अपघातात ठार झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना न्याय द्या !

कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात आंदोलनाद्वारे मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

मडगाव, २० एप्रिल (वार्ता.) – पाडी, केपे येथे ‘आनंद’ या वोल्वो बसने धडक दिल्याने अपघातात ठार झालेल्या दिलीप वेळीप आणि संदेश या युवकांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी २० एप्रिलला येथील नागरिकांनी कुंकळ्ळी पोलीस ठाण्यावर आंदोलन करून केली. बसचे मालक सहकार्य करत नसून कुंकळ्ळी पोलीस ठाण्यावर येण्यास ते सिद्ध नाहीत. या २ युवकांच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास गप्प बसणार नसून पुढे जे काही होईल त्याला पोलीस आणि सरकार उत्तरदायी राहील, अशी चेतावणी देण्यात आली आहे. या वेळी रामा काणकोणकर, पत्रकार सोयरू वेळीप, वंदना गावकर आणि इतर स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अपघातात जीव गमावलेले दिलीप वेळीप हे पत्रकार सोयरू वेळीप यांचे बंधू होते. पाडी येथे वळणावर दिलीप वेळीप आणि संदेश यांच्या दुचाकीला ‘आनंद’ बसची धडक बसली होती. त्यानंतर बसचालक बस घेऊन पसार झाला होता. कुंकळ्ळी पोलिसांनी ही बस कर्नाटकात जाऊन कुंकळ्ळी येथे आणली होती.

रामा काणकोणकर म्हणाले, ‘‘बसमालकाला कुंकळ्ळी पोलीस ठाण्यावर आणून चौकशी केल्याविना गप्प बसणार नाही. त्यांच्या बसगाड्या गोव्यातून जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. बसचालकाची जामिनावर सुटका झाली आहे. युवकांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, अन्यथा स्थानिक लोक गप्प रहाणार नाहीत.’’ कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्याशी रामा काणकोणकर, सोयरू वेळीप आणि इतरांनी चर्चा करून त्यांच्या मागण्या मांडल्या अन् दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली.