कृतज्ञतेचे शब्दपुष्प, मी परम पूज्यांच्या चरणी वहातसे ।

गुरुकृपायोगाची निर्मिती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला अध्यात्मप्रसाराची सेवा मिळाली. त्या वेळी व्यवहारातील बर्‍याच व्यक्ती ‘जर-तर’ची भाषा वापरून साधनेविषयी ऐकण्याचे आणि कृती करण्याचे टाळत. पुढील काव्यात व्यवहारातील व्यक्तीचे विचार आणि त्यांवरील आध्यात्मिक दृष्टीकोन दिले आहेत.

पू. शिवाजी वटकर

जर पूर्ण होईल माझे काम, तर घेईन देवाचे नाम ।
जर घेशील नाम, तर कधीतरी गाठशील मोक्षाचे धाम ॥ १ ॥

जर मिळेल सवड, तर जाईन सत्संगाला ।
जर जाशील सत्संगाला,
तर पात्र होशील गुरूंच्या संकल्पाला (टीप १)॥ २ ॥

जर होत असेल कमाई, तर करीन सत्सेवा ।
जर करशील सत्सेवा, तर खाशील चैतन्याचा मेवा ॥ ३ ॥

जर मिळेल फुकाचे धन, तर करीन त्याग ।
जर सत्साठी करशील त्याग, तर सरतील भोग ॥ ४ ॥

जर कुणी येईल माझ्या कामी, तर त्यावरी करीन प्रीती ।
जर करशील प्रीती सर्वांवरी,
भगवंताचा हात राहील शिरी ॥ ५ ॥

‘जर-तर’ असती मनातील विकल्पाचे तरंग ।
त्यांतून बाहेर पडण्या,
गुरुचरणी भाव ठेवूनी करावा संकल्प ॥ ६ ॥

‘जर-तर’ला औषध नसते, जीव मायेतच गुरफटतसे ।
साधना करूनी, गुरुकृपा होऊनी,
आदिभ्रम (टीप २) जातसे ॥ ७ ॥

‘जर-तर’चा विचार मनी नसे, साधनेचा ध्यास लागतसे,
परम पूज्य (टीप ३) मला मोक्षाच्या वाटेने नेत असती ।
कृतज्ञतेचे शब्दपुष्प, मी परम पूज्यांच्या चरणी वहातसे ॥ ८ ॥

टीप १ – सत्संगामुळे आरंभी बुद्धीगम्य ज्ञान मिळते आणि पुढे गुरूंच्या मनात ‘शिष्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असा संकल्प निर्माण होतो.

टीप २ – साधना केल्यावर ‘मी ब्रह्मापासून वेगळा नाही’, हे बुद्धीने कळते; मात्र त्याची अनुभूती येत नाही.

टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक