हिंदुत्व मानणार्‍यांना आरोपी करण्याचे षड्यंत्र वर्ष २००२ पासून चालू झाले ! – माधव भांडारी, राज्य प्रवक्ते, भाजप

दाभोलकर हत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता झालेले श्री. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे पुणे येथे प्रकाशन !

(डावीकडून )  श्री. अभय वर्तक,  श्री. माधव भांडारी,  श्री. विक्रम भावे (पुस्तकाचे लेखक),  आणि  अधिवक्ता संजीव पुनाळेकर

पुणे, २० एप्रिल (वार्ता.) –  मी एक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या विचारांसाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करतात, त्या सर्वांविषयी माझ्या मनात आस्था आहे. हिंदुत्वाला अपकीर्त करण्याचे, हिंदुत्व मानणार्‍यांना आरोपी करण्याचे षड्यंत्र वर्ष २००२ पासून चालू झाले. २६/११ च्या आक्रमणात हेमंत करकरे मारले गेल्यानंतर सर्व प्रसंग हिंदुत्वाला जोडण्याचा प्रयत्न झाला. याचाच भाग म्हणून काही दिवसांत साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना अटक झाली.

या देशातील हिंदुत्वनिष्ठ चळवळ, हिंदुत्वनिष्ठ संघटना मोडून काढणे, हा विरोध करणार्‍यांचा एकमेव उद्देश आहे. केवळ राजकीय पालट होऊन भागत नाही; कारण ही व्यवस्था वर्ष १९४७ पासून असल्याने ती पालटणे सोपे नाही. अगदी गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीचे संकट आले होते. ‘२६/११ चे आक्रमण २६ ऑक्टोबर या दिवशी होणार,’ अशी माहिती त्याआधी मिळाली होती. त्यानंतर अचानक ते आक्रमण एक महिना पुढे कसे काय ढकलले गेले, हे पडताळणे आवश्यक आहे.

श्री. माधव भांडारी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी काँग्रेस यांचा २६/११ च्या आक्रमणात सहभाग होता; मात्र गुप्तचर यंत्रणांचे अपयश असे सांगून त्यांच्यावर या आक्रमणाचे खापर फोडले गेले. या भ्रष्ट यंत्रणांचा सामना करत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था यांना पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. माधव भांडारी यांनी केले. एका सामान्य, निर्दोष हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्याखाली अटक करून हवे ते साधण्यासाठी त्याचा किती नानाविध प्रकारे छळ केला जातो, याची प्रत्यक्ष साक्ष देणार्‍या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील ‘कोहिनूर मंगल कार्यालया’त २० एप्रिल या दिवशी पार पडला. त्या वेळी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.

हे पुस्तक म्हणजे हिंदुत्वाच्या कार्यातील खारीचा वाटा निश्चित ठरेल ! – विक्रम भावे

विक्रम भावे

यापूर्वी मी ‘मालेगाव बाँबस्फोटातील अदृश्य हात’ हे पुस्तक एक तिसरी व्यक्ती म्हणून लिहिले होते. दाभोलकर हत्येप्रकरणी मात्र मी काय भोगले, हे लिहून मला लोकांना वाचायला द्यावे लागत आहे, हा अतिशय विचित्र प्रसंग आहे. केवळ हिंदुत्वनिष्ठ असल्याने मला हे सर्व भोगावे लागले. हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदूंना कष्ट घ्यावे लागतील.

हे पुस्तक म्हणजे हिंदुत्वाच्या कार्यातील खारीचा वाटा निश्चित ठरेल !

‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या बागुलबुवात फसलेल्या निरपराध तरुणांचे प्रातिनिधिक आत्मचरित्र म्हणजे हे पुस्तक ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

अभय वर्तक

बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात विदेशी संस्थांचे हस्तक म्हणून देशद्रोही वृत्तीचे पुरोगामी, तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी कार्यरत असून ते भारताचे लचके तोडू पहात आहेत. स्वतंत्र भारतात श्री. विक्रम भावे यांसारख्या राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांना खोटे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) सिद्ध करून अडकवले जाते. आज या प्रकरणातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली; परंतु त्यांना आलेले अनुभव आपण सर्वांनी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचावेत आणि त्या पुस्तकाचा पाठ करावा, असे ते अनुभव आहेत. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातन संस्थेच्या १० सहस्र निरपराध साधकांच्या चौकशा करतांना किती प्रकारे मानवाधिकारांचे हनन झाले, याची आपण कल्पना करू शकणार नाही. ‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या बागुलबुवाच्या फसलेल्या निरपराध तरुणांचे प्रातनिधिक आत्मचरित्र म्हणजे हे पुस्तक आहे.

राज्यातील पुरोगामित्वाचा बुरखा आणि जातीय राजकारण नष्ट झाल्यानंतरच हिंदुत्व येऊ शकते ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

महाराष्ट्रात ब्राह्मण्य आणि देवत्व यांच्यावर टीका करत रहाणे, ही प्रथा प्रस्थापित करण्याचे कार्य काही भ्रष्ट मंडळींनी केले. याच भ्रष्ट मंडळींनी राज्यातील देवस्थानांच्या भूमी लुबाडल्या. त्या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेने आवाज उठवला. महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा बुरखा पांघरण्यात आला आहे. हा बुरखा आणि राज्यातील जातीय राजकारण नष्ट झाल्यानंतरच हिंदुत्व येऊ शकते. आमचे असे तत्त्व होते की, निरपराध किंवा अपराधी, कोणताही हिंदुत्वनिष्ठ असो, त्याला आम्ही निश्चित साहाय्य करणार. संशयितांना सर्व पत्रकार भंडावून सोडतात; पण निर्दोष सोडल्यानंतर एकही पत्रकार प्रश्न विचारत नाही, ही शोकांतिका आहे. विक्रम भावे यांनी लिहिलेले पुस्तक याच शोकांतिकेला वाचा फोडणारे आहे.

या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री सचिन घुले यांनी श्री. माधव भांडारी यांचा, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल चे अधिवक्ता श्री. दत्तात्रय देवळे यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री. निलेश लोणकर यांनी श्री. अभय वर्तक यांचा, तसेच चार्टर्ड अकाऊंटन्ट श्री. मिलिंद भातखंडे यांनी लेखक श्री. विक्रम भावे यांचा सत्कार केला.

हिंदुत्वनिष्ठ श्री सचिन घुले यांनी श्री. माधव भांडारी यांचा सत्कार केला
नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल चे अधिवक्ता श्री. दत्तात्रय देवळे यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सत्कार केला
श्री. निलेश लोणकर यांनी श्री. अभय वर्तक यांचा सत्कार केला
चार्टर्ड अकाऊंटन्ट श्री. मिलिंद भातखंडे यांनी लेखक श्री. विक्रम भावे यांचा सत्कार केला
प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या वेळी ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आदी मान्यवरांसह ४०० हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.