गायत्री परिवाराच्या ‘ज्योती कलश यात्रे’चे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण आगमन !

‘ज्योती कलशा’चे औक्षण करतांना सनातनचे साधक श्री. उमेश नाईक

रामनाथी (गोवा) – अखिल विश्व गायत्री परिवाराचे मुख्यालय असलेल्या हरिद्वार येथील शांतीकुंज येथून अभिमंत्रित केलेला कलश घेऊन आलेल्या गायत्री परिवाराच्या ‘ज्योती कलश यात्रे’चे २० एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी सनातन परिवाराच्या वतीने या ‘ज्योती कलश यात्रे’चे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. सनातनचे साधक श्री. उमेश नाईक यांनी कलशाला कुंकू, अक्षता वाहिल्या आणि पुष्पहार अर्पण करून औक्षण केले. या ‘ज्योती कलश यात्रे’समवेत आलेल्या गायत्री परिवाराच्या पदाधिकार्‍यांना सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि हिंदु धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. आश्रम पाहिल्यानंतर अभिप्राय व्यक्त करतांना पुणे येथील गायत्री चेतना केंद्राचे प्रभारी श्री. हेमंत पुरुषोत्तम जोगळेकर म्हणाले की, सनातन संस्कृती आणि धर्म यांचे आश्रमात जतन अन् संवर्धन करण्याचे काम इतक्या सुरळीत आणि पद्धतशीरपणे केले जात आहे. ते पाहून पुष्कळ चांगले वाटले.

ज्योती कलश यात्रा म्हणजे काय ?

अखिल विश्व गायत्री परिवाराची स्थापना करणारे पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी वर्ष १९२६ मध्ये प्रज्वलित केलेल्या अखंड दीपकाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने ‘ज्योती कलश यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे, असे गायत्री चेतना केंद्राचे प्रभारी श्री. हेमंत पुरुषोत्तम जोगळेकर यांनी सांगितले. ‘यात्रेतील या दिव्य कलशात ब्रह्मा-विष्णु-महेश, मातृगण, पितृगण, ४ वेद, पंचमहाभूते, षड्दर्शने, आदित्य, अष्टवसू , एकादश रुद्र आणि सर्व कल्याणकारी देवता वास्तव्य करून आहेत. कलियुगाचा अंत करून सत्ययुग स्थापन करणारी महाकालाची चेतना सक्रीय झाली आहे’, असे ते या वेळी बोलतांना म्हणाले.