हिंदु पर्यटकांवर झालेल्या क्रूर आक्रमणाचा ठिकठिकाणी जाहीर निषेध !

पहलगाममधील जिहादी आक्रमण हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

मार्गदर्शन करतांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे डॉ. नीलेश लोणकर

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे येथील आंदोलन !

पारगाव (सा.मा.), दौंड (जिल्हा पुणे), २४ एप्रिल (वार्ता.) – उरी, पठाणकोट, पुलवामा आदी आतंकवादी आक्रमणांना चोख उत्तर दिल्यानंतरही अशी आक्रमणे थांबत नाहीत, हे काश्मीरच्या पहलगाममधील भीषण आतंकवादी आक्रमणामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हे जिहादी आक्रमण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग आहे. याचा केवळ निषेध न करता भारत सरकारने जिहादी अतिरेक्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे डॉ. नीलेश लोणकर यांनी केली. २४ एप्रिल या दिवशी छत्रपती संभाजी महाराज चौक, पारगाव, दौंड, पुणे येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते.

डॉ. नीलेश लोणकर म्हणाले की, काश्मीर खोर्‍यामध्ये व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा, ज्या परिसरातून सतत अतिरेकी आक्रमणे होत आहेत, तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधील उरलेले हिंदु पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदु पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा.

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

पारगावचे माजी उपसरपंच श्री. सोमनाथ आबा ताकवणे, केडगाव येथील स्वामी समर्थ पोलीस ॲकॅडमीचे श्री. संदीप टेंगलेसर, कडेठाण येथील श्री. गणेश दिवेकर, माजी सैनिक दीपक शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. पारगावचे सरपंच श्री. सुभाष तात्या बोत्रे, पारगावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. किसन नाना जगदाळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. शामराव आबा ताकवणे यांनीही आंदोलनाला उपस्थित राहून मागण्यांना पाठिंबा दर्शवला.


जयसिंगपूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निषेध !

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे निषेध करतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – पहलगाम येथील आक्रमणाचा जयसिंगपूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध केला, तसेच मृत हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. रवींद्र माने, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेंद्र राजपूत, भाजपचे श्री. राजेंद्र दाईगडे आणि श्री. रवींद्र ताडे, श्री. सचिन डोंगरे, युवा सेनेचे श्री.आकाश शिंगाडे, अधिवक्ता निलेश गांधी यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


काश्मीरमधील विषवल्ली संपवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत !

(उजवीकडे) जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांना निवेदन देतांना  पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि धारकरी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !

सांगली, २४ एप्रिल (वार्ता.) – बंगाल येथील मुर्शिदाबाद या गावात सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तेथील घुसखोर आणि दंगेखोर यांनी दंगली भडकावल्या. तेथे अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने बंगाल येथील सरकार त्वरित विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या क्रूर आक्रमणाचा आम्ही निषेध करत आहोत. या निष्पाप हिंदूंना श्रद्धांजली व्यक्त करत आहोत. या घटनेचा पूर्ण माग काढून ही विषवल्ली त्वरित संपवावी, यादृष्टीने सूड उगवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशा मागण्यांचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांना देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, धारकरी श्री. हणमंतराव पवार आदी धारकरी उपस्थित होते.


पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन !

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

पुणे – पुणे शहर शिवसेनेच्या वतीने स्वारगेट चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात पाकिस्तानच्या आतंकवादी प्रवृत्तीचा निषेध करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. ‘आतंकवाद असाच संपवला जातो !’, असा ठाम संदेश शिवसेनेच्या वतीने जनतेला देण्यात आला.

शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी आणि इतर अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.


पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाची चौकशी करून स्थानिक हिंदूंना सुरक्षा पुरवावी !

अहिल्यानगर येथे आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची अहिल्यानगर येथे आंदोलनाद्वारे मागणी

अहिल्यानगर, २४ एप्रिल (वार्ता.) – आतंकवाद्यांना स्थानिक नागरिकांचे सहकार्य होते का ? याची चौकशी करून तेथील स्थानिक हिंदूंना आणि पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंना सुरक्षा पुरवावी. या मागणीसाठी तसेच बंगाल या ठिकाणी होणारे हिंदूंवरील अत्याचार पहाता त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी या मागणीसाठी अहिल्यानगर येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी अधिवक्ता जयदीप देशपांडे, मनसेचे सुमित वर्मा, महाराष्ट्र मंदिर महासंघ अहिल्यानगर संयोजक बाळासाहेब भोरे, हिंदू संघटक अरुण (बापू) ठाणगे, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर आदी उपस्थित होते.