मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा काही काळ ठप्प

मुंबई – १५ जुलैला रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांत पाणी साचून वाहतुकीचे मार्ग पालटावे लागले. पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प होती. कुर्ला येथील लाल बहादूरशास्त्री मार्ग, शीव, चेंबूर, अंधेरी, वडाळा, हिंदमाता (दादर) येथील बेस्टच्या वाहतुकीचा मार्ग पालटण्यात आला. पाऊस अल्प झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली. १६ जुलैला सायंकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता.