‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची निवेदनाद्वारे मागणी

जळगाव जिल्ह्यातील संदलमध्ये ओवैसी बंधूंचे फलक झळकावल्याचे प्रकरण
जळगाव – वाघोदा, ता. रावेर, जिल्हा जळगाव येथे १६ जानेवारी या दिवशी मुसलमान समुदायाने संदल (मिरवणूक) काढली होती. त्यात हिंदु समाजाला डिवचण्यासाठी मुद्दामहून ‘औरंगजेब आणि १५ मिनिटे’ असे शब्द लिहिलेले ओवैसी बंधू यांचे फलक झळकावण्यात आले होते. यासंदर्भात फलक धरणारे आणि संदलचे आयोजक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, तसेच महाराष्ट्रात औरंगजेबाचे फलक लावण्यावर बंदी घालण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समिती (यावल-रावेर विभाग) यांच्या वतीने देण्यात आले. फैजपूर येथील प्रांत काकडे यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार जगदीश गुरव यांनी निवेदन स्वीकारले. समितीच्या वतीने सर्वश्री नीलेश चौधरी, अमोल निंबाळे, धीरज भोळे, यशवंत चौधरी, स्वप्नील पवार, ऋषिकेश मराठे, निखिल माळी, तसेच सावदा, वाघोदा येथील धर्मप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात केलेल्या मागण्या
१. महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण सार्वजनिकपणे करणे, त्याचे फलक झळकवणे आदी कृत्यांवर राज्यात / जिल्ह्यात बंदी घालण्यात यावी
२. हिंदु कार्यकर्त्यांनी अफझलखान वधाचा फलक लावल्यावर स्वतःहून कारवाई करणारे पोलीस आक्षेपार्ह फलक लागल्यावर मात्र तक्रार करणार्याची वाट पाहून वेळ घालवतात आणि आरोपींना पुरावा नष्ट करण्याची संधी देतात. सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण भाषण) संदर्भात दिलेल्या आदेशात चिथावणीखोर, आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याविषयी, लिखाण अथवा हावभाव केल्याविषयी पोलिसांनी स्वतः हून गुन्हा नोंद करावा, असे म्हटले आहे, तरीही येथे पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने संबंधित पोलीस कर्मचार्यांची चौकशी करून कारवाई करावी.
सावदा पोलीस ठाणे येथे संदलमध्ये आक्षेपार्ह फलक धरल्याप्रकरणी गुन्हा नोंद !
सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांची भेट घेऊन तक्रार दिल्यानंतर आणि सर्व भूमिका समजावून सांगितल्यावर त्यांनीही तत्परतेने गुन्हा नोंदवला. धार्मिक भावना दुखावल्याविषयी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. |