राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३०.५.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

हे सरकारला लज्जास्पद !

‘केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत. यानंतर १ लाख ९२ सहस्र खटले महाराष्ट्रातील आणि १ लाख ६४ सहस्र खटले उत्तरप्रदेशातील आहेत.’


हिंदु राष्ट्राची स्थापना नक्कीच होणार आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचा आदर करून स्वतःचे जीवन राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी व्यतीत केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना नक्कीच होणार आहे.’


समाजाला योग्य दिशा देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.

‘सनातन प्रभात नियतकालिकांनी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, वाचक, धर्मनिष्ठ यांच्यामध्ये ईश्‍वरनिष्ठा, सत्यनिष्ठा, धर्माविषयीची ओढ निर्माण केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २२ वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून ‘सनातन प्रभात’ सर्वांसमोर आणले. ‘सनातन प्रभात’मधील परखड लिखाण आणि योग्य दृष्टीकोन यांमुळे धर्मप्रेमींना योग्य दिशा मिळाली. आज अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे आणि हिंदूंवर टीका केली जात आहे. बुद्धीवाद्यांकडून समाजात द्विधास्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे.’


सर्व सरकारी कार्यालयांची भाषा सज्जनांप्रमाणे असावी !

‘देशात नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याने मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवून ‘तुमच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवायला हवा’, अशा शब्दांत फटकारले होते. याविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाची प्रतिक्रिया अतिशय तीव्र असून घटनेनुसार ही भाषा संवेदनशील असायला हवी होती.’