सांगली बाजार समितीचे त्रिभाजन !

सांगली, २० एप्रिल (वार्ता.) – सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करावे आणि मिरजेसाठी सांगलीत स्वतंत्र बाजार समिती असावी, ही मागणी शासनाने मान्य करून अध्यादेशही काढण्यात आला आहे, अशी माहिती आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पुढील १०० दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात नव्याने तालुकावार ६८ बाजार समित्यांची निर्मिती करायचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार आता राज्यात नवीन ६८ बाजार समित्या स्थापन होणार आहेत.
श्री. गाडगीळ म्हणाले की, सहकार-पणन विभागाच्या अध्यादेशानुसार बाजार समितीचे त्रिभाजन झाले असून मिरजेसाठी सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा ३ बाजार समित्या स्वतंत्र अस्तित्वात येणार आहेत. मिरज तालुक्यातील शेतकरी, ‘सांगली चेंबर ऑफ कॉर्मस’ आणि सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डमधील कर्मचारी अन् व्यापारी यांची प्रलंबित मागणी आता पूर्ण झाली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र झाली आहे.
सांगली बाजार समितीचे उत्पन्न हे मिरज तालुका आणि सांगली येथील ‘वसंतदादा मार्केट यार्ड’ मधूनच मिळत होते; परंतु या उत्पन्नापैकी ८० टक्के भाग हा जत, कवठेमहांकाळ आणि ढालगाव या ठिकाणी व्यय होत होता. त्यामुळे सांगलीतील माकर्ेट यार्डमधील रस्ते, जलनिःस्सारण अशा सुविधांसाठीही समितीला व्यय करणे कठीण होते. आमदार सुधीर गाडगीळ यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर मांडला. विधिमंडळातही त्यांनी या त्रिभाजनाची मागणी केली होती. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आहे; केवळ सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ आणि मिरज यांचीच संयुक्त बाजार समिती आहे हेही आमदार श्री. गाडगीळ यांनी निदर्शनास आणले होते.