एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

बी.जी. कोळसे पाटील

पुणे, ६ फेब्रुवारी (वार्ता. ) – एल्गार परिषदेचे व्यासपीठ वापरून धार्मिक तेढ निर्माण केली जाण्याची शक्यता होती. कारण देशाचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या अरुंधती रॉय, देशात हिंदूंनी बॉम्बस्फोट केले असे म्हणणारे मुश्रीफ एल्गार परिषदेच्या व्यासपीठावर होते. त्यातच शरजील उस्मानी याने हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे उस्मानी याच्यावरच नव्हे, तर एल्गार परिषदेचे आयोजन करणार्‍या बी.जी. कोळसे पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे.

या संदर्भातील निवेदन ३ फेब्रुवारी या दिवशी स्वारगेट पोलिसांना सादर केले आहे. कोळसे पाटील यांनी उस्मानी बोलला ते चूक आहे; मात्र त्याच्या एका वाक्यावरून गदारोळ करण्याची आवश्यकता काय ?, असे वक्तव्य केले होते. प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्‍वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार असेही कोळसे पाटील यांनी सांगितले.