khawaja Asif :जल सिंधु करार रहित करण्यावर पाक भारताला प्रत्युत्तर देईल !

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची घोषणा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर भारताने सिंधु जल करारातून माघार घेतली, तर पाकिस्तान त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल. जागतिक बँकसुद्धा सिंधु जल करारात सहभागी आहे. त्यामुळे भारत एकटाच निर्णय घेऊ शकत नाही. पाकिस्तान भारतीय कारवाईला चोख प्रत्युत्तर देईल, पाकिस्तान कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली आहे. भारताने पहलगाम येथील आक्रमणानंतर पाकविरोधात घेतलेल्या ५ महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सिंधु जल करार रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. करार रहित झाल्यामुळे भारतातून पाकमध्ये वहात जाणार्‍या सिंधु नदीचे पाणी पाकला न सोडण्याचा निर्णय भारत घेऊ शकणार आहे.

१. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार आणि जल संसाधन मंत्री मियां मोइन वट्टू यांनी या निर्णयाला ‘अपरिपक्व’ आणि ‘देशांतर्गत समस्यांवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न’ असे म्हटले आहे.

ख्वाजा आसिफ

२. पाकच्या सिंध तरक्की पसंद पार्टीचे नेते डॉ. कादिर मगसी यांनी भारताच्या या निर्णयावर टीका केली आहे. मगसी म्हणाले की, सिंधु जल करार रहित करून भारत पाकिस्तानात गृहयुद्ध चालू करू इच्छित आहे. हे एक षड्यंत्र आहे, ज्यामुळे केवळ पाकिस्तानचेच नव्हे, तर भारताचीही हानी होऊ शकते.

३. मगसी यांनी पाकिस्तान सरकारला हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांत मांडण्याची विनंती केली आहे. भारताचा निर्णय आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या नियमांचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी भारताला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आणि सांगितले की, पाकिस्तान सध्या गंभीर परिस्थितीतून जात आहे.

संपादकीय भूमिका

हा करार रहित झाल्यानंतर पाकला अणूबाँबपेक्षा अधिक हानी पोचणार आहे. हा निर्णय भारताने काही वर्षांपूर्वीच घेणे आवश्यक होते !