६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १४ वर्षे) आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ६ वर्षे) यांच्यामध्ये झालेला भावसंवाद !

‘काही दिवसांपूर्वी एकदा रात्री झोपण्यापूर्वी माझी मुलगी कु. श्रिया (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १४ वर्षे) आणि मुलगा पू. वामन (सनातनचे २ रे बालसंत, वय ६ वर्षे) यांच्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याबद्दल बोलणे चालू होते. त्या वेळी ते दोघे ‘दिवसभरात कसा भाव ठेवतो ? भावजागृतीचे कोणते प्रयोग करतो ? प.पू. गुरुदेवांना प्रार्थना कशी करतो ?’, याविषयी बोलत होते. त्या वेळी कु. श्रिया आणि पू. वामन यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.

पू. वामन राजंदेकर

१. कु. श्रिया आणि पू. वामन यांच्यात झालेला भावसंवाद !

१ अ. ‘गुरुदेवांच्या मांडीवर डोके ठेवून झोपणे आणि त्यांच्या मांडीवर बालरूपात बसणे’, असा भाव ठेवल्याने ‘त्यांनी आपल्याला जवळचे स्थान दिले आहे’, असे वाटून अहंकार वाढू शकतो’, असे पू. वामन यांनी सांगणे

पू. वामन : श्रियाताई, तू रात्री झोपतांना कसा भाव ठेवतेस ?

कु. श्रिया : मी रात्री झोपतांना ‘प.पू. गुरुदेवांच्या मांडीवर डोके ठेवून झोपले आहे आणि प.पू. गुरुदेव मला त्यांच्या मऊ हातांनी थोपटत आहेत’, असा भाव ठेवते.

पू. वामन : अरे वा ! किती छान ! तुला शांत झोप लागत असेल आणि तुझा झोपेतही नामजप चालू रहात असेल. श्रियाताई, यामुळे तुझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून तुझे रक्षणही होते. श्रियाताई, तू किती छान भाव ठेवतेस !

कु. श्रिया : ‘पू. वामन, तुम्ही कसा भाव ठेवता ?’, ते मला सांगा ना !

पू. वामन : श्रियाताई, ‘मी नारायणांच्या (टीप) चरणांशी झोपलो आहे’, असा भाव ठेवून झोपतो किंवा ‘त्यांच्या चरणांजवळ बसून खेळत आहे’, असा भाव ठेवतो. श्रियाताई, मी सांगू का तुला ? तू जो भाव ठेवतेस ना, तो छानच आहे; पण आपल्याला साधनेत नारायणांकडे जायचे आहे ना, तर अजून पुढचे पुढचे शिकायला हवे. आपण ‘सूक्ष्मातून नारायणांच्या मांडीवर डोके ठेवून झोपणे, त्यांच्या मांडीवर बालरूपात जाऊन बसणे’, असा भाव ठेवतो, तो योग्यच आहे; पण यामुळे आपला अहंकार वाढू शकतो. (टीप : पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे म्हणतात.)

कु. श्रिया राजंदेकर हिच्या हृदयात बाल संत पू. वामन राजंदेकर यांचे दर्शन होणे आणि तिच्यातील ‘संतांविषयी असलेली अतूट श्रद्धा आणि भाव’ जाणवणे

कु. श्रिया राजंदेकर

१८.११.२०२२ या दिवशी संध्याकाळी ६.३० वाजता कु. श्रिया राजंदेकर (२०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १३ वर्षे) प्रसाद भंडारात सेवा करत होती. मी तिला नमस्कार केला. तिनेही मला नमस्कार केला. त्या वेळी मी तिला सांगितले, ‘‘पू. वामन (पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर सनातनचे दुसर्‍या क्रमांकाचे बालसंत, वय ५ वर्षे) यांना माझा नमस्कार सांग.’’ तेव्हा श्रियाने मला पुन्हा नमस्कार केला; म्हणून मीही तिला डोळे मिटून नमस्कार केला. तेव्हा मला तिच्या हृदयात पू. वामन यांचे दर्शन झाले आणि ‘ते हसत आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी मला श्रियामधील संतांविषयी असलेली अतूट श्रद्धा आणि भाव दिसून आला.

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ आ. ‘साधेनत पुढे जाण्याचा मार्ग गुरूंच्या चरणांजवळच असतो’, असे पू. वामन यांनी सांगणे

कु. श्रिया : तो कसा ?

पू. वामन : आपण सूक्ष्मातून नारायणांच्या मांडीवर डोके ठेवतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःचे कौतुक वाटत असते. आपल्या मनात ‘मी गुरूंच्या मांडीवर डोके ठेवले आहे किंवा त्यांच्या मांडीवर बसले आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या जवळचे स्थान दिले आहे’, असे स्वकौतुकाचे विचार येतात. या विचारांनी आपला सूक्ष्म अहं जागृत होतो आणि आपण गुरूंच्या मांडीवर असूनही खरेतर त्यांच्यापासून दूरच असतो. आपल्याला असा भावजागृतीचा प्रयोग करून करून त्याची सवय झाली की, ‘आपल्यातील हा अहं कधी वाढतो आणि आपण गुरुचरणांपासून किती दूर जातो ?’, ते आपल्या लक्षातच येत नाही.

‘आपण नारायणांच्या चरणांजवळ डोके ठेवून झोपलो आहोत, बसलो आहोत’, असा भाव ठेवतो ना, तेव्हा आपल्यात नम्रता येते. आपल्यात शरणागतभाव निर्माण होतो. त्यामुळे आपण शिष्यभावात राहू शकतो. नारायणांच्या चरणांशीच सर्वकाही असते. साधनेत पुढे जाण्याचा मार्ग गुरूंच्या चरणांजवळ असतो आणि त्याच मार्गाने आपण त्यांच्या जवळ पोचू शकतो. नारायणांच्या चरणांजवळच मोक्ष असतो. आपण अन्यत्र कुठेही असलो, तर आपला अहं वाढत असतो. त्यामुळे आपण सतत गुरूंच्या, नारायणांच्या चरणांशीच रहायचे. आपण नारायणांच्या चरणांजवळ राहिलो की, आपण नम्र होतो. आपला अहं वाढत नाही. (आपण जड होत नाही.)

सौ. मानसी राजंदेकर

कु. श्रिया : पू. वामन, मी प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञ आहे की, ‘त्यांनी मला तुमच्यासारखा गोड गोड शब्दांत साधना सांगणारा भाऊ दिला’ आणि मी तुमच्याप्रतीही पुष्कळ कृतज्ञ आहे.

पू. वामन : अग श्रियाताई, मला हे सगळे नारायणांनीच सांगितले, शिकवले आहे; कारण मला काहीच येत नाही. नारायणच आपल्याला सगळे सांगतात. त्यामुळे आपण त्यांच्या चरणांशी कृतज्ञता व्यक्त करूया.

नंतर दोघांनीही प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि ते झोपायला गेले.

२. कु. श्रिया आणि पू. वामन यांचे बोलणे ऐकत असतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

अ. मी पू. वामन आणि श्रिया यांच्यातील संवाद शांतपणे ऐकत होते. त्यांचे बोलणे ऐकत असतांना वातावरण शांत आणि स्थिर झाले होते.

आ. रात्रीची वेळ असल्याने सगळीकडे अंधार असूनही मला खोलीत प्रकाश दिसत होता.

इ. त्यांचे हे बोलणे ऐकून मला जाणवले, ‘गुरु हे अंतर्यामी असतात. ते कुठेही असले, तरीही त्यांचे शिष्याला घडवण्याचे कार्य अविरतपणे चालूच असते.’

ई. ‘साधनेचे प्रयत्न करतांना ‘भावजागृतीचे प्रयोग आणि अन्य प्रयत्न यांतून आपल्यामध्ये भाव अन् भक्ती वृद्धींगत होत आहे ना’, याचे निरीक्षण करायला हवे. साधना सतर्कतेने आणि अंतर्मुख राहून करायला  हवी’, हे मला शिकायला मिळाले.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला या अनमोल आणि दैवी क्षणांचे साक्षीदार होण्याची, ते अनुभवण्याची संधी मिळत आहे. ‘त्यांच्या कृपेमुळेच मला शिकायला, अनुभवायला मिळालेली सूत्रे कृतीत आणता येऊ देत. मला त्यांना अपेक्षित अशी परिपूर्ण साधना करता येऊ दे’, अशी माझी प.पू. गुरुदेवांच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर, फोंडा, गोवा. (१४.३.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक