हिंदूंच्या पाठीत ‘खंजीर’ !

बजरंग दलाचे २६ वर्षीय युवक रिंकू शर्मा यांची अनुमाने ३० ते ४० धर्मांधांनी १० फेब्रुवारीच्या रात्री निर्घृण हत्या केली. मेहताब, दानिश, जाहिद, ताजुद्दीन आणि इस्लाम यांनी देहलीतील मंगोलपुरी भागात रहाणार्‍या रिंकू शर्मा यांच्या घरात घुसून त्यांच्या पाठीत चाकू खुपसून हत्या केल्याचे समोर आले. पाठीत चाकू खुपसल्याचे त्यांच्या मृतदेहाचे छायाचित्र सध्या सर्वत्र ‘व्हायरल’ झाले आहे. त्यामुळे या हत्येचा देशभरात व्यापक स्तरावर निषेध केला जात आहे. रिंकू यांचे कुटुंबीय आणि मित्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी अर्पण गोळा करण्याच्या कार्यात रिंकू क्रियाशील होते. या धर्मकार्यास हातभार लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी मंगोलपुरी भागातून काढलेल्या फेरीच्या वेळी रिंकू शर्मा यांनी ‘जय श्रीराम ।’च्या घोषणा दिल्या होत्या. तेव्हा आरोपी आणि रिंकू शर्मा यांच्यात वाद झाला होता. याच वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे कुटुंबीय म्हणत आहेत.

हत्यासत्र चालूच !

खरेतर गेल्या वर्षी एप्रिल मासात झालेल्या पालघर येथील साधूंच्या हत्येपासून चालू झालेले हिंदूंचे हत्यासत्र आजही चालूच आहे. साधूंच्या हत्या, लव्ह जिहादमुळे झालेल्या हिंदु युवतींच्या हत्या, अल्पसंख्य पंथातील युवतींशी प्रेम करणार्‍या हिंदु युवकांच्या दिवसाढवळ्या होणार्‍या हत्या आदी घटना ताज्या असतांनाच रिंकू शर्मा यांचे हे हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. या सर्व प्रकरणांत ‘मारले गेलेले ‘हिंदू’ असल्यानेच त्यांच्यावर आक्रमणे झाली’, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. सततच्या या हत्यासत्रांमुळे ट्विटर, फेसबूक आदी सामाजिक माध्यमांवर लक्षावधी हिंदूंनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. काहींनी तर केंद्र सरकार हिंदूंच्या रक्षणार्थ काहीच करत नसल्याने आता हिंदूंनीच हातात शस्त्र घेऊन थेट प्रतिकार करावा, अशा प्रकारे आवाहन करायला आरंभ केला आहे. देहलीत सहस्रावधी हिंदू रस्त्यावर उतरून रिंकू शर्मा यांच्या समर्थनार्थ मोर्चेही काढत आहेत. अर्थात् आतापर्यंतचा अनुभव पहाता या मोर्च्यांचा, या ‘ऑनलाईन अभियानां’चा विशेष परिणाम होतांना दिसलेला नाही. भारतभूमी आणि सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत हिंदूंचे रक्तरंजित बलीदान अव्याहत चालूच आहे.

धर्मांधांवर वचक कधी निर्माण होणार ?

मंगोलपुरीतील या हत्याकांडाच्या संदर्भात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, रिंकू यांच्यावर काठ्या, चाकू आदींचे वार चालू असतांना ते सातत्याने श्रीरामाचे नाम घेत होते. ‘जय श्रीराम’ म्हणत त्यांनी प्राण सोडला. समोर मृत्यू दिसत असतांना अशा प्रकारे श्रीरामनामाचा जयघोष करणे, यावरून त्यांची रामभक्ती दिसून येते. या देशाची स्वयंभू ओळख असलेल्या सनातन धर्माच्या आदर्श अवताराचे मंदिर उभे करण्यास या देशात विरोध का केला जातो ?, हा प्रश्‍न आहे. ‘महान भारतीय लोकशाही’चा टेंभा मिरवणारे मंदिराला होणार्‍या विरोधावर एक चकार शब्दही का उच्चारत नाहीत ? दुसरीकडे महंमद घोरी, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, अकबर, औरंगजेब यांचा उदो उदो केला जातो. शासकीय स्तरावर यावर लगाम लावला जात नाही, हे दुर्दैव !

कृतघ्नताच !

श्रीरामाचे नाव खरेतर समाजाच्या एकोप्यासाठी आदर्श आहे. ५ शतकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता कुठे हिंदूंना ‘सर्वोच्च’ न्याय मिळाला आहे. त्यामुळे अयोध्येत १०० कोटी हिंदूंचा प्राण असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी हिंदूंच्या १०० पिढ्यांनी त्याग केला आहे. असे असले, तरी ज्या मुसलमान आक्रमकांनी अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे ‘बाबरी’ उभारली, त्यांच्या वंशजांसाठी म्हणजेच आजच्या मुसलमान बांधवांसाठी ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु…’नुसार मनाने उदार होऊन हिंदूंनी अयोध्यानगरीतच मशीद उभारण्यासाठी जागाही दिली. हो आणि त्यामुळेच हिंदूंना सहिष्णुता अन् सामाजिक ऐक्य यांचे डोस पाजण्यात नेहमी चढाओढ करणारे धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी, पुरोगामी, उदारमतवादी, ‘तुकडे तुकडे गँग’ आदींनी खरेतर देशातील प्रत्येक नागरिकाला श्रीराममंदिर उभारणीस हातभार लावण्याचे जाहीर आवाहन करायला हवे. श्रीराममंदिर निधी समर्पण अभियानास मान देत मंदिरासाठी स्वत:च्या पदरचे पैसे अर्पण करून देशासमोर कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्य यांचे उदाहरण घालून देण्याची या टोळीला आवश्यकता आहे. असे करणे दूरच; पण ‘या देशातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा स्वरूपाची बांग देण्यास त्यांनी आरंभ केला आहे. ‘बहुसंख्यांकवादी आणि एकाधिकारशाही यांकडे भारत झुकत चालला आहे’, असा राग आळवण्यास आरंभ केला आहे. यास कृतघ्नता नाही, तर काय म्हणावे ? रिंकू शर्मा यांच्या पाठीत चाकू खुपसणारे रामविरोधी धर्मांध आणि सहिष्णु अन् उदार हिंदूंच्या पाठीत विश्‍वासघातरूपी खंजीर खुपसणारी ही टोळी, हे एकाच माळेतील मणी नव्हेत, तर काय ?

हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता !

थोडक्यात काय, तर आज भारतात हिंदूंच्या भावना, आशा-आकांक्षा यांना कवडीमोल मूल्यही राहिलेले नाही. काही वर्षांपूर्वी एका संतांनी सांगितले होते की, जोपर्यंत प्रत्येक हिंदूच्या घरातील एक व्यक्ती मरणार नाही, म्हणजेच जोपर्यंत १० कोटी हिंदू आपला जीव गमावणार नाहीत, तोपर्यंत या देशातील सामान्य हिंदू जागृत होणार नाही. या वाक्यातून येणारा काळ हा हिंदूंच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह उभा करणारा आहे, हे लक्षात येते. असे असले, तरी परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. हिंदूंनी क्रियमाणाचा वापर करत जागृत होण्याची आवश्यकता आहे. ‘मी भला, माझे घर भले’ या कूपमंडूक वृत्तीतून बाहेर येऊन राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांविषयी त्यांनी जाणून घेतले पाहिजे. ‘मी हिंदु म्हणून जन्माला का आलो ?’, अशी स्वत:ला न्यून लेखण्याची मनोभूमिका लाथाडून हिंदु असल्याचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. जात-पात, संप्रदाय, पद, पक्ष, संघटना आदी सर्व भेद बाजूला सारून बलशाली हिंदूसंघटन होण्यास सुसज्ज व्हायला हवे. तर आणि तरच कुणी हिंदूंकडे वाकड्या दृष्टीने पहाण्यास धजावणार नाही. असे झाले, तरच आगामी काळात कुणी ‘रिंकू शर्मा’ झालेले पहायला मिळणार नाही.