मुंबई – २० एप्रिल या दिवशी शोभायात्रेसाठी एकत्र आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. वडाळामधील संगमनगर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती. ही शोभायात्रा २० एप्रिलला काढण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. प्रत्यक्षात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी २० एप्रिलला शोभायात्रेची सिद्धता चालू केल्यावर अनुमती नसल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले. त्यामुळे पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांमध्ये वाद झाला. या वेळी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.
वडाळा भागात मुसलमानांची वस्ती असल्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी पोलिसांनी शोभायात्रा काढण्याची अनुमती दिली नव्हती. २० एप्रिल या दिवशी संगमनगर येथे सकाळी शोभायात्रेची सिद्धता करण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते आले, तेव्हा पोलिसांनी त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन शोभायात्रा होऊ नये, यासाठी प्रयत्न केला. पोलिसांच्या या आडमुठेपणाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी रस्ता बंद आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी उशिरा पोलिसांनी शोभायात्रेला अनुमती दिली; मात्र ध्वनीवर्धक लावण्यास मज्जाव केला. या वेळी ध्वनीवर्धक लावण्याच्या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांनी शोभायात्रेला पुन्हा मज्जाव केला. या वेळी बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे अन् कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना शोभायात्रेसाठी सहकार्य करण्याची सूचना केली. मंगलप्रभात लोढा सायंकाळी घटनास्थळी आले. त्यानंतर पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांमध्ये संवाद होऊन शोभायात्रेला अनुमती देण्यात आली.