भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद !

पणजी, २० एप्रिल (वार्ता.) – फोंडा येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणामध्ये एका दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील भटक्या कुत्र्यांची समस्या ऐरणीवर आली आहे. गोवा हे देशातील पहिले रेबिजमुक्त राज्य म्हणून गणले गेलेले आहे, तरी राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार गोव्यात सुमारे ५६ सहस्र भटकी कुत्री आहेत आणि प्रतिदिन त्यांच्याकडून सरासरी ५७ जणांना चावे घेतले जातात. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार निर्बिजीकरण मोहीम राबवते आणि यासाठी आर्थिक साहाय्य करते; मात्र या मोहिमेला राज्यातील पंचायती आणि पालिका यांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे.
फोंडा उपजिल्हा रुग्णालयात प्रतिमहा कुत्र्याने चावा घेतल्याची सुमारे ८० ते ९० प्रकरणे नोंद होतात, तसेच बाणावली, बेताळभाटी, कोलवा, कळंगुट, मांद्रे आदी समुद्रकिनार्यांवर मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आहेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील विविध समुद्रकिनार्यांवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केल्याच्या ७ घटना घडल्या आहेत. यामध्ये २ देशी, तर ५ विदेशी पर्यटक घायाळ झाले आहेत. वर्ष २०२४ मध्ये समुद्रकिनार्यांवर २२ व्यक्तींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. एकंदरित राज्यभरात वर्ष २०२३ मध्ये कुत्र्यांनी आक्रमण करण्याची ११ सहस्र ९०४ प्रकरणे, तर वर्ष २०२४ मध्ये कुत्र्यांनी आक्रमण करण्याची १७ सहस्र २३६ प्रकरणे नोंद झालेली आहेत. जानेवारी २०२५ मध्ये कुत्र्यांनी आक्रमण केल्याची १ सहस्र ७८९ प्रकरणे नोंद झालेली आहेत.
पशूसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक प्रसारमाध्यमांना माहिती देतांना म्हणाले, ‘‘पशूसंवर्धन खाते भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्यासाठी पंचायती अन् पालिका यांना प्रत्येक कुत्र्यामागे १ सहस्र ८०० रुपये देते; मात्र त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. खाते यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास सिद्ध असते. लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्यासाठी ज्या ठिकाणावरून कुत्र्यांना उचलले आहे, त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा आणून सोडणे बंधनकारक असते. अशासकीय संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवायची असते.’’
सरकारी आकडेवारीनुसार गोव्यात एकूण १९१ पंचायती आहेत आणि यामध्ये ४०० गावांचा समावेश होतो. सरकारच्या लसीकरण आणि निर्बिजीकरण मोहिमेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील केवळ ५२ पंचायती आणि मोजक्याच पालिका यांनी अर्ज केलेले आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या आक्रमक वर्तवणुकीविषयी समुद्रकिनार्यांवरील जीवरक्षकांना विशेष प्रशिक्षण
समुद्रकिनार्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘दृष्टी’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी म्हणाले, ‘‘आम्ही ‘मिशन रेबिज’ या संस्थेशी भागीदारी करून जीवरक्षकांना भटक्या कुत्र्यांच्या आक्रमक वर्तवणुकीविषयी विशेष प्रशिक्षण देत आहोत.’’ या प्रशिक्षणामुळे जीवरक्षकांना धोक्याची वेळ त्वरित समजते आणि ते संरक्षणासाठी सज्ज होतात.