आज ‘भारत बंद’च्या दिवशी दूध, फळ आणि भाजीपाला यांची वाहतूकही बंद रहाणार

जनतेला वेठीस धरून होणारी आंदोलने जनताद्रोहीच !

नवी देहली – केंद्र सरकारने संमत केलेल्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या १३ दिवसांपासून देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ करण्याचे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेस, शिवसेना, माकप, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, टी.आर्.एस्. आदी २० पक्षांनी, तर १० कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ८ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा बंद पुकारण्यात आला आहे. या काळात वाहतूक बंद केली जाणार आहे. तसेच इतर वेळी ‘बंद’मधून वगळण्यात येणारे दूध, फळ, भाजीपाला यांची वाहतूकही या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही ‘बंद’ला पाठिंबा दिला असल्याने त्या बंद असणार आहेत. त्याचा परिणाम म्हणजे फळ आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद असणार आहे.