शेतमालाला भाव आणि नोकरी द्या, अन्‍यथा गोळ्‍या तरी घाला !

नाशिक जिल्‍ह्यातील उच्‍चशिक्षित युवा शेतकर्‍यांचे पंतप्रधानांना पत्र !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक – शेतीमालाला उत्‍पादन व्‍ययावर आधारित बाजारभाव द्यावा किंवा आमच्‍या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी, नोकरी देणे शक्‍य नसल्‍यास शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन द्यावे किंवा या तीनही मागण्‍या पूर्ण करू शकत नसल्‍यास प्रशासनाला आदेश देत बंदुकीच्‍या गोळ्‍या झाडून आमचे यातनादायी जीवन संपवावे, अशा मागण्‍यांचे पत्र मुंजवाड (तालुका बागलाण) येथील उच्‍चशिक्षित युवा शेतकर्‍यांनी त्‍यांची शैक्षणिक पात्रता नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या अनोख्‍या आंदोलनाने तालुक्‍यासह जिल्‍ह्याचे लक्ष वेधले आहे.

युवा शेतकर्‍यांनी गावातून फेरी काढली. त्‍यानंतर बैठकीत गावातील असंख्‍य युवकांनी स्‍वतःच्‍या स्‍वाक्षरीने पत्र लिहिले.