बंगालमध्ये भारत मातेच्या पूजेच्या आयोजनाची भित्तीपत्रके लावणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण

तृणमूल काँग्रेसने आक्रमण केल्याचा भाजपचा आरोप

‘बंगाल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मार खाण्याचे ठिकाण’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! केंद्रात भाजपचे सरकार असतांना बंगालमधील तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत होणे अपेक्षित होते, असेच हिंदूंना वाटते !

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या राजरहाट भागात भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण करण्यात आले, तर वाहनांची तोडफोड करण्यात आली. हे आक्रमण तृणमूल काँग्रेसचे नेते तपन चटर्जी यांच्या आदेशावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे कार्यकर्ते येथील डिरेजियो मेमोरियल कॉलेजजवळ भित्तीपत्रके लावतांना हे आक्रमण करण्यात आले. येथे भाजपकडून भारत मातेच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याची भित्तीपत्रके लावण्यात येत होती.

१. भाजपचे नेते अर्जुन सिंह यांनी ट्वीट करून माहिती दिली की, गोरुफाडी कार्यालयाजवळ तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब फेकले.

२. या घटनेच्या एक दिवस आधी भाजपने आसनसोल येथे दुचाकी फेरी काढली होती. यावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली होती. या वेळी गावठी बॉम्बही फेकण्यात आले. यात ५ ते ७ जण घायाळ झाले. पोलिसांकडे साहाय्य मागण्यात येऊनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप भाजपने केला आहे.