गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले. प्रजाजनाने त्यांचे स्वागत दारात गुढ्या उभारून केले. तेव्हापासून गुढी उभी करण्यात येते. या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्‍वराचे तत्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्व १०० पटीने अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्‍वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.

गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची सामूहिक प्रतिज्ञा आणि प्रार्थना

गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी केलेली प्रतिज्ञा (संकल्प) आणि प्रार्थना फलद्रूप होत असल्याने पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा आणि प्रार्थना करावी.

प्रतिज्ञा

१. ‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्‍चय करतो.

२. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आम्ही सदैव ढाल बनून उभे राहू.

३. देव, धर्म, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या होणार्‍या विडंबनाला तीव्र विरोध करू.

४. व्यष्टी साधना, म्हणजे नामजपादी धर्माचरण करू आणि समष्टी साधना, म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करून हिंदु धर्माची पताका संपूर्ण विश्‍वभर फडकावू.’

अशी आम्ही ब्रह्मध्वजासमोर प्रतिज्ञा करतो.

प्रार्थना

‘हे ब्रह्मदेवा आणि हे प्रतिपालक श्रीविष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापती, सूर्य आणि सात्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्तीतील चैतन्य आमच्यामध्ये सातत्याने टिकू दे. आम्हाला मिळणार्‍या शक्तीचा वापर आमच्याकडून साधनेसाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी केला जाऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे. ती शक्ती राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी वापरली जाऊ दे’, हीच आपल्याचरणी प्रार्थना !

– श्री. भरत मिरजे (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.