आतंकवाद्यांचा निषेध करत डोंबिवली बंद ! 

ठाणे, २४ एप्रिल (वार्ता.) – डोंबिवली येथील ३ नागरिक आतंकवादी आक्रमणात ठार झाल्याने संतप्त झालेल्या येथील सर्वपक्षीय नेत्यांनी २३ एप्रिलला ‘डोंबिवली बंद’ची हाक दिली. त्याला नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २४ एप्रिलला त्यांची दुकाने, बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग दर्शवला.

नोकरदार, विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये; म्हणून डोंबिवलीत रिक्शा, कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसगाड्या चालू होत्या; मात्र नेहमी गजबजलेला रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा शांत होत्या. बंदकाळात अनुचित प्रकार होऊ नये; म्हणून डोंबिवली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा !

डोंबिवली पश्चिम येथील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. २३ एप्रिलच्या रात्री तिघांचे पार्थिव येथील भागशाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी आणले होते. नागरिकांनी तुडुंब भरलेले मैदान शोकाकुल झाले होते. या  वेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

आतंकवाद्यांविषयी जनतेच्या जे मनात आहे तेच होईल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मृतांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी डोंबिवली येथे आले होते. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. ‘आतंकवाद्यांना सोडू नका’, असे कुटुंबियांनी सांगितल्यावर ‘आतंकवाद्यांविषयी जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल’, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

डोंबिवली येथे भाजपकडून ‘हिंदु जागो रे’चा गजर ! 

भाजपकडून ‘हिंदु जागो रे’चा गजर,निदर्शनात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले नागरिक

ठाणे, २४ एप्रिल (वार्ता.) – येथे २४ एप्रिलला भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘हिंदु जागो रे’चा गजर करण्यात आला. या निदर्शनात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘हिंदु हितासाठी संघटित झालेच पािहजे. हिंदूंच्या एकजुटीमध्येच आपले हित आहे’, असा संदेश या निदर्शनातून देण्यात आला. हिंदु जागराची गाणी सामूहिक पद्धतीने गाण्यात आली. क्रूर आक्रमणाच्या निषेधाचे फलक आंदोलनकर्त्यांनी धरले होते.

डोंबिवली विधानसभेचे आमदार तथा भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार माजी नगरसेवक राहुल दामले, प्रदेश नेते शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मीतेश पेणकर, ग्रामीण पदाधिकारी नंदु परब, बाळा परब, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनाच्यावेळी उपस्थित होते. आतंकवादी प्रवृत्ती मुळापासून ठेचलीच पाहिजे, अशी जोरदार मागणी या वेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.