
सिंधुदुर्ग – पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात अनेक हिंदूंना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटत असून २४ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी आतंकवाद्यांसह पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.
कणकवली येथील पटवर्धन चौकात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला आणि त्यानंतर घोषणा देत तो जाळून पाकिस्तानचा निषेध केला. त्यानंतर २ मिनिटे शांत उभे राहून मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला शहरातील माणिक चौक येथे धर्माभिमानी हिंदूंनी पहलगाम येथील क्रूर घटनेचा निषेध केला आणि त्यानंतर आक्रमणात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी अभि वेंगुर्लेकर, शिवाजी भावसार, विजय मोरजकर, संजय शिरसाठ आदी उपस्थित होते.
बांदा शहरात हिंदु एकता मंचाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
तत्पूर्वी आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, सिद्धेश पावसकर, मराठा समाज अध्यक्ष विराज परब यांच्यासह हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुडाळ शहरातील जिजामाता चौकात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी एकत्र येत पाकिस्तानचा निषेध केला. या वेळी वन्दे मातरम्, भारतमाता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद आदी घोषणा देण्यात आल्या. ‘ऊठ हिंदु बांधवा, जागा हो ! जाती-पातीमध्ये न अडकणारा शिवरायांचा मावळा हो !’, ‘जिथे देशभक्ती, तेथेच खरेदी’, ‘आतंकवाद्यांना आसरा देणारेही आतंकवादीच’, असे फलक आंदोलनकर्त्यांनी हातात घेतले होते.
वैभववाडी येथे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने तहसीलदार यांना निवेदन देऊन पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्या पर्यटकांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली.
भारत सरकार पाकिस्तानला चोख उत्तर देईल ! – पालकमंत्री नितेश राणे

कुडाळ – भारत सरकार हे कणखर राष्ट्रभक्त आणि देशभक्त यांचे सरकार आहे. अशा घटनांनंतर सरकारने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पहलगामच्या घटनेला येणार्या काळात आपल्याकडे वाकड्या नजरेने पहाणार नाही, असे उत्तर पाकिस्तानला दिले जाईल. भारत म्हटले की, त्यांचे हात पाय कापतील, असा धडा केंद्र सरकार पाकिस्तानला शिकवेल, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे एका कार्यक्रमासाठी आले असतांना पहलगाम येथील आक्रमणाविषयी पत्रकारांशी बोलतांना दिली.