हिंदी सक्तीची करून हिंदूंमध्ये फूट पाडू नका !

मनसेचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना पत्र !

मुंबई – मराठी माणूस हा हिंदूच आहे आणि गुजराती, तमिळ बोलणारेही हिंदूच आहेत. धर्म टिकवायचा असेल, तर सर्व भाषांना सामावून घेणे आवश्यक आहे. एका समूहाची भाषा अन्य समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही. मराठी माणूस हा सहिष्णु आहे. त्याचा अपलाभ घेण्यात येत आहे. हिंदी भाषेची सक्ती करून हिंदूंमध्ये फूट पाडू नका, असे आवाहन मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना केले आहे. याविषयी संदीप देशपांडे यांनी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रामध्ये संदीप देशपांडे यांनी लिहिले आहे की, मराठ्यांनी जवळपास २०० वर्षे  भारतावर राज्य केले आहे; मात्र कधीच मराठी भाषा कोणत्याही प्रांतांवर लादली नाही. इंग्रजांनी भारत मोगलांकडून नव्हे, तर मराठ्यांकडून जिंकला. शिंदे ग्वालियरमध्ये, गायकवाड बडोद्यामध्ये, दक्षिणेत तंजावर येथे मराठ्यांचे राज्य होते; मात्र या सर्वांनी तेथील भाषा आत्मसात केली. हिंदी भाषेची सक्ती झाल्यास हिंदु समाज एकत्र येण्याऐवजी विखुरण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि ही संघटना विचारांच्या आधारावर उभी आहे. म्हणूनच हे सांगण्याचे धाडस करत आहोत. हिंदु धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप बसवाल, हा आमचा ठाम विश्वास आहे.