मुंबईत प्रतिदिन होते ४ मुलींचे अपहरण !

अशा घटनांमागे सामाजिक माध्यमांच्या अतीवापरासह इतरही अनेक कारणे असल्याचे उघड !

मुंबई – शहरामध्ये प्रतिदिन सरासरी ४ अल्पवयीन मुलींचे अपहरण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात १५ ते १७ वर्षे या वयोगटांतील मुलींचे प्रमाण अधिक आहे.

यांतील अनेक प्रकरणांमध्ये ‘समाजमाध्यमांचा अतीवापर, पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष, शाळा-महाविद्यालये यांमध्ये तरुणांचा अधिक सहवास, चित्रपटातील प्रेमकथांचा विपरीत परिणाम, लैंगिक शोषण करून धमकावणे (ब्लॅकमेलिंग)’ आदी कारणे आढळून आली आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या ५ मासात ४६८ मुलींचे अपहरण झाले असून यांतील ३५८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. वर्ष २०२१ मध्ये अपहरणाचे १ सहस्र ९३ गुन्हे नोंद करण्यात आले होते, त्यांपैकी ९४२ मुलींचा शोध लागला.

मुली बेपत्ता होण्याची अनेक प्रकरणे प्रेमसंबंधाशी निगडित असली, तरी अशा प्रकरणांतील मुली अल्पवयीन असल्यास पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो.

संपादकीय भूमिका

  • यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हेच सिद्ध होते ! हे पोलिसांना लज्जास्पद !
  • अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांना लहानपणापासूनच साधना शिकवण्यासह त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षणही दिले पाहिजे !