
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रचाराच्या कार्याला आरंभ केला. त्या वेळी त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, सार्वजनिक प्रवचने करणे’, असे अनेक मार्ग अवलंबले. आरंभापासूनच ‘शंकानिरसन आणि चांगला साधक कसे व्हायचे ?’, हे सांगणे’, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. ‘साधकांच्या साधनेबद्दलच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर होण्यासाठी उपाय सांगणे’, हा त्यांचा स्थायीभाव आहे. ज्याप्रमाणे ‘बाळाला काय म्हणायचे आहे ?’, हे त्याच्या आईला कळते, त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांवर अचूक उपाय सांगतात. या लेखात विविध प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही उपयुक्त सूत्रे दिली आहेत.
(भाग १)

१. साधनेने प्रारब्ध न्यून होत असल्याचे लक्षात आल्यावर साधकाने त्याच्या मुलांना साधनेसाठी प्रवृत्त करणे

श्री. विष्णु जाधव : माझ्या दोन्ही मुलांना (श्री. प्रतीक जाधव आणि कु. वैष्णवी जाधव (आताच्या सौ. अनन्या पाटील) यांना)) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी वैष्णवी ८ वर्षांची होती. तेव्हा माझ्या मनात ‘ती लहान आहे. तिला आश्रमात कसे पाठवायचे ?’, असा विचार आला नाही. सत्संगात राहिल्याने माझ्या मनात पुढील विचार आले, ‘मी मुलांसाठी कितीही पैसे मिळवले किंवा त्यांनीही पैसे मिळवले, तरी त्यांचे प्रारब्ध न्यून होणार नाही. ते त्यांना भोगावेच लागेल. त्यांचे प्रारब्ध त्यांनी केलेल्या साधनेनेच न्यून होणार आहे. त्यामुळे त्यांना साधना करण्यासाठी प्रवृत्त करूया. त्यांच्या साधनेत अडथळा यायला नको.’
त्यानंतर मुलाचा (प्रतीकचा) अपघात झाला. तो रुग्णालयात बेशुद्धावस्थेत होता. त्या वेळीही माझ्या मनात विचार आला, ‘आपल्याकडे कितीही पैसे असले, तरी आपण काही करू शकत नाही. त्याची साधनाच त्याला बळ देऊ शकते आणि त्याला वाचवू शकते.’ त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘प्रतीकचे एवढे मोठे प्रारब्ध होते; पण तो साधना करत असल्याने देवाने ते न्यून केले.’ मी मुलांना नेहमी सांगतो, ‘‘आता साधनेतून माघारी फिरून ‘व्यवहारातील काहीतरी करायचे आहे’, असा विचार करू नका. जेवढे आवश्यक आहे, तेवढे देवाने आपल्याला दिले आहे. देवाने हा जन्म केवळ आपल्या साधनेसाठीच दिला आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही आश्रमात आनंदात आहात. मला तुमची काळजी नाही. ज्या दिवशी तुम्ही आश्रमात गेलात, त्याच दिवशी गुरूंचे झालात !’’
२. साक्षीभाव, निरपेक्षता आणि शिकण्याची वृत्ती असणारे वडील लाभल्याबद्दल मुलाने गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करणे

श्री. प्रतीक जाधव (श्री. विष्णु जाधव यांचा मुलगा) : बाबांचा त्याग पुष्कळ आहे. मध्यंतरी ते घरी होते. तेव्हा ते स्वतःच स्वयंपाक करायचे. त्यांना आमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही. प्रत्येक वेळी ते शिकण्याच्या स्थितीत असतात आणि शिकण्यातील आनंद घेत असतात. आता घरी असतांना त्यांच्याकडे थोडा वेळ होता. तिथे देशी गायी आहेत. बाबांनी दुधापासून संतांसाठी तूप बनवले.
सौ. कीर्ती जाधव (श्री. विष्णु जाधव यांची सून) : समष्टीत बाबांना मोठमोठ्या सेवा असतात; पण ‘स्वयंपाकघरातील कोणत्या वस्तू संपल्या आहेत ?’, हे सगळे त्यांच्या लक्षात असते.
श्री. प्रतीक जाधव : आपत्काळाच्या दृष्टीने पूर्वसिद्धता, उदा. धान्याचा साठा करणे इत्यादींचा मला कधी विचार करावा लागला नाही; कारण बाबांनी सर्व सिद्धता करून ठेवली आहे. अलीकडे त्यांच्या संदर्भात आणखी एक सूत्र माझ्या लक्षात आले, ‘बाबा त्यांच्या किंवा आमच्या जीवनात जे काही घडेल, ते सगळे स्वीकारतात.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : यालाच ‘साक्षीभाव’ म्हणतात !
श्री. प्रतीक जाधव : ते कोणत्याही प्रसंगाकडे साक्षीभावाने बघतात आणि तेवढ्याच आनंदाने त्या संदर्भातील कृती पूर्णही करतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तू साक्षीभावात रहायचे नाहीस. तू ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने वागायचे. तो तुझा मार्ग आणि ‘साक्षीभावात रहाणे’, हा बाबांचा मार्ग !
श्री. प्रतीक जाधव : ‘मी बाबांना पैशांचे साहाय्य करायला पाहिजे का ? ते बराच प्रवास करतात. तेव्हा मी त्यांच्या समवेत जायला पाहिजे का ? कधीतरी व्यावहारिक अडचण निर्माण झाली, तर मी एक मुलगा म्हणून माझे काही दायित्व असायला पाहिजे का ?’, असे प्रश्न कधी कधी माझ्या मनात येतात. तेव्हा बाबा मला स्पष्टपणे सांगतात, ‘‘तुला काय हवे ?’, ते सांग. ते मी तुला देऊ शकतो. आणखी काही करण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या गोष्टींसाठी मी आहे आणि मी ते करीन. तुम्ही तुमची साधना करा.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : खूपच छान !
श्री. प्रतीक जाधव : ‘असे बाबा मिळणे’, ही खरेच भाग्याची गोष्ट आहे परम पूज्य ! कृतज्ञ आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण उलटेही व्हायला पाहिजे. बाबांनी म्हटले पाहिजे, ‘‘असा मुलगा मिळणे फारच भाग्याचे आहे !’’
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ‘परेच्छेने वागण्यात प्रगती आहे’, या आशयाचे मार्गदर्शन साधकाच्या मनावर कोरले जाणे आणि त्याप्रमाणे त्याने संत असलेल्या पत्नीच्या सांगण्याप्रमाणे कृती करणे

श्री. विष्णु जाधव : मागच्या सत्संगामध्ये तुमचे एक वाक्य माझ्या मनावर कोरले गेले, ‘साधकाच्या साधनेचा प्रवास स्वेच्छेकडून परेच्छेकडे आणि परेच्छेकडून ईश्वरेच्छेकडे, असा व्हायला हवा.’ त्या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘आता माझी पत्नी (सनातन संस्थेच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णु जाधव (वय ५५ वर्षे)) संत आहे आणि मी किती स्वेच्छेने वागतो ! प्रगती तर परेच्छेने वागण्यात आहे.’ तेव्हापासून प्रत्येक प्रसंगात पत्नी जे सांगेल, ते करतो. त्या वेळी ‘तिने सांगितलेले माझ्या मनाला पटले नाही, तरी ते करूया’, असा विचार माझ्या मनात असतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता लक्षात आले, तुमची प्रगती कशी झाली ते ! बायकोचे एेकणे पुरुषांसाठी पुष्कळ कठीण असते. बायकांना लहानपणापासून इतरांचे ऐकायची सवय असते.
श्री. प्रतीक जाधव : साधनेत आल्यानंतर बाबांची देवावरची श्रद्धा वाढत गेली. अलीकडे ‘आईकडून मार्गदर्शन घेणे आणि त्यानुसार करणे’, यांसाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. ते प्रत्येक गोष्ट आईने सांगितल्याप्रमाणे करतात. खरेतर आईला त्या गोष्टी ठाऊकही नसतात; पण बाबांना जरी आईने सांगितलेले उत्तर बुद्धीने पटले नसले, तरीही ते ‘आईचे ऐकून त्याप्रमाणे करायला पाहिजे’, या दृष्टीकोनातून प्रयत्न करतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तूही तसेच करणार ना ? बायकोचे ऐकणार ना ?
श्री. प्रतीक जाधव : हो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (श्री. प्रतीक आणि कु. वैष्णवी यांना उद्देशून) : तुम्ही किती भाग्यवान आहात ! तुम्हाला इतके आदर्श वडील मिळाले !
(क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/905631.html