नवी देहली – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर यांना ‘इस्लामिक स्टेट काश्मीर’ या आतंकवादी संघटनेकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर गौतम गंभीर यांनी देहली पोलिसांशी संपर्क साधला आणि त्वरित कारवाईची मागणी केली. २२ एप्रिल या दिवशी गौतम गंभीर यांना धमकीचे दोन ईमेल मिळाले.
गौतम गंभीर यांनी २२ एप्रिल या दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला होता. गंभीर यांनी त्यांच्या संदेशात लिहिले होते, ‘मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना. या आक्रमणासाठी उत्तरदायी असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. भारत आक्रमण करील.’
गौतम गंभीर यांच्या व्यतिरिक्त, इतर अनेक क्रिकेटपटूंनीही पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी पाकिस्तानसोबतचे क्रीडासंबंध पूर्णपणे संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाभारतात सामान्य हिंदु नागरिक सुरक्षित नाहीच, त्यासह क्रिकेटपटू आणि अन्य महनीय व्यक्तीही आतंकवादाच्या सावटाखाली जागत आहेत, हे लक्षात घ्या ! |