हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक ‘चरित्र’ मालिकेचा शुभारंभ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे चरित्र म्हणजे संतांच्या चरित्रविश्वात एक नवा सुवर्णाध्यायच !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेचे ५ खंड यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. या खंडांमुळे केवळ साधकांचीच नव्हे, तर अनेक हिंदुत्वनिष्ठांचीही भावजागृती होण्यासह त्यांना साधनेविषयी अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. हे ५ खंड म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘चरित्र’रूपी महासागराचे काही अंश आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांचे समग्र चरित्र हे साधक, हिंदुत्वनिष्ठ आदींसाठी दीपस्तंभ ठरेल, यात शंकाच नाही. या ‘चरित्र’ मालिकेचे पुढे दिलेले संक्षिप्त सामाईक मनोगत वाचून परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीयत्व लक्षात येण्यासह त्यांच्या चरित्राची महतीही कळेल.

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘चरित्र’ मालिकेचे सामाईक मनोगत !

१. युगप्रवर्तक असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अलौकिक चरित्र असलेली वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथमालिका !

पू. संदीप आळशी

‘प्रभु श्रीरामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर श्रीराम लंकेच्या युद्धात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या सर्व विरांचा भेटवस्तू देऊन आदरपूर्वक सन्मान करतो. तो त्याकरता हनुमानालाही पुढे बोलावतो. तेव्हा श्रीरामभक्त हनुमान श्रीरामाचरणी प्रार्थना करतो,

पावन अपुले चरित्र वीरा । सांगु देत मज देव अप्सरा ।
श्रवणार्थी प्रभु, अमरपणा या दीनासी यावा ।
एकच वर द्यावा । प्रभो मज एकच वर द्यावा ।।

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे प्रभु श्रीरामाचेच रूप आहेत’, असा आम्हा साधकांचा भाव आहे. त्यांच्या चरणी आमचे हेच मागणे आहे, ‘आपलेही चरित्र आम्हा साधकांना भक्तीभावाने आणि आनंदाने सदासर्वकाळ गात रहाता येवो अन् त्या योगे आपल्या कीर्तीची दुंदुभी (नगारा) त्रिखंडात निनादो ! गुरुदेवा, एवढे एक मागणे आमचे पुरवा !’ याच भावाने आम्ही ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अलौकिक चरित्र’, या ग्रंथमालिकेला आरंभ करत आहोत.

२. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरित्राचे अनन्यसाधारण महत्त्व !

२ अ. केवळ ‘संतचरित्र’ नव्हे, तर ‘युगप्रवर्तक महापुरुषाचे चरित्र’ ! : परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी भूतलावर जन्मलेली एक असामान्य विभूती ! आजपर्यंत कोणतेही संत किंवा गुरु यांच्या हातून ‘धर्मसंस्थापना आणि धर्मराज्याची (ईश्वरी राज्याची) स्थापना’, हे महत्कार्य झालेले नाही. हे कार्य प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी केले; म्हणून ते युगप्रवर्तक ठरले. श्रीरामाचे चरित्र वाल्मीकिऋषींनी आणि श्रीकृष्णाचे चरित्र महर्षि व्यासांनी लिहिले; म्हणून आज आपल्याला जीवनात श्रीराम अन् श्रीकृष्ण यांचा आदर्श ठेवता येतो.

सध्याच्या कलियुगात परात्पर गुरु डॉक्टर धर्मसंस्थापना आणि सनातन धर्मराज्याची, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी तळमळीने कार्यरत आहेत. अनेक संत आणि नाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून महर्षि यांनी सांगितल्याप्रमाणे हे कार्य परात्पर गुरु डॉक्टरांच्याच हातून होणार आहे (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक ५६, २.१.२०१६). थोडक्यात परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच कलियुगांतर्गत एका छोट्या नव्या सत्ययुगाचा आरंभ होणार आहे. अशा युगप्रवर्तकाचे हे दिव्य चरित्र आहे. या चरित्राद्वारे अशा महान विभूतीचा आदर्श पुढील अनेक पिढ्यांच्या समोर रहाणार आहे. या दृष्टीने या चरित्राला असाधारण महत्त्व आहे.

२ आ. कलियुगातील मोक्षगुरूंचे चरित्र ! : बहुतेक संत किंवा गुरु यांना हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच सत्शिष्य असतात आणि त्यांपैकी अल्प जण संतपदाचे अधिकारी असतात. याउलट परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आणि त्यांच्या कृपेने १.६.२०२२ पर्यंत सनातनचे १२३ साधक संत बनले असून, १ सहस्र १२३ साधक संत बनण्याच्या मार्गावर आहेत. हे सर्व साधक आता जीवन्मुक्त झाले आहेत. थोडक्यात परात्पर गुरु डॉक्टर मोक्षगुरुच आहेत. सध्याच्या काळात भूतलावर असे दुसरे उदाहरण आढळत नाही ! अशा मोक्षगुरूंप्रती दृढ श्रद्धा ठेवून त्यांच्या शिकवणीनुसार साधना केल्यास साधकांना मोक्षप्राप्ती करून घेणे सुलभ होणार आहे.

२ इ. घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉक्टरांप्रती साधकांची अनन्य श्रद्धा आणि भाव निर्माण होण्यासाठी चरित्र उपयुक्त ! : ‘कोरोना’ महामारी, विविध नैसर्गिक आपत्ती इत्यादींच्या स्वरूपात आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. यापुढे यापेक्षाही महाभयंकर अशा आपत्तींचा काळ येणार आहे. अशा घोर आपत्काळात केवळ गुरु आणि भगवंतच साधकांचे रक्षण करू शकतात; मात्र यासाठी साधकांच्या मनात गुरु आणि भगवंत यांच्याप्रती अनन्य श्रद्धा अन् भाव निर्माण होणे आवश्यक असते.

नाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून महर्षींनी सांगितले आहे, ‘सध्याच्या कलियुगात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले साधकांना घोर आपत्काळातून तारू शकतील !’ [संदर्भ : सप्तर्षिवाणी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून), वर्ष २०१७] या दृष्टीने साधकांची परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेली श्रद्धा आणि भाव वाढण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र निश्चितच लाभदायी ठरेल.

२ ई. सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी प्रेरणादायी असलेले चरित्र ! : परात्पर गुरु डॉक्टरांचे व्यक्तीमत्त्व हे आदर्श शिष्य, सर्वाेत्तम गुरु, थोर लेखक, विविध कलांच्या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती करण्याविषयीचे मार्गदर्शक, अध्यात्मजगतातील संशोधक, धर्मसंस्थापक, प्रभावी हिंदूसंघटक, हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुशोभित आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र साधक, शिष्य, संत, लेखक, कलाकार, संशोधक, राष्ट्रभक्त, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अशा सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे.

२ उ. ‘सनातन’चे कार्य वाढण्यास उपयुक्त ठरणारे चरित्र ! : सनातन संस्थेशी जोडले जाणारे अनेक मान्यवर, सांप्रदायिक, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ सनातनच्या कार्याची प्रशंसा करतांना म्हणतात, ‘आज धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांचा सर्वांगीण उत्कर्ष करणारी एकमेव संस्था कार्यरत आहे आणि ती म्हणजे ‘सनातन संस्था’ ! परात्पर गुरु डॉक्टर हे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांचे समग्र चरित्र ग्रंथरूपात प्रसिद्ध झाले, तर सर्व स्तरांतील समाजघटकांना त्यांचा महिमा अन् अद्वितीयता लक्षात येईल. त्यामुळे ‘सनातन’चे अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण आदींविषयीचे कार्य वाढण्यास साहाय्य होईल.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्याचरित्राची भव्यता आणि दिव्यता !

३ अ. सर्व प्रकारच्या वाचकांना आवश्यकतेनुसार बोधामृत आणि आनंद देणारे चरित्र ! : व्यक्तीची प्रकृती, साधनामार्ग आणि आध्यात्मिक पातळी यांनुसार तिच्याकडून संतांचे चरित्र आवडीने वाचले जाते. यानुसार एखाद्याला संतांच्या लौकिक जीवनात रस असतो, म्हणजे त्यांचे बालपण, शिक्षण, व्यवसाय, कुटुंबीय इत्यादी गोष्टींत रस असतो. काही साधकांना संतांनी शिष्यावस्थेत गुरुसेवा कशी केली, त्यांच्यात भाव कसा निर्माण झाला, त्यांचे गुण, वैशिष्ट्ये यांसारख्या माहितीत रस असतो. काहींना संतांचे तत्त्वज्ञान, शिकवण आणि कार्य समजून घेण्याची ओढ असते. काहींना संतांच्या अनुभूती, त्यांच्या संदर्भात सूक्ष्म-स्तरावर होणार्‍या घडामोडी, त्यांचे निर्गुण स्तरावरील कार्य इत्यादी जाणून घेण्याची जिज्ञासा असते. अशा सर्व प्रकारच्या वाचकांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरित्रातून आवश्यकतेनुसार बोधामृत मिळावे आणि त्यांना चरित्रवाचनाचा आनंद अनुभवता यावा’, यांसाठी ‘चरित्र’ मालिकेत वरील सर्वच विषयांचा अंतर्भाव केला आहे.

३ आ. चरित्राची वैविध्यता आणि व्याप्ती : परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनापूर्वजीवन, साधनाप्रवास, व्यष्टी गुण, समष्टी गुण, अद्वितीय वैशिष्ट्ये (उदा. देह, वस्तू, वास्तू आदींतील दैवी पालट), दैनंदिन कृतींमागील अध्यात्मशास्त्र, सर्वांगस्पर्शी कार्य, मौलिक शिकवण, महामृत्यूयोगाचा संशोधनात्मक अभ्यास इत्यादी अनेक उपमालिका परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘चरित्र’ मालिकेत अंतर्भूत आहेत.

‘परात्पर गुरु डॉक्टरांची ‘चरित्र’ मालिका कशा बहुविध विषयांच्या रंगांनी नटलेली आहे’, हे वरील माहितीवरून लक्षात येते. मोरपिसाला असलेल्या नाना रंगांच्या छटांमुळे जसे ते मोहक दिसते, तसे परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरित्राला असलेल्या अशा नाना रंगांच्या छटांमुळे ते विलोभनीय वाटते ! एखाद्या व्यक्तीचे इतके बहुरंगी आणि बहुढंगी चरित्र मानवजातीच्या इतिहासात आजपर्यंत लिहिले गेले असेल, असे वाटत नाही. या चरित्रामुळे संतांच्या चरित्रविश्वात एक नवा सुवर्णाध्यायच लिहिला जात आहे !

४. परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र वाचतांना भावदृष्टी ठेवा !

साधक अन् शिष्य यांच्यासाठी गुरूंविषयीची प्रत्येक आठवण, त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग, त्यांचे प्रत्येक रूप आणि त्यांची प्रत्येक शिकवण, हे अंतःकरणातील भावाला साद घालणारे असतात. साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांची ‘चरित्र’ मालिका वाचतांना ही भावदृष्टी ठेवल्यास त्यांच्यात भावाची वृद्धी होईल, त्यांना चरित्रवाचनातील आनंद अनुभवता येईल, तसेच त्यातून अधिकाधिक चैतन्याचा लाभही होईल.

५. प्रार्थना !

‘रामायण’ हे भगवंताच्या आदर्श आचरणासाठी, तर ‘भगवद्गीता’ ही प्रभूच्या अनमोल उपदेशासाठी प्रसिद्ध आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र हे रामायणासारखे आचरणीय, तर त्यांची शिकवण गीतेसारखी बोधप्रद आहे. जसे रामायण आणि गीता यांची गोडी युगानुयुगे अवीट राहिली आहे, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र अन् शिकवण यांची गोडीही युगानुयुगे अवीट राहील ! ‘ही अवीट गोडी आम्हा सर्व साधकांनाही सदैव चाखता येवो’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्याच चरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधनाप्रवास’ या ग्रंथमालिकेतील पहिला ग्रंथ !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे

  • जागतिक कीर्तीचे ‘संमोहन उपचारतज्ञ’ असलेले डॉ. आठवले साधनेकडे वळण्याची कारणे
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुप्राप्तीपूर्वी केलेला अध्यात्मप्रसार
  • गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘नामसाधना, अहं-निर्मूलन, परेच्छा-ईश्वरेच्छा, गुरु-शिष्य नाते, साक्षीभाव, अद्वैताकडे वाटचाल’ इत्यादींविषयी शिकवणे
  • गुरूंनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘सहज वागणे-बोलणे, ध्यान’ यांसारख्या माध्यमांतून (अप्रत्यक्ष) शिकवणे
  • परात्पर गुरु डॉक्टरांनी अल्पावधीतच गुरुचरणी केलेले सर्वस्वाचे अर्पण

https://sanatanshop.com/product/marathi-paratpar-guru-dr-athavale-association-with-his-guru/

 

‘साधनाप्रवास’ या उपमालिकेचे मनोगत !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधनाप्रवास’ या ग्रंथमालिकेतील पहिला ग्रंथ प्रकाशित !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास’ ही ग्रंथमालिका म्हणजे, ‘आदर्श साधक’ बनण्यासाठीचे सुगम बोधामृत !

१. गुरुप्राप्तीनंतर केवळ ३ – ४ वर्षांतच ‘गुरु’पदाला पोचलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सर्वसाधारणपणे गुरुप्राप्ती झाल्यानंतर काही वर्षे गुरूंच्या मार्गदर्शनानुसार कठोर साधना आणि सेवा केल्यानंतर एखादा शिष्य ‘गुरु’पदाचा अधिकारी बनू शकतो. परात्पर गुरु डॉ. आठवले आरंभी देवाचा विचार न करणारे होते; परंतु अध्यात्माचे महत्त्व कळल्यावर त्यांनी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आणि साधना केली. त्यांच्या तळमळीमुळे त्यांना शीघ्र गुरुप्राप्ती झाली. यानंतर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून ते केवळ ३ – ४ वर्षांतच गुरुपदाला पोचले ! यावरून त्यांच्यातील उत्तम शिष्याचे दर्शन घडते. ‘एवढ्या अल्प कालावधीत ते गुरुकृपेस कसे पात्र ठरले ?’, याचे कुतूहल काहींना वाटू शकते. त्यांचे हे कुतूहल या ग्रंथमालिकेवरून शमेल.

२. साधकांची आध्यात्मिक जडणघडण चांगली होण्यासाठी साधनेचे विविध पैलू बारकाव्यांनिशी शिकवणारी ग्रंथमालिका !

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी यांसारख्या अनेक संतांची चरित्रे आज उपलब्ध आहेत. त्यांमध्ये त्यांचे लौकिक जीवन, साधनामार्ग, शिकवण, लीला, भक्तांच्या अनुभूती इत्यादी वाचायला मिळते. या संतांच्या आध्यात्मिक जडणघडणीमध्ये ‘त्यांच्या मनाची विचारप्रक्रिया कशी झाली ? लहान-सहान प्रसंगांतूनही गुरूंनी त्यांना कसे शिकवले ? साधकावस्थेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यांमध्ये त्यांच्या साधनेच्या दृष्टीकोनांत कसे पालट झाले ? त्यांनी टप्प्याटप्प्याने तन-मन-धन यांचा त्याग कसा केला ? गुरूंनी त्यांना समष्टी साधनेची शिकवण कशी दिली ?’ इत्यादी अनेक पैलूंच्या बारकाव्यांनिशी लिहिलेले बहुधा कुठे आढळत नाही. साधकांना ही माहिती त्यांच्या साधनेतील शीघ्र प्रगतीसाठी लाभदायक ठरते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘साधनाप्रवास’ या ग्रंथमालिकेतून हा उद्देश निश्चितच साध्य होईल.

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेल्या साधनाप्रवासाच्या निमित्ताने त्यांच्या काही गुणांचे घडलेले दर्शन !

३ अ. जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती : सर्वसाधारणपणे साधक किंवा शिष्य गुरूंना प्रश्न विचारत नाहीत; केवळ त्यांनी सांगितलेले ऐकतात. परात्पर गुरु डॉक्टर गुर्वाज्ञापालनासह त्यांच्यातील जिज्ञासेमुळे गुरूंना अध्यात्मातील अनेक प्रश्न विचारून पुष्कळ शिकत असत. त्यांच्यातील संशोधक वृत्तीमुळेही ते अध्यात्मातील अनेक तत्त्वे शिकू शकले. अर्थात्च याचा उपयोग त्यांना समष्टीला अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठीही करता आला.

३ आ. चिंतनशील वृत्ती : परात्पर गुरु डॉक्टर साधकावस्थेत असतांना प्रत्येक प्रसंगाचा बुद्धीने विश्लेषणात्मक अभ्यास करत, तसेच त्या वेळी स्वतःच्या मनाचाही अभ्यास करत. त्यातून त्यांना साधनेचे वेगवेगळे पैलू उलगडत असत. याचे एक उदाहरण याप्रमाणे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुप्राप्तीच्या आधीपासूनच विविध संतांनी अध्यात्म शिकवले आणि त्यांचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षणही केले. यासंदर्भात परात्पर गुरु डॉक्टर सांगतात, ‘संतांनी मला अध्यात्म शिकवणे आणि माझे संकटांपासून रक्षण करणे, हे सर्व गुरूंनीच केले होते, हे मला फार वर्षांनी एकदा गुरु सहज बोलून गेलेल्या पुढील वाक्यावरून समजले – ‘‘तुमचे गुरु थोर म्हणून तुम्ही हे सर्व शिकलात आणि (वाईट शक्तींपासून) वाचलात !’’

परात्पर गुरु डॉक्टरांच्या अशा चिंतनशील वृत्तीची अनेक उदाहरणे या ग्रंथमालिकेत दिली आहेत. यावरून साधकांना ‘साधनेविषयीचे चिंतन कसे करायचे ?’, याचा उत्तम बोध होईल.

४. साधकांच्या अंतःकरणात साधनेची शिकवण खोलवर बिंबवणारी ग्रंथमालिका !

परात्पर गुरु डॉक्टर गुरूंकडून जे शिकायचे, ते स्वतः आचरणात आणायचेच; पण साधकांकडूनही ते तसे आचरण करवून घ्यायचे. याचे एक उदाहरण याप्रमाणे आहे. एकदा परात्पर गुरु डॉक्टर गुरूंच्या आश्रमात गेले असता गुरूंनी त्यांना सांगितले, ‘‘आश्रमाची झाडलोट करा.’’ याप्रमाणे केल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात प्रथमच ‘आपला आश्रम’ ही भावना निर्माण झाली. त्यानंतर पुढे प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टर गुरूंच्या आश्रमात किंवा गुरुपौर्णिमादी उत्सवांना गेल्यावर तेथील स्वच्छता, आवराआवर आवर्जून करत असत. काही काळाने परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनचे आश्रम स्थापन केले. तेथे साधकांमध्येही त्यांनी हा गुण रुजवला आहे.

संत किंवा गुरु यांच्याकडून जे शिकायला मिळते, ते तंतोतंत आचरणात आणतो, तोच खरा सत्शिष्य ! परात्पर गुरु डॉक्टर सत्शिष्य असल्यानेच अल्पावधीत गुरुकृपेस पात्र ठरून पुढे ‘परात्पर गुरु’ अशी उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त करू शकले. अशा थोर विभूतीमत्वाची वाणी आणि लिखाण यांत स्वाभाविकच चैतन्य येते. परात्पर गुरु डॉक्टरांची ‘साधनाप्रवास’ ही मालिकाही चैतन्यदायी आहे; त्यामुळे ती साधकांच्या अंतःकरणात साधनेची शिकवण खोलवर बिंबवणारी आहे.

५. श्री गुरुचरणी प्रार्थना !

‘परात्पर गुरु डॉक्टरांचा साधनाप्रवास’ या ग्रंथमालिकेच्या अभ्यासाने सर्व जिज्ञासू आणि साधक यांना साधनेची स्फूर्ती मिळून त्यांना गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेता येवो’, ही श्री गुरुचरणी मनोभावे प्रार्थना !’

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.