छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर… ?

सध्या अत्यंत प्रचलित झालेला ‘छावा’ चित्रपट मी न बघताच हा लेख लिहिण्याचा विचार देवाने मनात दिला; कारण छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माझ्या पूर्वी वाचण्यात आला होता. तो वाचत असतांना छत्रपती संभाजी महाराज शत्रूंच्या तावडीत कसे पकडले गेले ? का पकडले गेले ? आणि औरंग्याने त्यांच्यावर किती पाशवी, अमानवी अत्याचार करून त्यांचा ४० दिवस छळ करून प्रत्येक दिवशी कशा प्रकारे मरण यातना दिल्या, हे वाचल्या. त्या यातनांविषयी वाचत असतांना मी त्यांच्या यातना स्वतः मनाच्या स्तरावर अत्यल्प अनुभवण्याचा प्रयत्न करत तो इतिहास माझ्याकडून काळजावर दगड ठेवून वाचला गेला होता. ‘छावा’ चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर माझ्या मनात पुन्हा अनेक वर्षांपासून घोळत असलेला प्रश्न परत आला, ‘जर छत्रपती संभाजी महाराज यांना दीर्घायुष्य लाभले असते तर ?’

१. …तर संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली असती !

छत्रपती संभाजी महाराज जे वयाच्या ३२ व्या वर्षी मृत्यूच्या कवेत गेले, ‘त्यांना जर किमान अजून पुढील ३० वर्षे जरी आयुष्य मिळाले असते, तर आपल्या भारताचा इतिहास आणि नकाशा काय राहिला असता ?’, या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांना पुन्हा एक प्रश्न माझ्या मनात आला तो, म्हणजे ‘गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांना अपेक्षित असलेले वतन त्यांच्या इच्छेप्रमाणे देऊ केले असते, तर छत्रपती संभाजी महाराज आज त्यांच्या काळी जिवंत राहिले असते का ?’ हा प्रश्न मनात येताच क्षणी पुढचा प्रश्न पुन्हा मनात आला, ‘गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या मनात वतनाचा मोहच जर निर्माण झाला नसता, तर काय झाले असते ?’

कु. रजनीगंधा कुर्‍हे

तेव्हा मला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की, जर गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या मनात वतनाचा विचार निर्माणच झाला नसता, तर छत्रपती संभाजी महाराज यांचे मावळ्यांचे बळ अजून वाढले असते आणि संपूर्ण भारतात भगवा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी अवघ्या हिंदुस्थानात केली असती; कारण केवळ ९ वर्षांत १२० हून अधिक अजिंक्य लढाया जिंकणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. याचा अर्थ त्यांना सरासरी प्रत्येक मासाला किमान एक लढाई करावी लागली असेल, म्हणजे पहिल्या लढाईचे घाव भरून निघत नाहीत, तोवर त्यांना दुसर्‍या लढाईची सिद्धता करावी लागली असावी. किती हे स्वराज्यप्रेम !

२. इतिहास घडवणारे आणि त्यात काळे दिवस आणणारे अशा दोन्हींकडून शिकून कृती करणे महत्त्वाचे !

यातच छत्रपती संभाजी महाराज यांचा अदम्य (अजिंक्य) पराक्रम, स्वराज्याप्रतीचे प्रेम, निःस्वार्थ राष्ट्रभक्ती आपल्या डोळ्यासमोर स्वाभाविकपणे उभा राहीलच. ३१ व्या वयात तरुण मंडळी स्वतःचा घर, संसार, मुलेबाळे सांभाळण्यात आणि स्वतःचे जीवन सावरण्यातच व्यस्त असतात. त्या वयात छत्रपती संभाजी महाराज यांनी संपूर्ण भारत हा ‘हे स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा !’ छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा एकच विचार घेऊन ते स्वराज्य पुढे चालवणे, टिकवणे आणि वाढवणे अशा तिन्ही पद्धतीने ते पुढे गेले होते अन् जात होते; परंतु ‘खरा शत्रू हा आपल्यासमवेतचा असतो !’ ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रारब्ध अशा प्रकारचे होते’, असे आपण म्हटले, तरी ‘आपण इतिहासापासून काय शिकावे ?’, हा विचार घेऊन त्याचे आचरण केले, तर इतिहासाची पुनरावृत्ती कधीच होणार नाही. त्यामुळे इतिहासाचे केवळ पारायण करून उपयोग नाही, तर इतिहास घडवणारे आणि इतिहासात काळे दिवस आणणारे अशा दोन्हींकडून शिकून तो भाग कृतीत आणला, तर आपण खर्‍या अर्थाने इतिहास शिकलो, असे म्हणू शकतो. त्यामुळे असे वाटते की, छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते, तर एक काय असे अनेक औरंगजेब आले असते, तरीही त्यांनी संपूर्ण भारत हा ‘मोगलमुक्त’ केला असता, यात शंका नाही; पण आपल्याच माणसांना जेव्हा फितुरीची वाळवी लागते, तेव्हा सत्तेची लालसा, पैशांचा मोह हा स्वराज्याला आणि स्वराज्य वाढवण्याला घातक ठरतो.

३. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अपेक्षित असलेले स्वराज्य

आज आपण अशा काळात वावरत आहोत जिथे ना आपल्याला संपूर्ण धर्माचे ज्ञान आहे, ना अधर्माचे ज्ञान आहे. त्यामुळे आपण अधर्म, म्हणजेच धर्मनिरपेक्ष स्थितीत अडकलेलो आहोत. यामुळे आपली युवा पिढी अध:पतनाला लागलेली आहे; पण आता हिंदु राष्ट्राचा प्रारंभ होणार असल्याने आज धार्मिकतेची लाट येत चाललेली आहे. आजच्या युवा पिढीने आपला देश, धर्म यांच्याशी प्रामाणिकता ठेवणे आणि सत्ता अन् स्वार्थ यांची लालसा सोडणे महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी हा भाग जरी कृतीत आणला, तरी कुटुंब, उद्योग, नोकरी, नातेवाईक यांच्याविषयीचा मत्सर, द्वेष, दांभिकता, मोह, लालसा हे सर्व विरघळून जातील आणि खर्‍या अर्थाने आपल्या अंतरात स्वराज्याची (हिंदु राष्ट्राची) निर्मिती व्हायला प्रारंभ होईल ! छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनाही असेच स्वराज्य अपेक्षित होते, यात शंका नाही.

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२५)