लव्ह जिहादविरोधी कायदा आणि हिंदु राष्ट्राची निर्मिती यांमध्ये पुढाकार घेणार्‍या पुणे येथील भाजप खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी !

कोथरूड (पुणे) येथील प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. सध्या त्या महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वर्ष २०२४ मध्ये राज्यसभेच्या सदस्य म्हणून शपथ घेतांना ती संस्कृत भाषेत घेतली. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. त्या पुणे शहरातील राजकारणात, तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. राजकारणात येण्यापूर्वी प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी या शिक्षणक्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी शिक्षिका म्हणून स्वत:च्या कारकीर्दीचा प्रारंभ केला होता. त्या महाराष्ट्र  विधानसभेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्य होत्या. शिक्षण आणि महिला सक्षमीकरण हे त्यांचे विशेष विषय होते. त्या उत्तम वक्तृत्व आणि विचारमंथन यांसाठी ओळखल्या जातात.

प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. हिंदुत्वाच्या कार्याकडे येण्याची प्रेरणा

आपली सनातन प्राचीन सिंधू संस्कृती ही एक अतिशय उदात्त अशी आहे आणि या जीवन पद्धतीचा अंगीकार केल्यानंतर आपल्याला स्वतःसह समाज, देश यांविषयी आणि एकंदरीतच व्यापक अशा संकल्पना स्पष्ट होतात. आपले आयुष्य कशासाठी आहे ? याची जाणीव निर्माण होते आणि ती जाणीव सगळीकडे निर्माण झाली पाहिजे. भारतामध्ये आणि भारताबाहेरसुद्धा झाली पाहिजे, एवढी मोठी शक्ती या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये आहे. याचा प्रचार, प्रसार जेवढा होईल, तेवढे विश्वाचे कल्याण होईल. त्यामुळे या व्यापक हेतूने संघ विचारांची प्रेरणा, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकीय वारसा, त्याच्यातून मिळालेली प्रेरणा या सगळ्या माध्यमांतून काम करता करता हेही एक कायमस्वरूपी दूरगामी परिणाम करणारे मूळ मूलगामी काम म्हणून हे हिंदुत्वाचे कार्य करणे आहे. राजकीय दायित्व सांभाळतांनाच कार्याचा उपयोग आपल्या देशातील सर्वांना झाला पाहिजे. सगळे जातीभेद नाहीसे होऊन ‘हिंदू एक झाला पाहिजे’ किंवा ‘हिंदुत्वाच्या विचारांचा ज्यांच्यावर पगडा आहे, असे सगळेच एक झाले पाहिजेत’, या विचाराने कार्य होते.

२. हिंदुत्वाचे कार्य करतांना येणार्‍या अडचणी हिंदुत्वाचे कार्य करतांना २ प्रकारच्या अडचणी येतात.

अ. आपल्या हिंदूंमध्ये धर्माविषयी अनेक गैरसमजूती आहेत. जसे की, यांच्यामध्ये जातीभेदच पुष्कळ आहेत किंवा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा प्रकारचे गैरसमज हे जाणीवपूर्वक हेतूपुरस्सरपणे ब्रिटीश काळामध्ये पसरवले गेले. त्यामुळे हिंदु धर्मियांमध्ये असलेले गैरसमज दूर करणे आणि त्याविषयीच्या समस्यांना सामोरे जाणे या अडचणींचा सामना करावा लागतो.

आ. वक्फ कायद्याला परधर्मियांचा विरोध – वक्फ कायदा हा सर्वसमावेशक कायदा आहे. मुसलमानांमध्ये अनेक जाती आहेत, ज्यांना डावलले गेले, त्यामुळे त्यांना सामावून घेण्यासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी वक्फने बळकावलेल्या भूमींचा उपयोग होईल का ? किंवा अनेकांच्या घेतलेल्या जागांवर कोणत्याही प्रकारचे साक्षी पुरावे नाहीत, अशांचा आक्रोश थांबवण्यासाठी काही नियमबद्धता आणता येईल का ? यासाठी हा कायदा आहे. त्याच्यामध्ये तक्रारदारसुद्धा अनेक मुसलमान बांधव आहेत. या सगळ्यांना न्याय देण्यासाठी हा वक्फ कायदा आहे; परंतु गैरसमजातून किंवा एक वेगळेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हेतूपुरस्सर विरोध केला जात आहे, अशा मनोवृत्तीचा सामना करण्याची अडचण येते.

हे ही वाचा –

भाजपच्या खासदार प्रा. (डॉ.) सौ. मेधा कुलकर्णी यांनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग !

राजकीय स्‍वार्थासाठी ब्राह्मणांवर अकारण टीका थांबवा !

ब्राह्मण समाज चुकल्यास ऐकून घ्या; पण विनाकारण कुणी शेपटीवर पाय दिला, तर सोडायचे नाही !

३. वक्फ कायद्यासंदर्भात कार्य करतांना आलेला विशेष अनुभव

संयुक्त संसदीय समिती स्थापन झाली होती. ही समिती वेगवेगळ्या साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेत होती. ‘स्टेक होल्डर’ कोण ? म्हणून प्रारंभीला वाद घातला गेला. ज्या हिंदु संघटना ‘स्टेक होल्डर’ म्हणून साक्षीदार म्हणून येऊ इच्छित होत्या, त्यांना हाकलून लावण्याचे काम कर्नाटक, तमिळनाडू येथून आलेल्या लोकांविषयी केले गेले. काही शेतकरी आले होते ते ‘स्टेक होल्डर’ कसे ? केवळ मुसलमान लोकच ‘स्टेक होल्डर’ असू शकतील; म्हणून पुष्कळ मोठ्या प्रमाणात दंगा केला गेला. ज्या हिंदूंच्या जागा गेल्या आहेत त्यांनी येऊ नये, हिंदु अधिवक्त्यांनी येऊ नये म्हणून दंगा केला; मात्र भारतामध्ये रहाणारा प्रत्येक नागरिक जो जो या कायद्याने बाधित होऊ शकतो, अशी प्रत्येक व्यक्ती ‘स्टेक होल्डर’ आहे. कर्नाटकच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अन्वर मणिपड्डी यांनी २ लाख ३२ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला. त्यामध्ये काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांची नावे बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांना हाकलून देत होते. विरोधी पक्ष आणि ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांनी, हिंदु खासदारांनी अतिशय तर्कहीन असा प्रतिवाद तिथे केला. हिंसात्मक विरोधसुद्धा खासदार व्यक्ती करू शकते इथपर्यंत त्यांची मजल गेली. तात्त्विक विरोधही तर्कशुद्धता हवी. मुसलमान समाजातील काही ठराविकच लोकांनी मलिदा खाल्लेला आहे. त्यामुळे हा देश ‘हदीस’ आणि ‘कुराण’ यांच्या आधारे नाही; पण राज्यघटनेने चालतो; कारण ठराविक लोकांच्या हातात लुबाडलेल्या भूमी गेल्या आहेत. याची किंमत मोठी असूनही गरीब मुसलमानांना गरीबच ठेवले गेले आहे.

हिंदु मंदिराविषयी चर्चा होते की, हिंदु मंदिरांमध्ये कुठे मुसलमान विश्वस्त आहेत ? तर मग वक्फ बोर्डावर मुसलमान आणि मुसलमानेतर का ?; मात्र एका मंदिराच्या बोर्डाची तुलना करतांना एका मंदिराच्या ट्रस्टची तुलना एका मशिदीच्या ट्रस्टशी होऊ शकेल. राज्यातील अनेक मशिदी, मदरसे, दर्गे, कब्रस्तान आणि अन्य ज्या मालमत्ता आहेत, त्याचे एक देखरेख नियामक मंडळ आहे, ते सर्वसमावेशक असले पाहिजे; म्हणून तिथे दोन मुसलमानेतर घेतले. त्यामुळे चुकीची तुलना करून दिशाभूल केली जात आहे. ‘वक्फ बाय यूजर’मध्येही एखाद्या ठिकाणची भूमी वापरायला प्रारंभ केली की, ती मुसलमानांची होऊन जाते. त्यामुळे जिथे कागदपत्रांच्या आधारे विरोध होतो, तेथे तरी असे प्रकार व्हायला नको. त्यामुळे असा विषय शासनाकडे चर्चेला आणि अभ्यासाला येणार अन् त्यानंतर त्याच्यातून होणारे निर्णय जो दोन्ही बाजूंना लागू होणार आहे.

पुण्यात एके ठिकाणी भिंतीला हिरवा रंग मारल्याचे लक्षात आल्यावर त्या भिंतीला भगवा रंग देऊन देवतेची प्रतिमा तेथे ठेवली

४. हिंदुत्वावरील आघातांना सामोरे जातांना मनाची होणारी विचारप्रक्रिया

हिंदुत्वावर होणार्‍या आघातांचे प्रश्न सोडवतांना विचार असतात किंवा भीती नसते. कोणत्याच व्यक्तीची, कोणत्याही समाजाची निश्चिती देता येत नाही. जिथे योग्य-अयोग्यचा निवाडा जेव्हा होतो, तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी मन सिद्ध असते आणि मन सिद्ध असले की, शरीर सिद्ध असते. त्यामुळे कुणीतरी धाडस केले पाहिजे. सर्वसामान्यांचा आधार आपण असतो आणि आपणच घाबरलो, तर काही अर्थ नाही. त्यांनी पदही स्वीकारू नये.

हनुमान जयंतीच्या दिवशी पुणे येथील पुण्येश्वर मारुति मंदिर येथे गदापूजन

भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात नियमित सहभागी असतात. पुणे येथे महाशिवरात्री आणि नवरात्र यांनिमित्ताने सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला त्या भेट देतात. हनुमान जयंतीच्या दिवशी शौर्यजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या गदापूजनाच्या वेळी त्यांनी पुण्येश्वर मारुति मंदिर येथे गदापूजन केले. अशा प्रकारे राष्ट्र-धर्म कार्य करणार्‍या संघटनांच्या कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती नेहमीच त्यांची ऋणी राहील !

५. राजकारण आणि हिंदुत्व यांचा मेळ

ज्या विचारधारेवर मी काम करते तिथेही अडचणी येत नाहीत; कारण व्यापक हिंदुत्वाचाच विचार ज्या पक्षाने, ज्या संघटनेने केला त्याच विचारांचा वारसा घेऊन राजकारणात आले आहे. त्यामुळे इथेही अडचण फारशी येत नाही. जे मनात असते तेच ओठात असते.

६. महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा होणे आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे आवश्यक !

महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा होणे आवश्यक आहे. जर जनमानस पालटले नाही, तर हा कायदा करून काही उपयोग होणार नाही. कायदा अवश्य झाला पाहिजे; कारण कायद्याचे संरक्षण असेल, तर घटना घडतांना दिसली, तर शिक्षा करता येते; मात्र स्वेच्छेने कुणी मुसलमान धर्मात गेल्यास त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. म्हणून मुलींना आत्मविश्वास आणि हिंदु धर्माची जाणीव असेल, तर तिला कुणी बळजोरीने नेऊ शकत नाही. मुलींना हिंदु धर्माविषयी असलेले अज्ञान आणि दुसर्‍या धर्माचे उदात्तीकरण केले जाते, त्यामुळे त्या भुलतात. आपल्या धर्माविषयी अज्ञान असण्यात आपण पालक म्हणून कुठे कमी पडतो, ? हा प्रत्येक मातापित्याने करण्याचा विचार आहे; कारण आपण सण म्हणजे केवळ दिवाळी, गोड पदार्थ खाणे, चांगले कपडे घालणे किंवा गुढीपाडवा, म्हणजे काठीला सजवून उभी करणे येथपर्यंत मर्यादित नसून त्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे ? हे सांगितले पाहिजे. नुसते कर्मकांड म्हणजे धर्म नाही, तर त्याच्या पाठीमागचे विचार, म्हणजे हिंदु धर्म आहे. तो तो विचार जोपर्यंत तुम्ही किती उदात्त आहे, ते सांगत नाही, तोपर्यंत त्या कर्मांमध्ये बुद्धीप्रिय माणसाला निरर्थकता वाटू शकते. त्यामुळे शासनाने शासनाचे उत्तरदायित्व कायदा करून घ्यावे आणि पालकांनी स्वतःचे दायित्व धर्माचे महत्त्व सांगून घ्यावे; कारण स्वतःचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे.

हिंदु राष्ट्र निर्माण व्हावे, हीच अपेक्षा !

भारताच्या राज्यघटनेची निर्मिती झाली, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) असा शब्द त्यात घातलेला नव्हता. तो नंतरच्या काळामध्ये घातला गेला आणि राज्यघटनेची मोडतोड झाली. या आधी कुठेही ‘धर्मनिरपेक्ष’ असा शब्द घातलेला नव्हता. ‘धृ धारयति इति धर्मः ।’, म्हणजे ‘ज्या धारणेमुळे चांगले संस्कार निर्माण होतात, त्याला धर्म म्हणतात.’ त्यामुळे आपल्या जगण्याला जीवन पद्धत असली पाहिजे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती निधर्मी कशी असू शकेल ? आणि जिथे अधिकाधिक लोक एका विशिष्ट धर्माचे आहेत, देशाची फाळणीच मुळात धर्माच्या आधारावर झाली. फाळणी झालेले देश इस्लामी राष्ट्रे झाली आणि आपला देश ‘धर्मनिरपेक्ष’ झाला. आपण त्याचे परिणाम आज बघत आहोत. त्यामुळे एक हिंदु धार्मिक व्यक्ती म्हणून आपल्या राष्ट्राला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हावे किंवा असे राष्ट्र सिद्ध व्हावे, अशी अपेक्षा आहे. हिंदु कायमच सहिष्णु राहिले आहेत. आपण सर्वसमावेशक आहोत. वेगळ्या प्रार्थनाशैलीचा वापर करत त्यांनाही आपण आत्मसात् केले. जे देवाला मानत नाहीत, असे चार्वाकही आपलेच आहेत. त्यामुळे हिंदु संस्कृती ही चिरंतन, अतीप्राचीन आणि तरीसुद्धा नित्य नूतन अशी आहे. त्यामुळे ‘या विशिष्ट संस्कृतीचा पगडा असलेला हे राष्ट्र निर्माण व्हावे’, अशी माझी नक्की अपेक्षा आहे.

– प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

७. ब्राह्मण आणि त्यावरून होणार्‍या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सनातन धर्म समजून घेणे आवश्यक !

सर्व हिंदूंनी वेद, उपनिषदे आणि स्मृती यांचा अभ्यास केला पाहिजे, तरच हिंदु धर्माविषयीचे गैरसमज आपण दूर करू शकू. स्मृतींमध्ये असे लिहिले आहे की, प्रत्येक व्यक्ती ही जन्माने शूद्र असते आणि संस्काराने चढत चढत ती एक एक पायरी चढते. राजकारणामध्ये असणारी किंवा सैनिक असणारी व्यक्ती क्षत्रिय आहे. त्या वेळी जन्माने कोण आहे ? हे महत्त्वाचे नसून माझ्या अंगामध्ये ते गुणधर्म आहेत का ? हे अधिक योग्य आहे. पूर्वी आपल्याकडे ‘कास्ट’ (जात) हा शब्दच नव्हता, तर तो इंग्रजांच्या काळात आलेला आहे. आपल्याकडे वर्णव्यवस्था होती. मुळात लोकांना हे समजावून सांगितले पाहिजे की, आपल्या सनातन धर्मामध्ये सर्वांना अधिकार दिलेले आहेत. सत्यकाम जाबाल (महर्षि गौतम यांचे शिष्य) हे अशा एका गणिकेचे (सेविकेचे) पुत्र होते, त्यांना स्वत:च्या वडिलांचे नाव ठाऊक नव्हते. त्यांनी आईचे नाव लावले, तसेच उपनिषदांची निर्मिती केली. पूर्वीच्या काळी स्त्रियाही शिकत होत्या. आपल्याला गार्गी, मैत्रेयी एवढीच उदाहरणे देऊन चालणार नाहीत. पूर्वी कोणताही भेदाभेद न होता लोक शिकत होते, हे जोपर्यंत आपण लोकांना उदाहरणासहीत सांगणार नाही, तोपर्यंत त्यांच्यातील गैरसमज दूर होणार नाही आणि तोपर्यंत ते टीका करत रहातील अन् झुंडशाहीला सामोरे जावे लागेल.

८. हिंदुहितासाठी नेहमीच सक्रीय रहाणार !

अनधिकृत असणारी कोणतीही गोष्ट थांबवली पाहिजे. येथून पुढे कोणत्याही हिंदु मंदिरावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हिंदु मंदिरे सुरक्षित राहिली पाहिजेत. आपल्या लोकांच्या मिळकती सुरक्षित राहिल्या पाहिजेत. इतर धर्मियांनी त्यांच्या हक्काच्या ठिकाणी काहीही करावे, त्याला विरोध नाही; पण इतरांच्या मालमत्ता जप्त करून काही होत असेल, तिथे नक्कीच सक्रीय राहू. भोंग्यांना मुंबई उच्च न्यायालयानेही बंदीच घातली आहे. त्यामुळे मुसलमानांनी कायद्याच्या बंधनांमध्ये राहून त्यांच्या प्रार्थना कराव्यात.

– खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

हिंदूंना आवाहन !

‘एक है तो सेफ है ।’, म्हणजेच आपण एकत्र असलो, तर सुरक्षित राहू. जातीभेद, वर्णभेद विसरा. सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहेच. जातीभेद, लिंगभेद विसरा आणि एक व्हा ! राष्ट्रासाठी हितकारक जे जे आहे, त्यामध्ये सक्रीय व्हा ! नुसते एक होऊन आपापल्या घरी नाही, तर जिथे आपल्याला आपले राष्ट्र हाक मारेल, तिथे आले पाहिजे. सक्रीय झाले पाहिजे.

– प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी