रेतीमाफियाच्या अटकेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

  • प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर चाकूने आक्रमण करणारा आरोपी पकडू न शकणारे अकार्यक्षम पोलीस आतंकवाद्यांना कसे पकडणार ?
  • पोलीस रेतीमाफियांना पकडत नाहीत, तर त्यांचे यामागे काही साटेलोटे आहे कि निष्क्रीयता ?
प्रतीकात्मक छायाचित्र

उमरखेड (यवतमाळ), ३१ जानेवारी (वार्ता.) – येथील रेतीमाफिया आणि कुख्यात गुंड अविनाश चव्हाण यांनी नायब तहसीलदार आणि तलाठी यांच्यावर रेतीचे ट्रॅक्टर पकडले म्हणून चाकूने आक्रमण करून घायाळ केले. या प्रकरणी त्याला अटक व्हावी यासाठी प्रयत्न करूनही अटक झाली नाही; म्हणून अनेक संघटनांनी संघटित होऊन काम बंद आंदोलन केले.

रेतीमाफियांची कामे रात्री-अपरात्री चालतात आणि त्यांच्यावर कारवाई करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेविना जीव धोक्यात घालून कार्य करावे लागते. ‘अशा गुंडांवर ‘मकोका’ लावण्यात यावा’, अशीही मागणी शासनाकडे होत आहे.