रथसप्तमी

आज माघ शुक्ल पक्ष सप्तमी (१.२.२०२०) या दिवशी असलेल्या रथसप्तमीच्या निमित्ताने…

सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते.

१. ‘माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो.

२. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे.

३. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो.’

(संदर्भ : श्रीधर संदेश, जानेवारी २०१४)

रथसप्तमीचे महत्त्व

‘सर्व संख्यांमध्ये ‘सात’ या अंकाचे महत्त्व विशेष आहे. ‘सात’ या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्यासमवेत सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादी सूक्ष्म-लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या तिथीला शक्ति अन् चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्त्व आणि शक्ति, आनंद अन् शांति यांच्या लहरी २० टक्के अधिक प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या (अतीसूक्ष्म सूर्यतत्त्वाच्या) लहरी इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के अधिक प्रमाणात कार्यरत असतात.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.