नाशिक येथे ट्रकच्या धडकेत ९ गायींचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रकचालकास अटक

नाशिक – शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथे रस्ता ओलांडणार्‍या गायींच्या कळपाला नाशिकच्या दिशेने येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ९ गायी जागीच ठार झाल्या, तर ५ गायी घायाळ झाल्या आहेत. घायाळ झालेल्या गायींना वाहनातून पाथर्डी फाटा येथील मंगलरूप गोशाळेत उपचारासाठी नेण्यात आले. अपघातानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेनंतर ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली. ‘गायींना बरे होण्यासाठी किमान १०-१५ दिवस लागणार असून त्यानंतर त्या मूळ मालकास परत करण्यात येतील’, असे गोशाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे.