
नगर – बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधाच्या नावाखाली चालू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करत, हिंदु समाजावर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध विश्व हिंदु परिषद, अहिल्यानगरच्या जिल्हा शिष्टमंडळाने राष्ट्रपतींसाठी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना भेटून निवेदन देतांना शिष्टमंडळात विहिंपचे जिल्हाध्यक्ष आशुतोष लांडगे, बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्रीय संयोजक, विहिंपचे जिल्हा सहमंत्री, जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख ह.भ.प. मिलिंद चवंडके आदींचा समावेश होता. या निवेदनाद्वारे विहिंपने राष्ट्रपतींकडे देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी त्वरित आणि कठोर पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुर्शिदाबाद येथून चालू झालेली हिंसा आता संपूर्ण बंगालमध्ये पसरली आहे. हिंदु धर्मीयांच्या घरी जाळपोळ, लूटमार, हत्याकांड, महिलांवर अत्याचार हे प्रकार चालू आहेत. वक्फ कायदा हा केवळ एक बहाणा असून खरा हेतू मुर्शिदाबादला हिंदूविरहित करणे हा आहे. या हिंसेत २०० हून अधिक घरे आणि दुकाने जाळण्यात आली असून शेकडो हिंदू जखमी झाले आहेत. ३ जणांचा निर्घृण खून झाला आहे. ५०० हून अधिक कुटुंबांना स्थलांतर करावे लागले आहे.
शासन यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी तर प्रशासनच या हिंसक कारवायांना प्रेरणा देत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पीडितांची भेट घेण्याऐवजी दंगल भडकावणार्या इमामांची भेट घेत आहेत.
विहिंपने निवेदनात केलेल्या मागण्या
१. पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावे.
२. या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण संस्था (एन्.आय.ए.) कडून करण्यात यावी.
३. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवण्यात यावे.
४. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर हाकलण्यात यावे आणि भारत-बांगलादेश सीमारेषेवर तात्काळ कुंपण घालण्याचे काम चालू करण्यात यावे.