
मडगाव,२० एप्रिल (वार्ता.) – कोलवा सर्कलजवळच्या गटाराची अस्वच्छता आणि त्यातून निर्माण झालेली दुर्गंधी यांमुळे या ठिकाणी बससाठी उभे रहाणार्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. फोंड्याला जाण्यासाठी कोलवा सर्कलजवळ थांबणार्या प्रवाशांना तेथील गटारातून मोठ्या प्रमाणात वहात येणार्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नाक धरून या ठिकाणी उभे रहावे लागते. हे पाणी मासळीबाजार आणि बसस्थानक या भागातून येत असल्याचे दिसून येते. प्रवासीही या ठिकाणीच कचरा टाकत असल्याने अस्वच्छतेत आणखी भर पडते. एकदा या ठिकाणी काही प्रवासी उभे असतांना एकाने त्याच्याकडील रिकामा डबा तेथे टाकला. हे पाहून ते उभ्या असलेल्या प्रवाशाने त्याला खडसावले असता तो म्हणाला, ‘‘इथे कचरा आणि दुर्गंधी कमी आहे का ? मी हा रिकामा गॅलन (डबा) टाकला, तर काय झाले ?’’ तेव्हा त्या प्रवाशाने त्याला खडसावले आणि त्याची ही वृत्ती चुकीची असल्याचे सांगितले. तरीही तो माणूस तसाच निघून गेला. या ठिकाणी काही पर्यटकही येथील नाल्यातून (गटारातून) येणार्या दुर्गंधीमुळे नाक धरून बसची वाट पहात उभे होते.
‘कोलवा सर्कल’ हे ‘मडगावचे हृदय’ असूनही अशी अस्वच्छता कशी ? नगरपालिका आणि कचरा व्यवस्थापन प्रशासन झोपले आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मडगाव नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. वरील विषयावर काही प्रवाशांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराशी संपर्क साधला.