍याचा साथीदार यांना अटक केली आहे. आता त्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्‍यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. ही कीड चिरडण्‍यासाठी सर्व प्रकारे म्‍हणजे ज्‍याप्रमाणे उत्तरप्रदेशमध्‍ये जिहादी आरोपींचे अनधिकृत घर बुलडोझर चालवून पाडले जाते, तसे निर्णय गोव्‍यातील प्रशासनाने घेतले पाहिजेत, तर अशांवर थोडा तरी वचक निर्माण होऊ शकतो. अनधिकृत बांधकामे, अनधिकृत भंगारअड्डे आणि अनधिकृत गोमांस विक्रीची दुकाने हेच येथील तणावाचे प्रमुख कारण आहे. रूमडामळ ज्‍या मडगाव तालुक्‍यात येते, त्‍या मडगावमध्‍ये मोतीडोंगर नावाचा भाग आहे. तेथे अनेक वर्षांपासून कायदाद्रोही मुसलमानांकडून अनधिकृत बांधकामे करण्‍यात आली आहेत. त्‍यावर कारवाई करण्‍याचा आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपिठाने काही वर्षांपूर्वीच दिला आहे; मात्र इच्‍छाशक्‍तीच्‍या अभावामुळे प्रशासनाकडून त्‍यावर कारवाई करण्‍यात आलेली नाही. भविष्‍यात या भागातून जिहादी कारवाया चालू झाल्‍या, तर आश्‍चर्य वाटू नये. जिहादी मूठभर असले, तरी त्‍यांच्‍यावर ज्‍या तत्‍परतेने आणि कठोरपणे कारवाई करण्‍याची आवश्‍यकता आहे, तितक्‍या तत्‍परतेने आणि कठोरपणे ती होत नसल्‍याने अशा घटना घडत आहेत, याचा विचार केला पाहिजे. कोणतीही कायदाद्रोही कृत्‍ये कुठेही आणि कुणीही करत असेल, तर पोलीस अन् प्रशासन यांनी वेळ न दवडता कारवाई करणे आवश्‍यक असते, ते त्‍यांचे कर्तव्‍यच असते; मात्र जर ते होत नसेल, तर हाही एक कायदाद्रोहच समजला गेला पाहिजे. कर्तव्‍याचे पालन न करणार्‍यांनाही कठोर शिक्षा होऊ लागली, तर अशी वेळ येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोध !

रूमडामळ येथे जिहाद्यांकडून विरोध होत आहे, तर कळंगुट या भागात शिवप्रेमी संघटनेने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्‍याचा आदेश सरपंच जोसेफ सिक्‍वेरा यांनी दिला आहे. त्‍यांचा आरोप आहे की, हा पुतळा विनाअनुमती येथे उभारण्‍यात आला आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍याला विरोध होत आहे, तर दुसरीकडे अनधिकृत मदरशांवर कारवाई करण्‍याची मागणी केली, तर ती करणार्‍यांवर प्राणघातक आक्रमण केले जात आहे, हे गोव्‍यामध्‍ये घडत आहे, हे लक्षात घ्‍यायला हवे. ज्‍या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि त्‍यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्‍यामुळे गोवा पूर्णपणे ख्रिस्‍ती होण्‍यापासून वाचला, त्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍याला ख्रिस्‍ती सरपंचाकडून विरोध केला जात आहे. कळगुंट भागातील समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्‍या ठिकाणी कुणी छत्रपतींचा पुतळा बसवत असेल, तर त्‍याचे स्‍वागत करणे आवश्‍यक असतांना त्‍याला अनुमती नाही म्‍हणून विरोध केला जात आहे. जे पंचायतीने करणे आवश्‍यक आहे, ते अन्‍य कुणी करत असेल, तर त्‍याचे स्‍वागत करण्‍याऐवजी ते पाडण्‍याचा प्रयत्न करणे, याच्‍या विरोधात गोमंतकियांनी संघटित झाले पाहिजे. गोवा शांत आणि सुंदर ठेवण्‍याचे दायित्‍व सरकारकडे आहे. सरकारला त्‍याची जाणीव करून देण्‍यासाठी हिंदूंनी संघटित होऊन दबाव निर्माण केला पाहिजे.

गोव्‍यातील शांतता बिघडवण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांची पाळेमुळे खणून काढा !